प्रलय
झालाच कधी प्रलय तर बरच काही जपायच आहे....
लिखाण : अभिजीत अशोक इनामदार
प्रलय.... प्रलय होणार श्रुष्टी
नष्ट होणार अशा आशयाची माहिती ठराविक वर्षांनी फिरत राहते. मागे २०१२ साली तर ३१ डिसेंबर
२०१२ हा शेवटचा दिवस असणार अश्या वावड्या उठल्या होत्या. त्यावरती तर एक सुंदर २०१२
सिनेमा सुद्धा आला होता. पण जर असा काही प्रलय झालाच तर आपल्या काही अपूर्ण इच्छा पूर्ण
व्हाव्यात असे प्रत्येकाला वाटेल. काही गोष्टी ज्या हातून निसटून गेल्यात त्या जतन
करून ठेवण्याची इच्छा होईल. झालाच प्रलय तर त्याआधी माझ्या काही इच्छा पूर्ण व्हाव्यात
हे सांगणारी ही कविता.
झालाच कधी प्रलय तर बरच काही
जपायच आहे
हातून निसटलेली प्रत्येक गोष्ट
जतन करून ठेवायची आहे
ऊन वारा पाऊस कदाचित येतच राहतील
नित्य नेमानेच
पहाटवेळचा हिरवळी वरचा दवबिंदू
मात्र जपायचा आहे
शाळेच्या पहिल्या दिवसाची काळजातली
धडधड ध्यानात आहे
नव्या कोऱ्या पुस्तकांचा गणवेशाचा
गंध अजूनही स्मरणात आहे
शाळा तर कधीच सुटली पुस्तकं गणवेश
फाटून गेले
धडधडणार काळीज आणि नवा कोरा गंध
मात्र जपायचा आहे
बालपणीच्या साऱ्या आठवणी सारे
खेळ सारे हट्ट
आयुष्य सरतीला आलं तरी काळजात
रुतून बसलेत घट्ट
फिरून परत जाता येईल असं काही
वाटत नाही
नाही जाता आलं मागे तरी त्या
आठवणी सोडायच्या नाही
बघता बघता वाढत गेलो आयुष्यापाठी
धावत राहिलो
धावता धावता कळून गेले कि आता
मी माझा न उरलो
आयुष्यापाठी धावण्यापेक्षा खरंखुरं
धावायचं आहे
हातून निसटलेल्या क्षणांचा आठव
धरून ठेवायचा आहे
सागरतिरी अविरतपणे असंख्य लाटा
रतीब घालताहेत
पिंपळाच्या उंच टोकावरती पक्ष्यांच्या
शाळा भरत आहेत
प्रलय होईल तेव्हा होईल
.... होईल कि नाही माहित नाही
पक्ष्यांच्या उंच भराऱ्या पहात
सागरतीरी बसायचं आहे
होणारच असेल प्रलय जर तर मनासारखं
जगायचं आहे
मुक्तछंद काव्य आणि हवेत उडणारी
म्हातारी व्हायचं आहे
आकाशातून पंख लाउनी उंचच उंच
उडायचं आहे
कडकडणारी वीज होऊनी आसमंत उजळून
टाकायचा आहे
सूर्याला पुडीत बांधून कोनाड्यात
ठेवायचा आहे
चंद्राला पिळून चांगला अंगणात
वाळत घालायचं आहे
चांदण्यांची मिसळ करुनी पावसोबत
खायची आहे
असं काही होऊ शकतं का...? हा
विचारच तर जपायचा आहे
झालाच कधी प्रलय तर बरच काही जपायच आहे....
©अभिजीत अशोक इनामदार
कामोठे, नवी मुंबई.
No comments:
Post a Comment