Monday, 23 May 2016

कोजागिरी (लेख)

कोजागिरी

कोजागिरी म्हटली की मला आठवते ते मी आणि माझे रूम पार्टनर्सनी साजरी केलेली कोजागिरी. हि घटना १९९६ सालातली आहे. दहावी पास झालो अन सातार्याला एस. पी. एस. कॉलेजला डिप्लोमाला प्रवेश घेतला होता. राहण्यासाठी यादोगोपाळ पेठेत आठले म्हणून आहेत त्यांच्या वाड्यात भाड्यानी खोली घेतली होती. माझा चुलत मामा जो माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे तो सुद्धा त्याच कॉलेजात होता. त्यावेळी तो दुसर्या वर्षाला होता. त्याच्या ओळखीचे अजून काही अन मी असे आम्ही तिथे राहत असू. मला साहजिकच रुळायला थोडा वेळ लागला होता. घरापासून बाहेर राहण्याचा असा माझा हा पहिलाच अनुभव होता, पण अवधूत (मामा) असल्यामुळे एक आधार वाटत असे. तर मी पहिल्या वर्षाला असतानाच कोजागिरी साजरी करायची असे ठरले त्यासाठी मी, अवधूत, आमचा अजून एक रूम मेट अल्ताफ आणि डॉ. प्रदीप पालवे (हे सुद्धा त्यावेळी आमचे रूम मेट होते अन आम्ही सगळे त्यांना साहेब असे म्हणत असू) असे चौघे जण यवतेश्वरला जायचे असे ठरले. यवतेश्वर हे सातारा शहरापासून - की. मी. आहे. आमच्या कडे त्यावेळी वाहन म्हणजे ११ नंबरची बस (म्हणजेच पायी फिरणे/चालणे). साहेबांची स्वतःची Bajaj स्कूटर होती. ती एकच होती त्यावर चोघे कसे जाणार म्हणून मग त्यांच्या कि अल्ताफच्या ते आठवत नाही पण कोणाच्या तरी एका मित्राची अजून एक स्कूटर मिळवली. लागणारे साहित्य म्हणजे दुध तापवायला पातेलं, दुध, साखर, मसाला हे जमवले. तिथे जाऊन दगडाची चूल मांडायची असे ठरले. चूल पेटवण्यासाठी म्हणून थोडे रॉकेल सुद्धा बरोबर घेतले. रात्री जेवणं उरकली अन सगळा जामा निमा करून आम्ही रात्री साधारण १० वाजण्याच्या सुमारास निघालो. यादोगोपाळ पेठ (राजवाड्याच्या आगदी जवळचा भाग) तिथपासून ते यवतेश्वर हा आगदी खडा चढ आहे. दोन गाड्यांवर आम्ही चौघे निघालो. काही वेळातच यवतेश्वर च्या इथे पोहचलो. थोडे अजून पुढे जाऊ असे म्हणत आम्ही कास पठाराच्या दिशेनी अजून साधारण - कि. मी. पुढे गेलो. यवतेश्वर पर्यंत चढ आहे त्या पुढे सपाटीचा रस्ता आहे. हे का सांगतोय ते पुढे तुम्हाला कळेलच.

अखेर एकाठिकाणी थांबलो. गाड्या लावल्या. ब्याटरीच्या उजेडात बर्यापैकी जागा पाहून साहित्य ठेवले. जागा थोडी साफ करून चूल करण्यासाठी तीन दगड घेतले. मग चुलीला सरपण म्हणून मग काटक्या गोळा करण्याचे काम सुरु केले. काटक्या जमवून मग चूल पेटवण्याचे काम चालू झाले. हे सगळे करत असताना गप्पा आणि धमाल चालू होती. रॉकेल टाकून काटक्या पेटवल्या अन मग चुलीवर पातेल्यात दुध, साखर आणि मसाला टाकून दुध आटवण्याचा कार्यक्रम चालू झाला. मग गाणी आणि अंताक्षरी सुरु झाली. रात्रीच्या वेळी सातारा शहर दिव्यांनी उजळून निघालेले दिसत होते, वरती टपोर चांदणे, थंडगार हवा अन आमची धमाल मस्ती. निव्वळ अवर्णनीय. मग गरमागरम दुध घेतले अन ह्या सगळ्या वातावरणाचा आस्वाद घेत बसून राहिलो. माझ्यासाठी तरी असा अनुभव पहिल्यांदाच होता. मस्त वाटत होते. बर्याच वेळानी साधारण - .३० वाजला असेल आम्ही उठलो सगळा साहित्य आवरलं. आग व्यवस्थित विझवली अन गाड्या काढल्या. साहेबांची गाडी सुरु झाली. अल्ताफची गाडी किक मारून मारून तो दमला पण काही केल्या सुरु होईना. मग प्रत्येकाने गाडी सुरु करण्याचे वेगवेगळे प्रयत्न करून बघितले पण वातावरणाप्रमाणेच थंड झालेली स्कूटर काही केल्या चालू होईना. मग सगळे प्रयत्न थकल्यावर मग असे ठरले की गाडी पूल करायची. सपाटीचे - की. मी. झाले की काम होणार होते. कारण तिथून पुढे आगदी रूम पर्यंत पूर्ण उतार होता. म्हणून मग हे एवढे अंतरच कठीण होते. पण काही इलाज नव्हता. साहेब  आणि अवधूत त्यांच्या (चालू) गाडीवर बसले. अल्ताफ अन मी बंद गाडीवर बसलो. साहेब अन अल्ताफ गाडी चालवणार आणि मी आणि अवधूत एकमेकांचे हात घट्ट पकडून ठेवणार असे प्ल्यानिंग   होते. पण अगदी सोपे वाटणारे काम अजिबात सोपे नव्हते कारण गाड्या एकाच स्पीडनि धावत नव्हत्या. आमच्या दोघांपैकी कोणाचा तरी हात दुखू लागल्यानी मध्येच हात सोडावा लागे. गाड्यांमधील अंतर जास्त झाले तरीही हात सोडावे लागत. थोडा वेळ थांबलो आणि परत सुरुवात केली. अखेर त्या उताराच्या जागेवारती आम्ही पोहचलो. साहेबांची गाडी मागे आणि मी आणि अल्ताफ पुढे असे पुढचा प्रवास सुरु झाला. माझा अन अवधूत चा हात दुखायला लागला होता. पण आता थोड्याच वेळात आम्ही रूम वर पोहोचणार होतो म्हणून आम्ही आनंदी होतो. शेवटी .३० ला रात्री आम्ही पोहचलो आणि सुटकेचा निश्वास टाकला. रात्री झोपताना खूप हसलो, त्याबरोबरच देवाचे आभार मानले अन झोपी गेलो. मला हे तिघेही सिनियर त्यामुळे तितकीशी भीती वाटली नाही. त्यानंतर किती तरी कोजागिरी पौर्णिमा आल्या अन गेल्या पण दर वेळेस मला ह्या १९९६ च्या कोजागिरीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

 ©अभिजीत अशोक इनामदार
  कामोठे, नवी मुंबई                               

No comments:

Post a Comment