Monday, 23 May 2016

रण संग्राम (भाग १) (कथा)

रण संग्राम (भाग १)

दिनांक : ९ फेब्रुवारी २०१६
अभिजीत अशोक इनामदार  

राजा धर्मसेन आपल्या महालातल्या खलबतखान्यात काळजीने येरझार्या घालत होता. त्याच्या समोरच त्याच्या गुप्तचर विभागातील दोन अतिशय विश्वासू सेवक उभे होते. त्यातील एक खुद्द त्याच्या गुप्तचर विभागाचा प्रमुख हिम्मतराव आपल्या राजासमोर अदबीने हात समोर जोडून उभा होता. त्याच्या पाठीमागे त्याच्या बरोबर नेहमी असणारा जिवाजी तोही खाली मन घालून अदबशीर उभा होता. आज ह्या दोघांनी अशी बातमी आणली होती कि राजा धर्मसेनला सुद्धा चिंतीत व्हावे लागले होते.

“हिम्मतराव तुम्ही हे पक्के खात्री करून बोलताय ना?" राजांनी विचारले. "होय महाराज" हिम्मतराव म्हणाले. "आम्ही दोघेही सुरजनगरीत त्यावेळी हजर होतो. त्रिविक्रमाच्या फौजा सुरजनगरीवर चालून आल्या तेव्हा आम्ही बाजारात साध्या नागरिकांच्या वेशात माहिती काढत फिरत होतो. तेव्हाच ती फौज तुटून पडली. सुरजनगरीला प्रतिकार करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. आम्ही कसेबसे शहराच्या बाहेर आलो अन तसेच इकडे कूच केले." हिम्मतराव बोलायचं थांबला तेव्हा राजानी त्यांच्याकडे पाहिले, ते ज्या गावकर्याच्या वेशात सुरजनगरीत होते त्याच वेशात ते अजूनही होते. साधा कुडता धोतर अन डोक्याला मुंडासं. गालावर खुरटी दाढी वाढलेली. सगळा फौज फाटा घेऊन सुरजनगरला जायला साधारण दोन आठवडे लागत ते अंतर ह्या पठ्ठ्यानी एक दिवस अन एक रात्रींमध्ये पार केले होते. अविश्रांत केलेली दौड त्यांना जाणवत होती. थंड हवा, अन्न पाणी वारा ह्यांचा विचार न करता ते फक्त आणि फक्त आपल्या राजासाठी दौडत राहिले होते अन आल्या आल्या राजाच्या कानावर हि महत्वाची बातमी घातली होती.

राजांनी सेवकांना सांगून त्या दोघांना काहीतरी खायला प्यायला मागवले. थोडा आराम करायला सांगितले. अन अजून निवांत बोलू असे सांगितले. सुरजनगरी हि धर्मपुरच्या खूप जवळचं राज्य. धर्मपुरच्या राजा धर्मसेन अन सुरजनगरीचा राजा कापिलसेन हे एकमेकांशी मैत्रि ठेऊन होते. दोघांमध्ये कधीही कुठलेही वैर किंवा वितुष्ट नव्हते. दोन्ही राज्यांमधील जनता एकमेकांच्या राज्यांमध्ये जाऊ येऊ शकत होती, व्यापार करू शकत होती. ह्या दोन राज्यांच्या मैत्रीची सुरुवार ह्या दोन्ही राज्यांच्या आजोबांपासून चालू होती. ती आजपर्यंत तशीच होती. धर्मसेन राजाच्या आजोबांनी राजा अमरसेननी दिग्विजय केला होता उत्तरेपर्यन्तची राज्य जिंकली होती. त्यासाठी त्यांना कपिलसेन चे आजोबा विजयसेन ह्यांनी सहाय्य केले होते. तेव्हा पासून हि दोन राज्ये एकमेकांशी सलोखा राखून होती. गेल्या काही वर्षांपासून राजा त्रीविक्रमाचा सगळीकडे बोलबाला सुरु झाला होता. त्याचे राज्य वरती उत्तरेकडे खूप लांब आहे असे माहित होते. हे दोन्ही राजे राजा धर्मसेन अन राजा कापिलसेन हे कधीही एवढ्या लांब उत्तरेला गेले नव्हते. गेल्या काही महिन्यांमध्ये त्रीविक्रमाने बर्याच राजांना त्याचे मंडलिक बनविले होते किंवा जे मंडलिक होण्यास तयार नव्हते त्यांना मारून त्यांची राज्ये खालसा केली होती. त्याची सार्वभौम राजा होण्याची इच्छा होती. अन त्यासाठी तो वाट्टेल ते तंत्र वापरायला तयार होता. ताकत, बोद्धिक डावपेच, राजकारण ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये तो पारंगत होता. त्याची सार्वभौम राजा होण्याची इच्छा त्याला अनेक वाईट गोष्टी करायलाही भाग पडत होती. त्यामुळेच बर्याच युद्धांमध्ये रक्ताचे पाट वाहत होते पण तो थांबायला तयार नव्हता. त्याचं राज्य आता बर्यापैकी विस्तारले होते. पण त्याला त्याचे राज्य धर्मपुर पर्यंत वाढवायचे होते. अमरसेननी केलेला दिग्विजय पुसून आता त्याला सार्वभौम राजा व्हायचे होते. त्रिविक्रमाची धाड कधी न कधी कोसळणार हे धर्मसेननी ओळखले होते पण तो एवढ्या लवकर सुराजनगरीपर्यंत पोहचेल असे त्याला वाटले नव्हते. धर्मापुरच्या उत्तरेला उंचच उंच पर्वतरांगा, पश्चिमेला अथांग सागर अन दक्षिणेलाही पर्वतरांगा. पूर्वेला कापिलसेनचे सुरजनगर राज्य. म्हटले तर एकदम सुरक्षित पण आता जी एकमेव अशी रहदारीची वाट होती त्या वाटेवरच्या पहिल्या राज्यात शत्रू सैन्य घुसले होते. बर सुरजनगरीचे हेर काय करत होते कि त्यांना त्रिविक्रम त्यांच्या जवळ पोहचला तरी कळले नव्हते? नक्की काय प्रकार झालाय हे कळायला मार्ग नव्हता.

आता हिम्मत अन जिवाजी थोडे खाऊन पिउन चांगले हुशार झाले होते. राजा धर्मसेननी त्यांना आता बाकीचा तपशील सांगायला सांगितला. त्यांना अनेक प्रश्न विचारले. सुरजनगरीच्या हेरांबद्दल काही माहिती आहे का ते पडताळून पाहिले. त्रिविक्रम लगेच आपल्यावर चाल करून येईल की कसे ह्याचे ठोकताळे चाचपून बघितले. आपण पुढे काय करायला हवे यावर तो विचार करू लागला. हिम्मतरावला पुढची तातडीची कामगिरी सोपवून अतिशय सावधपणे ती कामगिरी पार पाडण्याबाबत पुन्हा पुन्हा बजावले अन रवाना केले होते.

लगेच आपल्या मुख्य सरदाराना त्याने पाचारण केले. मध्यरात्री राजांनी सगळ्यांना का बोलवावे हे प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. सेनेचे सेनापती, राज्य कारभार पाहणारे प्रधान ह्यांना राजांनी सगळी परिस्थिती सांगितली अन आता आपण काय करावे हे तुम्ही सांगा किंवा तुमचे मत काय हे विचारले. तेवढ्यात एक सेवक सुरजनगरीच्या राजाचा खलिता आल्याची बातमी घेऊन आला.

(क्रमश:)

©अभिजीत अशोक इनामदार
  नवी मुंबई, कामोठे         

No comments:

Post a Comment