Monday, 23 May 2016

निसर्ग ... भाग १ (कविता)

निसर्ग ... भाग १

लिखाण : अभिजीत अशोक इनामदार

कालच्या एक व्यथा... सूर्याची ह्या हलक्या फुलक्या कवितेनंतर, आज निसर्गाची खरच काय कमाल असते ना ते ह्या आजच्या कवितेत पाहणार आहोत. निसर्गचक्र कसा वर्षानुवर्षे चालू आहे. आपल्या कधी ध्यानीमनी सुद्धा येत नाही अशा गोष्टी नित्यनेमानी घडत असतात. ह्या मध्ये मी दोन भाग केले आहेत. जे निसर्गचक्र नित्यनेमानी अखंड सुरु आहे त्याचे वर्णन आज इथे करीत आहे. पण ते चक्र जर बिघडले तर काय होईल ते उद्याच्या भागात ...       


इतकं साधं सरळ असतं निसर्गाचं वागणं

निशा सरून परतू लागताच आदित्याच धावत येणं

दिवस चढतीला लागताच कसं सगळं सगळं तापत जाणं

तापून तापून सारं कसं तिन्हीसांजेला मग थंड होणं
 

अगदी सहज सुंदर अशी वाहते आहे कृष्णामाई

रानचा वारा वाहता वाहता पाला पाचोळा उडवत नेई

दिवस टळून हळूच अलगद रात्र आपसूक चालत येई

घामेजलेल्या जीवांवरती शीतल चांदणे शिंपत जाई
 

ग्रीष्म येतो धरणी तापवतो डोंगर दऱ्या करपवून टाकतो

कडक उन्हात तापून तापून सगळा प्राणीमात्र होरपळून जातो

तदनंतर मग वर्षा येते सर्व जीवाना सुखावून जाते 

करड्या काळ्या डोंगर दर्यांची मग हिरवी वनराई होते
 

चोची मध्ये चोच घालून चिऊ भरवते पाखरांना

गरम गरम भाकरी बनताच माय भरवते लेकरांना

नैसर्गिक क्रिया म्हणूनच मुलंबाळ पाखरं वाढतात

मुलाबाळांची माणसं अन पाखरांचे मग पक्षी होतात

 
आदित्यच उत्तरायण - दक्षिणायन चालूच आहे युगेन युगे

पंढरीचा विठोबा सुद्धा उभारलाय विटेवरती युगेन युगे

अथांग समुद्राला भरती ओहोटी चालूच आहे युगेन युगे 

युगंधर अच्युताची आराधना चालूच आहे युगेन युगे


अंकुर रुजतो पालवी फुटते मोहोर येतो आंबा पिकतो

शिवार फुलतं दाणा भरतो गोफण फिरते अन हुरडा येतो

सगळं कसं नेमानी होतं आगदी ठरवून दिल्या सारखं

निसर्गाचं वागणंच असतं आगदी बावनकशी सोन्यासारखं

©अभिजीत अशोक इनामदार
 कामोठे, नवी मुंबई.

No comments:

Post a Comment