Monday, 23 May 2016

रथ ... मनोरथ …!!! (कथा)

तांबड फुटायला लागल होत. दामू परसाकडे जाऊन आला होता अन आता लिंबाची काडी चावत होता.  थंडीनी सगळीकडे धुकं पडल होत. अंग गारठून गेल होत म्हणून जरा उब मिळावी म्हणून चुलीपुढे बसला होता. पितळी तपेल्यात आंघोळीच पाणी तापत होत. चुलीतली लाकडं त्यानी जरा सारखी केली. काही बाभळीची लाकडं सू सू ... फट फट आवाज काढीत जळत होती. थंडीनी दामुसारख्या राकट माणसाच्या अंगावर देखील काटा आणला होता. शेवटी आळस झटकून तो उठला ... कोपर्यात गेला. तोंड खंगळल अन घरात आला. कौलारू घर.... ओसरी त्याच्या आतल्या बाजूला पडवी. तिच्या डाव्या हाताला स्वयपाक घर होत. ओसरीतून तो पडवीत आला. तिथे त्याची दहा आकरा वर्षाची मुलगी सुरेखा अन - वर्षाचा मुलगा पांड्या दोघे गारठून झोपले होते. दोघांच्या अंगावरची वाकळ अस्ताव्यस्त झाली होती. त्यानी ती जरा निटनेटकी केली ... तोवर त्याच्या कारभारनीचा आवाज त्याच्या कानी पडला ... "येतायसा न्हवं?" तो स्वयपाकघराकडे वळला. आत येउन भिंताडाला टेकून बसला. खांद्यावरच्या फाटक्या टॉवेलनी तोंड पुसल. रखमानी चुलीतली लाकडं सारखी केली ... जरा आच कमी करावी म्हणून लाकडं जरा बाहेर ओढली. चुलीवरच्या पातेल्यातला चहा खळा खळा उखळला होता. सांडशिनी पातेल खाली उतरवल अन  पितळी  मध्ये चहा ओतला. आज सुद्धा बिन दुधाचाच चहा होता. गेल्या वर्षी चंद्रीला अन तिच्या रेडकाला विकायची वेळ आली होती अन तेव्हापासून सकाळच्या चहा मध्ये दुध हे कधीतरीच मिळत असे. दोघांनीही आपापल्या पितळया उचलल्या अन तोंडाला लावल्या. चहा घेऊन दोघे उठले अन सकाळच्या आवराआवरिला लागले. आंघोळ पांघोळ करून नाथाला हात जोडले अन दामू त्याच्या घराबाहेरच्या वखारीत त्याच्या नेहमीच्या जागी बसला..... © अभिजीत अशोक इनामदार

दामू सुतार आहे. त्याला कलाकुसरीची नक्षीकामाची लाकडी वस्तू किंवा दरवाजे करायची सवय आहे. आणि हाच त्याचा व्यवसाय आहे. अनेक गावांचे यात्रांमधील मोठ मोठे रथ त्यानी ह्या आधी बनवले होते. रखमा त्याची बायको तीही आवरून स्वयपाकपाण्याच बघायला लागली. तिची घरातली काम झाली कि तीही दामूच्या मदतीला येत असे. गेल्या दोन वर्षातल्या दुष्काळामुळे आता खाण्यापिण्याची आबाळ व्हायची वेळ आली होती. एकेकाळी हाताखाली तीन तीन कारागीर असलेला दामुशेठ आता एकटाच होता. खाण्यापिण्याची आबाळ असलेल्या प्रदेशात कलाकुसरीची कामं कोण करून घेणार आता? नाही म्हणायला लाकडाची वखार अन काही किरकोळ शेतीची अवजार दुरुस्तीची कामे ह्याच्यावरच उदरनिर्वाह चालू होता. आपण भले आन आपले काम भले असा दामुचा शिरस्ता त्यामुळे उगाच पारावर जाऊन पिंका टाकीत बसायची त्याला पहिल्यापासूनच सवय नव्हती. मग आपल्या जागी बसून हत्यारांना धार लावत बस किंवा मग पांडुरंगाचे नाव घेत बस असा त्याचा दिनक्रम चालू होता....© अभिजीत अशोक इनामदार

मागच्या आठवड्यात हैबतीनाना म्हणाला व्हता "शेनवडीच्या रथाच काम निघणार हाय ..... बघून का इनास तू जाऊन?" दोन दिवसापासून त्याच्या डोक्यात हेच घुमत होत. आज शेवटी उठलाच. रखमाला म्हणाला "काय खाया तयार असं तर वाढ जरा शेनवडीला जाऊन येतु. दोन वरस झाली लेकरांना नवा कपडा न्हाय का तुला लुगडं न्हाय. बघू रथाच काम मिळाल तर चार पैक मिळतील. सुरेखालाबी काय साळमंदी कसली परीक्षाला बसायचं म्हणती न्हव" रखमा म्हणाली "भाकर तयार हाय बाजरीची कोरड्यास पिठलं करू का? लगीच करते अन वाढते". एव्हाना मुले उठून त्यांच आवरून शाळेत जायची गडबड चालू होती. त्याचं खाउन झाल होत उरली सुरली भाजी डब्यात भरून दिली होती. म्हणून मग रखमा म्हणाली पिठलं करू का म्हणून म्हणाली. दामुनि तिला हातानीच नको म्हणून सांगितले. शाळेसाठी तयार झालेल्या लेकरांकडे प्रेमानी बघितल. पोर हसली अन त्याला बिलगली. पूर्वी चोकलेट किंवा काहीतरी खाण्यासाठी रुपया दोन रुपय मागणारा पांडुरंग आता आजकाल त्याच्या बंडीच्या आतल्या खिशात हळूच हात घालेनसा झाला. फाटायला आल्या तरी बाप बंड्या बदलत नाही अन त्याच्या बंडीच्या खिशात हल्ली पैसेही नसतात हे कळण्या एवढी मुलं नक्कीच मोठी झाली होती.   

पोरं ओसरीवर गेली अन दामूनी चटणी भाकर वाढ म्हणून सांगितले. रखमा म्हणाली "तुम्ही सोताची अशी आबाळ करतासा ते बघवत न्हाय बघा मला. अन लेकारांम्होर मला लुगडं न्हाय घेतलं असा म्हणत जाव नगासा... मला मेलीला कुठं मिरवायला जायचं हाय तवा. मिळाला पैका तर पहिले तुम्हास्नी अन लेकरास्नी घ्या कापड." खाली मान घालून दमुनी चटणी भाकरी संपवली अन हात धुतला. तोवर पांड्या एकदम पळत पळत आत आला अन म्हणाला "बाबा भाईर मानसं आल्यात". आता ह्यावेळी कोण आलं असेल म्हणून दामू बाहेर आला.... © अभिजीत अशोक इनामदार

बाहेर मुगुटराव शेनवडीचे सरपंच, शिर्पतराव उपसरपंच अन अजून पाच धा जण उभे होते. दामूनी पटकन नमस्कार केला अन म्हणाला "म्या आज तिकडच शेनवडीलाच येणार हुतो". पोराला घरात च्या ठेवायला सांगून बसायला बैठक टाकली. घरात दुध नाही हे त्याला ठाऊक होतं पण आल्या गेल्या माणसाच बघायला पाहिजे होतं अन त्यात ह्या सगळ्या मोठ्या आसामी होत्या. पाण्याचा तांब्या अन भांड ठेऊन चंद्रा आत पाळली. तिकडे आत रखमानी पांडूला गाठीचे काही पैसे होते ते देऊन दुध आणायला मागच्या दारांनी पिटाळला होता.

इकडे लोकांनी पाणी घेतलं आणि मग मुगुटरावांनी इशय मांडला "काय दामूशेठ कसं हाय धंदा पाणी". दामू "कशाचा धंदा अन कशाचं काय? खायापियाची आबाळ झालीय बघा म्हणूनच मग बघा आज येत हुतो तुमच्याकड काय काम बीम निघतंय काय बघाया"

मुगुटराव "खरय दामूशेठ ... समदिकड असाच हाय बघा ...ह्या वर्षी तर कुणी काय पेरलच न्हाय बघा ... पाणीच न्हाय तर कसं व्हणार हो? दोन वरीस झालं गावात यात्रा न्हाय का रथ न्हाय. गावकरी बोलले नाथाला नवस करू ... नवा रथ करू ... काय बी करू पण तेव्हडा नवस फेडू. समदी म्होरं आली ... काय बाहीरगावला असणारी मानसं बी आली मदतीला. मग म्हटला देवाचा काम केल्या बिगर काय दुष्काळ हटायचं न्हाय. मग काय झाली तेवढी वर्गणी जमा केली. आता रथाचं काम तुमच्या बगर कोण करणार म्हणून मग लगोलग आलू बघा. हे २५०००/- इसार घ्या चांगलं लाकूड निवडून ठिवा. अजून जमतील तसं पैक आणून देतु बघा"

दामूला काय बोलावे सुचेना ... ज्या कामाची याचना करायला तो आत्ता निघाला होता ते काम हाती घेऊन नाथ महाराज म्हणा किंवा विठोबा म्हणा स्वतः आले होते. त्याचे डोळे अश्रुनी डबडबले. पडवीत आताल्याबाजुला उभी राहून रखमानी सगळं ऐकलं होतं. तिनी लगेच भांड्यांमध्ये भरून गरम गरम चहा बाहेर पाठवला. सकाळी चहाला दुध नव्हते आत्ता कुठून आले असा प्रश्न दामूला पडला पण लगेच रखुमाई नि म्हणजेच त्याच्या रखमाची हि कमाल होती हे ध्यानात आले.

मंडळीनी चहा घेतला. नारळ अन एक फुलांचा हार आणला होता तो दामू च्या हाती दिला. त्याच्या वाखारीतल्या नाथाच्या तसबिरीला हार घालून एका फटक्यात नारळ त्यांनी फोडला ... पाणी चहूकडे उडवले. खोबर्याचा प्रसाद वाटला. महिन्याभरात अजून पैसे अन कामाची सुरुवात कशी झालीय ते बघायला येवू असे सांगून मंडळी निघून गेली.   

पैसे घेऊन दामू घरात आला. चागलं लाकूड वखारीत पडून होतं. त्यामुळे आता आज पासून किंवा उद्यापासून कामाला सुरुवात करता येणार होती. त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. रखमाच्या चेहऱ्यावर बर्याच दिवसांनी त्यानी हसू बघितले. पोरं आनंदानी उद्या मारू लागली होती. संकटांचे ढग हटले होते.

बाहेर सगळीकडेच अंधारून आले होते. नाथाची कृपा झाली होती अन कधी नव्हे ते आभाळ भरून आले होते. बघता बघता टपोर्या थेंबांनी कौलांवर ताशा वाजवायला सुरुवात केली होती अन धुंद मातकट सुगंध सर्वत्र भरून राहिला होता.

© अभिजीत अशोक इनामदार
    कामोठे, नवी मुंबई   

No comments:

Post a Comment