Monday, 23 May 2016

बालपणीची शिदोरी (भाग २) (लेख)

दसरा ... माझ्या लहानपणीचा

माझ्या लहानपणी ... म्हणजे जेव्हा आम्ही म्हसुर्ण्याला राहत असू. तेव्हा आज्जी आजोबा होते. दसर्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आई किंवा काकू कोणीतरी सडा रांगोळी करत. आजोबा त्यांची आंघोळ उरकून दुध घेऊन मग पूजेला बसत. देवाच्या पूजेला लागणारी फुले आणायचं काम माझी अत्त्या अन माझं असे. वेगवेगळ्या रंगाची फुले, बेल आणि तुळशी भरपूर गोळा होत आणि मग ती आम्ही घरी आणून ठेवत असू. तो पर्यंत आजोबांनी पूजेला सुरुवात केलेली असे. घट उठवून, सगळे देव ताम्हनात घेऊन त्यांना स्वच्छ स्नान घालून व्यवस्थित कोरडे करून, सगळे देव आपापल्या जागी स्थानापन्न झालेले असत. आणि आजोबा सहानेवर चंदन उगाळून गंध करीत असत. एकदा गंध करून झालं कि ते बोटांनी एका छोट्या तांब्याच्या तबकडीत काढीत. हल्ली आता वेगवेगळ्या रंगाच्या गंधगोळ्या मिळतात तेव्हा हे असे नव्हते. सहानेवरती चंदन उगाळून गंध बनवणे हि सुद्धा एक कला आहे. पहिल्यांदा सहन स्वच्छ धुऊन काढून मग थोडसं पाणी घेऊन चंदन त्याच्यावर गोल गोल फिरवत राहायचे. हे असे गंध करताना आजोबांची तल्लीनता मला अजूनहि आठवते. ते चंदन गोल फिरवताना गोल फिरणारा हात, तसे करताना शरीराला मिळालेली किंचितशी मागे पुढे अशी हालचाल आणि मुखातून चालू असलेलं स्तोत्र पठन. मग मधेच त्यात किंचित हळद कुंकू आणि अष्टगंध टाकून पुन्हा गंध उगाळणे. हि सगळी क्रिया मी कितीतरी वेळा पाहिलेय अन अनुभवलीय. त्याबद्दल कितीही लिहिलं तरी ते अनुभवायलाच हवं ते सांगून वाचून नाही कळणार.

इकडे आई अन काकू स्वयंपाकाला लागलेल्या असत. पुरणपोळीचा नैवेद्य असे त्यामुळे भरपूर कामं असत. पुरण शिजवणे, ते पाट्यावर वाटून बारीक एकजीव करून घेणे हे अति महत्वाचं काम असे. नंतर नंतर मग पुरण यंत्र आले अन मग बर्यापैकी ते काम हलके झाले. तर असो स्वयंपाकाचा तपशील देत बसत नाही. कारण आम्हाला पाटी पूजन (सरस्वती पूजन) करण्यासाठी शाळेत जायचे असे. आजोबा पाटीवरती सरस्वती काढून देत असत. मग पाटी, फुले वगैरे घेऊन आम्ही शाळेत जात असू. शाळेतून माघारी येईपर्यंत नैवेद्याची तयारी झालेली असायची मग देवाला नैवेद्य दाखवून जेवणाची पंगत बसत असे.पुरुषांची जेवणं झाली की मग स्त्रिया जेऊन घेत.

संध्याकाळी सोने लुटणे हा एक आनंदायी प्रकार होता. संध्याकाळी आम्ही सगळी भावंड आवरून चांगले कपडे घालून तयार होत असू. प्रत्येक दसर्याला नवीन ड्रेस मिळेलच असे काही नसे, एखादवेळी मिळतही असे पण नसेल तरी ठेवणीतला ड्रेस घालून आम्ही तयार होत असू. ज्ञानेश्वर माउलींच्या मंदिरात सोने लुटणे हा कार्यक्रम असे. तिकडे बाबा आणि काका जात. तिथे आपट्याची फांदी आणलेली असे कुऱ्हाडीने त्याचे तुकडे करून प्रत्येकजण सोने लुटत असे. मग बाबा आणि काका सोने घेऊन येत. मग आज्जी, आई आणि काकू त्यांना ओवाळत असत. मग पाटावर तांदळाचा रावण केलेला असे. त्याचे पोट हातातल्या लुटून आणलेल्या सोन्यानी फोडून मग त्याच्या पोटातील सोने काढून देवासमोर ठेवायचे. देवाला नमस्कार करायचा अन घरातील मोठ्यांना नमस्कार करायचा. मग आम्हाला पण ओवाळालं जाई. मग आम्ही देवाला नमस्कार करून घरातल्या सगळ्या मोठ्यांना नमस्कार करत असू. मग ते घटामध्ये उगवलेलं धान्य काढून त्याचा तुरा पांढर्या गांधी टोपीत पुढे खोवायचा अन मग सोने वाटायला बाहेर पडायचे. त्यात सगळ्यात आधी आमच्या आळीत असलेल्या नरसोबाच्या मंदिरात जाऊन सोने देवापुढे ठेवायचे. नरसोबाच्या मादिरापाठीमागे मोठं पिंपळाचं झाड आहे अन त्याच्या भोवती मोठा पार आहे. काही मानसं तिथे बसलेली असायची. त्यांना सोने द्यायचे अन मग आळीतल्या प्रत्येकाच्या घरी जाऊन सगळ्यांना सोने देऊन, नमस्कार करून घरी यायचे. कपडे बदलून, हातपाय धुवायचे अन जेवण करून घ्यायचे आणि निवांत अंगणात चांदण्यात पडून राहायचे. थंड हवेच्या झुळकीने कधी डोळा लागायचा ते कळायचे पण नाही.

आता जर नीट बघितले तर वाटते की त्यावेळी किती साधेपणा होता तरीही किती आनंद होता. आता काळ बदलला अन आपला दसरा सुद्धा ग्लोबल झाला. मोठ्यांना नमस्कार करून सोने देऊन आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन साजरा होणारा दसरा आता "Happy Dusshera" झाला. मंदिरांच्या पेक्षाही जास्त सराफा दुकानदारांकडे जास्त गर्दी होऊ लागली. 

प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारून विजय संपादन केला. चांगल्याचा वाईटावर विजय झाला. त्यातूनच आपल्यातील वाईट गुणांचा ऱ्हास व्हावा किंवा ते गुण जळून खाक व्हावेत अन त्यासाठी प्रेरणा म्हणून प्रतीकात्मक रावण जाळण्याची पद्धत हि सुरु झाली. पण काळ किती बदलला पहा ....  आता लोक हे सिद्ध करू पाहतायत की प्रभू राम शूर वीर मर्यादा पुरुषोत्तम होते वगैरे ठीक आहे पण रावण सुद्धा चांगला होता, तपस्वी होता, त्याने माता सीतेवर कुठलीही जबरदस्ती केली नाही म्हणून सीता जशी होती तशी परत रामाला मिळाली. पण मुळात पार स्त्रीवर नजर ठेऊन तिचे अपहरण करून तिला असे सांगणे कि तू स्वतः होऊन माझ्याशी लग्न करायला तयार हो आणि तुझ्या मनाची तयारी होईपर्यंत मी वाट पाहतो हेच मुळात चुकीचे नाही काय?

कदाचित प्रभू रामचंद्र अंगीकारण्यापेक्षा रावण कसा चांगला होता हे सांगणे जास्त सहज सोपे वाटू लागले आहे अन मग आपण रावणासारखे वर्तन केले तरी हरकत नाही असे काहीसे वाटत असावे. यावर आता काय बोलावे? कालाय तस्मै नमः ......

©अभिजीत अशोक इनामदार
  कामोठे, नवी मुंबई  

No comments:

Post a Comment