Monday, 23 May 2016

बालपणीची शिदोरी (भाग १) (लेख)

"गणू .... अरे गणू .... ये काळ्या, पाणी दे रे जरा प्यायला"
आज्जीची अशी ही हाक मी लहानपणी कित्येकवेळा ऐकली होती. तिची बोलण्याची पद्धतच तशी होती. घरातल्या त्या ओसरीवर बसून येणाऱ्या जाणार्यांना हाक मारणे, कुठे चाललास काय काम आहे वगैरे विचारणे हा तर तिचा छंदच होता. किंबहुना तोच विरंगुळा होता तिचा. आजोबा गेल्यानंतरचा सगळा काळ तिनी त्याच ओसरीवर बसून काढला. हातात कायम जपाची माळ ओढत बसलेली असायची अन येणाऱ्या जाणार्याची चौकशी करत बसायची. येणारे जाणारे पण "काय माई बर आहे ना" अशी विचारपूस करायचे. सगळेच जण म्हणजे माझे बाबा अन काका सुद्धा तिला माईच म्हणायचे.  
आता ती थकली होती. तिच्या उमेदीच्या काळात तिनी बर्याच गोष्टी केल्या होत्या. तिचा गोरा रंग, तेल लाऊन फानिनी विन्चारलेले केस अन त्याचा बांधलेला आंबाडा, रुंद  कपाळावर मोठंसं कुंकू, नौवारी साडी सगळंच कसं छान होतं. तिनी तिच्या काळी खपली गहू कांडून, ते पाखडून मग ते जात्यावर दळून त्याच्या पोळ्या बनवून खाऊ घातल्या होत्या असे बाबा सांगायचे. आमच्या जन्माच्या आधीच गावात लाईट आली, पिठाची गिरणी आली त्यामुळे हे सगळं नंतर बंद झालं. घर शेणानी सारवून घेणे हे तर ती नेहमीच करत आली होती. आमचे आजोबा शिक्षक होते. परिस्थिती बेताचीच पण आज्जीनी कधी कुरकुर केली नाही. आहे त्यात नीट राहून सगळ्यांचं नीट संगोपन केलं होतं. अमुक एक नाही म्हणून कीटकीट केल्याचं कधी मी पाहिलं नव्हत. पण तिची बोलण्याची पद्धत मात्र एकदम तिरकस अशी होती.   
उन्हाळी सुट्ट्या लागल्या की माझे चुलत भाऊ वगैरे गावी घरी यायचे. मग काय खेळला उसंत नसायची, शाळांना सुट्ट्या लागलेल्या असायच्या. मी अन माझा चुलत भाऊ घराच्या जवळच घानपट्टी म्हणून भाग होता तिथे आंबे पडायला जायचो. माझ्या भावाचा नेम चांगला होता तो भरपूर आंबे पाडायचा. ते पाडून झाले की आमच्या घराजवळच नृसिंहाच मंदिर आहे अन त्याच्या मागे मोठा पिंपळाचा पार आहे, तिथे येउन बसायचो. आता कच्च्या कैर्या खाण्यासाठी आवश्यक सामग्री म्हणजे मीठ अन तिखट, ते आणण्याची जबाबदारी माझी असे. मी हळूच जाऊन मीठ अन तिखट कागदाच्या पुडीत बांधून आणत असे. पण कितीही हळू चालले तिखटाची बरणी उघडली तरी आज्जीला ते कळायचंच. आजोबा म्हणायचे "मांजर आलाय काय बघ स्वयंपाक घरात " तर आज्जी लगेच म्हणे "मांजर कुठले तुमचा काळा विठू आलाय तिखट मीठ न्यायला. आंबे पडले असतील ना" वरती मला परत "घरी पण आण रे कैर्या सगळ्या तिथेच संपवू नका गोड लोणचं करून देईन"
तिचं सोहळ मात्र कडक होतं. भलती शिवाशिव तिला अजिबात चालत नसे. एकदा उष्ट पाणी मी परत माठामध्ये ओतलं अन ते आज्जी नि पहिल अन इतका ओरडा दिला त्यानंतर आई बाबांनी जाम बदडून काढला मला. पण आज्जी मध्ये आली नाही शिस्त हि हवीच नाही ते लाड पुरवणार नाही असं तिचं म्हणणं होतं.
माझ्या लहानपणी (मी - १० वर्षांचा असताना) आमचा जोतीराम नावाचा शेतात काम करणारा वाटेकरी होता. तो आला की त्याचं अन आज्जीचा संवाद आगदीच लडिवाळ असायचा. आज्जीच एकही वाक्य त्याच्याशी बोलताना शिव्या घातल्या शिवाय काही पुरे होत नसायचं.
"जोत्या मेल्या आलास काय? काय शेतात काम करतोस का नुसता बोम्बलत गावभर फिरतोस सुक्काळीच्या".
जोतीराम: " आहो माई समदी आम करूनच आलू नव्ह आता. गावात काम व्हतं म्हणलं माई काय म्हणत्यात बघून जावं घराला"
आज्जी : " हम्म. रात्रीच्या वेळी शेताकडे जाऊन येतोस का नाही का पडतोस पडतोस बुड वर करून मड्यासारखा?"
जोतीराम : "जाऊन येतु तर त्या बिगर झ्वाप येतीय व्हय मला." जोतीराम मिस्किल पणे म्हणायचा.
मग असेच काही प्रश्न विचारून झाले कि आज्जीचा आईला किंवा काकूला हुकुम सुटायचा. "ऐकलस का वाटेकरी आलेत चहा पाठवा".
ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी बांधलेलं छानसं राम मंदिर आमच्या आमच्या गावी आहे. रामनवमीला रामाच्या मंदिरात मोठा उत्सव असे. आम्ही सगळे त्याला जात असू. रामजन्म झाला, सुन्तवड्याचा प्रसाद घेतला की आम्ही घरी जायला निघत असू. आज्जीनी चप्पल घातली नाही म्हणून मी घातलेली नसे. मला विना चप्पल उन्हात चालताना बघून अन उन्ह्नी माझे पाय भाजतायत हे चेहऱ्यावरून ओळखून आज्जी लगेच म्हणे "काय काळ्या विठू मी नाही आणली चप्पल म्हणून तू पण नाही आणलीस? आता काय भाजले ना पाय? सांग आता कोदंडधारी रामाला बाबा रे तुझ्या जन्मकाळास आलो ते पण अनवाणी, आता तूच सोडव ह्यातून"  ती काय म्हणतेय हे त्यावेळी कळायचं नाही पण त्यानंतर ती मला उचलून घेत असे कडेवर, माझ्या डोक्यावर तिचा पदर धरत असे आणि घरी घेऊन येत असे.              
त्या जुन्या घरचे दिवसच वेगळे होते. आज्जी गरम गरम ज्वारीची भाकरी करून द्यायची त्यावर तूप मीठ अन जोडीला पिठलं ह्या मेजवानीची सर आता कोणत्याही अन कितीही स्टार असलेल्या हॉटेलात गेलो तरी येत नाही. 
तिचे कितीतरी प्रसंग असेच डोळ्यापुढून जातात तिचा दरारा कायम तसाच होता. शेवटी शेवटी मात्र खूपच बोलणं कमी केला तिनी. माणसहि ओळखू शकत नसे. ती जायच्या आधी दोन महिने जेव्हा मी गावी गेलो होतो तेव्हा तिला भेटलो होतो, तेव्हा माझ्या चेहऱ्यावरून मायेनी हात फिरवून मला म्हणाली "बाळूचा गणु ना तू? बंगळूर ला असतोस ना? तसं लक्षात राहत माझ्या" असं म्हणून मिस्कीलपणे हसली. तोंडात एकुलता एक दात त्यावेळी लुकलुकताना दिसत होता. आता तर तिनी चालणं फिरणं पण बंद केलं होतं. खाणंपिणं पण बरच कमी झालं होतं. एकसारखी माळ हातात घेऊन रामनाम घेत पडलेली असायची. 

साधारण दोन महिन्यांनी, मी ऑफिसात असेन अन मला दादाचा फोन आला "गणू, आज्जी गेली..... लवकर निघ रे ...." अन अश्रूंचा बांध कोसळला.     

©अभिजित अशोक इनामदार
  नवी मुंबई ४१० २०९         

No comments:

Post a Comment