Monday, 23 May 2016

भुताटकी ... भाग १ (कथा)

भुताटकी ... भाग

लेखक: अभिजीत अशोक इनामदार
रात्रीची वेळ, सगळीकडे सामसूम झालेलं. रात्रीचे १० - १०.३० झाले असतील. पण शांतता अशी कि मध्यरात्र उलटून गेली असावी. दत्तू लोहार पाच मैल चालत आला होता. जेव्हा गावाच्या वेशीजवळ आला तेव्हा जरा थबकला...  वेशीजवळूनच बाणाई नदी वाहत होती. नदी पात्र एकदम शांत होतं. एका हातात ब्याट्री अन दुसर्या हातात चांगली जाड काठी पेलत झप झप पावलं उचलत चालला होता. मधेच कुठेतरी रातकिड्याचे कीर कीर आवाज येत होते. अशा भयाण शांततेत त्याची पायातली वहाण कर कर आवाज करत होती. तो आवाज सुद्धा मोठा वाटत होता. जसा तो नदी पात्राच्या छोट्या दगडी पुलाजवळ पोहला तसा अचानक तो थांबला कारण त्याच्या समोरच रस्त्याच्या मधोमध कुणीतरी कोंबडा मारून टाकला होता. बर कुठल्या वाहनांनी मारला म्हणावे तर ह्यावेळेला कुठली वाहने अन मुळात इथे जवळपास कोणाचं घर ना गोठा तर मग हा कोंबडा आला कुठून ... तो आणखी जवळ पोहचला तस त्याला कळले कि हे काही खरे नाही कारण हा कोंबडा अपघातांनी मेलेला नसून मुद्दाम कोणीतरी मारलेला .... किंवा बळी दिलेला आहे. कारण  त्याच्यावर भरपूर हळद कुंकू गुलाल अन बुक्का टाकलेला होता. बाजूलाच एक काळी बाहुली होती. तिच्यामध्ये असंख्य टाचण्या टोचलेल्या दिसत होत्या. तिच्यावर भरपूर हळद कुंकू गुलाल टाकलेला होता. बाजूलाच एक आर्ध चिरलेलं लिंबू होतं. ते असे चिरलेलं होतं कि मधोमध चिरलं होतं पण त्याचे दोन वेगळे तुकडे केलेले नव्हते. त्यामध्ये पण भरपूर हळद अन कुंकू भरलेलं होतं. हा नक्किच करणी किंवा भानामतीचा प्रकार असावा हे चटकन दत्तूच्या लक्षात आले. पण असेल कोणाच तरी काहीतरी असा विचार करून तो बाजूनी पुढे जायला निघाला. पण अचानक कुत्र्याचे रडणे अन एखाद्या लहानमुलाचे रडणे असा दोन्हीचा एकत्र आवाज घुमला. दत्तू परत चमकला त्यांनी आजूबाजूला ब्याट्रीचा उजेड टाकून बघितले. काहीच दिसले नाही. अजून दोन पावले टाकून तो पुढे गेला तर पाठीमागून शुक शुक असा आवाज आला. त्यांनी पुन्हा वळून बघितले. कोणीही नव्हते. आता नाही म्हटले तरी दत्तू सारख्या दणकट माणसाची सुद्धा टरकली होती. बळ एकवटून त्यानी "आर कोण हाय ?" असं विचारलं पण काहीच उत्तर आलं नाही. त्यानी पुन्हा चालायला सुरुवात केली तसे पुन्हा तसेच आवाज यायला लागले. शुक शुक ... शुक शुक पुन्हा वळून बघितले आवाज दिला तर कोणी नाही. आता मात्र तो घाबरला. झप झप पावलं टाकत तो चालू लागला ... चालू कसला जवळ जवळ धाऊ लागला. पण त्याला असे जाणवत होते कि कोणीतरी त्याच्या मागे धावतंय किंवा कोणीतरी मागे आहे पण मागे वळून बघण्याची हिम्मत होत नव्हती. त्याला तो भरपूर धावला तरी एवढंसं पुलाच अंतर कसे संपे ना हे काळात नव्हते. आता तर चित्र विचित्र आवाज जोर जोरात येत होते. धावता धावता एका दगडाला तो ठेचकाळला .. अन तोंडावर  पडला. नाकातून रक्त यायला लागले. आता त्याला घर्र्र घर्र असे आवाज ऐकू येऊ लागले पाठोपाठ सप सप आवाज येत होते. आता तो बळ एकवटून उठला अन धावत सुटला. नाकातून अन पायातून रक्त वाहत होते पण तो थांबला नाही. सरळ घरी पोहचला अन मगच थांबला. घरी पोहचे पर्यंत त्यानी मागे वळून पाहिले नाही. घाबरलेला दत्तू काहीच बोलेना .... मग घरच्यांनी त्याच्या जखमांना औषध लावून त्याला झोपवलं अन सकाळी बघू म्हणून झोपी गेले.
सकाळी उठल्यापासून दत्तू झपाटल्यासारखा वागू लागला, एकटक कुठेतरी नजर लाऊन बसू लागला, काही बाही बरळू लागला. बर्याच प्रयत्नांनी मग त्यानी आदल्या रात्री झालेला प्रकार सगळ्यांना सांगितला. नदीच्या पुलावर भूत पाहिल्याचं त्यानी सगळ्यांना सांगितले. असल्या गोष्टी गावात लपून राहत नाहीत.... कानोकानी गोष्ट गावभर झाली. पोरा ठोरांनी जाऊन नदीवर जाऊन पाहिले तर तिथे दत्तू नी सांगितलेल्या गोष्टी जशाच्या तश्या होत्या. अन मग त्या दिवसापासून भुताटकीच्या गोष्टीना उत येऊ लागला. कोणाला नदीच्या पुलावर दत्तू सारखेच आवाज ऐकल्याचा भास होई तर कोणाला छन छन असा पैंजणाचा आवाज ऐकू येई तर कोणी म्हणे लहन मुलगा अन कुत्र्याच्या रडण्याचा आवाज ऐकला. ह्यात काही जन आपल्या मनाच्या गोष्टीहि वाढवून सांगू लागले. दर पंधरा दिवसांनी नदीच्या दगडी पुलाजवळ काळी बाहुली कोंबडा किंवा अजून काही काही सापडू लागले. एकूणच काय तर "नदीजवळ जाम डेंजर भूत हाय वो" हे वाक्य आता कोणीही कधीही बोलत असे. अन नेहमी कोणी कोणी संध्याकाळी पुलावरून येताना काय अनुभव आला ते सांगत असे. पण ह्या प्रकारामुळे एक झाले कि लोक रात्रीचे नदीकडे जायला घाबरू लागले. कोणीही रात्री उशिरा पुलावरुन परतण्याच्या नादात पडता दिवस उजेडी परतू लागले.

(क्रमश:)

©अभिजीत अशोक इनामदार
  कामोठे नवी मुंबई               

No comments:

Post a Comment