काय की कोण पण मन आज हळवं झालाय
लिखाण : अभिजीत अशोक इनामदार
माझ्या सारखेच खेडेगावात जन्मलेल्या,
लहानपण तिथेच घालवलेल्या अन आता पोटासाठी शहरांकडे येउन राहेलेल्या मनाची हालत कशी
असते पहा. त्यांचं मन नेहमी आपल्या बालपणीच्या आठवणी रमलेल असतं. त्यांचं मन नेहमी
त्यावेळच्या (बालपणीच्या गावाकडच्या जगण्याच्या) गोष्टी अन आत्ता इथे अनुभवत असलेल्या
इथल्या गोष्टी यांची तुलना करत असते. ते मन... त्याला काय वाटते हे जर बोलू लागले तर
काय म्हणेल.... त्यावरती भाष्य करणारी ही कविता.
गावच्या जागा गावच्या गप्पा कितीही
आठवून सरत नाहीत
गावच्या नद्या अन ओढ्यांच खळखळ
वाहणं विसरत नाही
पिंपळाच्या सावलीतला सूरफाट्यानचा
डाव काही संपत नाही
पांदीतल्या आंब्याच्या कैऱ्या
खाणं काही चुकत नाही
पावसामध्ये खोप घालून धावत सुटणं
काही थांबत नाही
पाटातल्या पाण्यामधील पकडा पकडी
काही थांबत नाही
आंब्याखालच्या जेवणाची चव जिभेवरून
जात नाही
उंच टोकावरच्या कोकिळेची कुहु
कुहु काही थांबत नाही
संध्याकाळची शुभंकरोती देवघर
अंगण डोळ्यापुढून हटत नाही
पावसामाधला भोंडला अन खिरापती
काही थांबत नाहीत
अजून किती नि काय काय .... काय
काय आठवू ते कळत नाही
गाव सुटला अन माया तुटली माती
आपली राहिली नाही
गावाचा वारा कधी इकडच्या बाजूस
फिरकत नाही
अवखळ असा बेभानपणा त्याच्या अंगी
उरला नाही
इथल्या जागा अन गप्पांना गावची
सर येत नाही
गाव गप्पा करत बसणं इथे कुणाला
साधत नाही
कचरा अन प्लास्टिकमुळे इथल्या
नद्या थकल्या आहेत
थकून भागून अडखळून त्या खळखळ
वाहणं विसरल्या आहेत
शितल छाया देणारा पिंपळ इथे उरला
नाही
सूरफाट्या नामक खेळ असतो हे इथल्या
मुलांना ठाऊक नाही
आंब्यावरच्या कैऱ्या इथे दगड
मारून मिळत नाहीत
दहा रुपयांच्या एका कैरीला मासाल्यानेही
चव येत नाही
पावसाची इथल्या अजब गोष्ट खोपिनी
इथे भागत नाही
पाटाबाहेर आयुष्यातली पकडा पकडी
इथे थांबत नाही
पक्वनांचे ताट भरलेले पण मायेचा
ओलावा नाही
कुहु कुहु ती कोकिळा कानी गुंजन
करीत नाही
शुभंकरोतीच्या वेळी माणूस आपल्या
घरी पोहचत नाही
कसला भोंडला अन कसली खिरापत इथे
काहीच दिसत नाही
अजून किती नी काय काय.... काय
सांगावं ते कळत नाही
इथल्या गोष्टी इथली तक्रार कोणाजवळही
मांडवत नाही
कोणेकाळी मनामध्ये भावभावनांची
दाटी होती
माझे मित्र माझी नाती यांचीच
सारी रेलचेल होती
काळाच्या ओघात मात्र भावभावनांची
माती झाली
मित्र नातेवाईकांची जागा आता
चाट विंडो व फोन कॉल झाली
आज…. मन कसं भारावून गेलंय
का नी कसे कोणास ठाऊक पण सारं
पेटून उठलय
आयुष्यातील काही क्षणांचं पुन्हा
फिरून वादळ उठलय
काय की कोण जाणे पण मन आज हळवं
झालय...
©अभिजीत अशोक इनामदार
कामोठे, नवी मुंबई.
No comments:
Post a Comment