Monday, 23 May 2016

रण संग्राम (भाग ३) (कथा)


रण संग्राम (भाग ३)

दिनांक : ११ फेब्रुवारी २०१६
अभिजीत अशोक इनामदार 

तिसर्या दिवशी भल्या पहाटे राजांनी प्रधानजी आणि सेनापतीना आपल्या महालात बोलावून घेतले. ताबडतोब कूच करण्यची तयारी करण्या संदर्भात सूचना केल्या. राजांनी अचानक घेतलेल्या ह्या निर्णयाने दोघेही जरा आश्चर्यचकित झाले पण आपापल्या कामाला निघून गेले. काही वेळातच सगळ्या गोष्टींची पूर्तता झाल्याचे राजांना समजले. राजा धर्मसेन लढाईचा वेश धारण करून आपल्या महालातून बाहेर पडला. राणी सत्यवतीने त्याला कुमकुम तिलक लाऊन ओवाळले. यशस्वी होऊन परतण्यासाठी देवीजवळ मागणे घातले. राजाने कुलदेवी काळभैरवीचे दर्शन घेतले अन आपल्या सैन्य सागराकडे आला. ह्यावेळच्या लढाई मध्ये काहीतरी वेगळेपण आहे हे साऱ्यांनाच जाणवत होते कारण राजांनी हत्ती दळ वेशीपाशी आणून थांबवण्याची सूचना केली होती. त्रीदश सहस्त्र सैन्य घेऊन राजा धर्मसेन बाहेर पडला. वेशीजवळ येताच त्याने स्वतः हत्ती दळ कसे अन कोठे उभे करायचे याच्या सूचना दिल्या. त्या दलाच्या प्रमुखांना आपल्या आदेशाशिवाय जागा सोडण्यास मज्जाव केला. चुकून शत्रू सैन्य वेशी जवळ पोहचलेच तर काय करायचे याचा आदेश दिला.

बाकीच्या सैन्याला पुढे कूच करण्याचा आदेश मिळाला. काही वेळातच सैन्य बरेच अंतर पार करून पुढे आले. आता पुढे अवघड खिंडीसारखा रस्ता होता. अन त्याच्या दोन्ही बाजूना उंचच उंच पर्वत रांगा होत्या. खिंडीच्या अलीकडेच राजांनी सैन्याला थांबण्याचा आदेश दिला. असे मधेच थांबण्याचा आदेश ऐकून सगळ्यांना जरा अचंबित व्हायला झाले. राजांनी सैन्याला थोडा विश्राम करण्यास सांगितले. स्वतः एका प्रशस्थ वटवृक्षाखाली थांबला. काही क्षण शांततेत गेले अन खिंडीच्या दिशेने घोड्यांच्या टापांचा आवाज आला. सगळ्यांनी चमकून त्या दिशेला पाहिले. राजा स्वतः उठून रस्त्यावर आला. शत्रू सैन्य आले कि काय असा विचार करून सेनापतींनी लगेच सैनिकांना मोर्चे बांधणी करायला लावली. राजा धर्मसेन भोवती खास सैनिकांचे कडे तयार केले. सगळे कान लाऊन येणाऱ्या आवाजावर लक्ष ठेऊन होते. टापांचा आवाज वाढतच होता आणि त्याबरोबरच धुळीचा लोट सुद्धा आला होता म्हणजेच ते सैन्य जवळ आले होते तर... काही क्षणांच्या अवधीतच पहिला घोडेस्वार नजरेत आला. अन पाहता पाहता एक एक घोडेस्वार दिसू लागले अन काय आश्चर्य हे सगळे धर्मपुरीचेच सैन्य होते. दौडत दौडत राजांचा एक सरदार जवळ पोहचला. राजा धर्मसेन दिसताच त्याने घोड्यावरून खाली झेपावला अन चालत राजाकडे निघाला. राजा आता सगळे सैन्य बाजूला करून पुढे आला. त्याची उत्सुकता ताणली गेली होती. त्याचा विश्वासू सरदार विश्वासराव समोर आला. त्याच्या चेहऱ्यावर हसू होते. त्याने राजाला वंदन केले. दोघांची नजरा-नजर झाली. पाठोपाठ आणखी घोडेस्वार आले. हिम्मतराव अन त्यांचे सहकारी आले होते. विश्वासराव म्हणाले "राजे तुम्हाला जी शंका होती ती खरी ठरली. अन हिम्मतरावांनी ज्या तातडीने गुप्त संदेश पोहचवला त्याबद्दल काय बोलू"? धर्मसेन म्हणाला "म्हणजे आमचा अंदाज खरा ठरला तर... कुठे आहे तो..." आता मात्र सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली. राजा अन विश्वासराव कोणाबद्दल बोलताहेत तेच कळेना. राजांनी मानेनेच खुणावले तसे विश्वासराव वळून म्हणाले "आणा रे त्या राजांना". तसे बेड्या घातलेल्या राजा कपिलसेनला आणले गेले. राजा कापिलसेनला राजा धर्मसेन कडे बघण्याचीही हिम्मत होत नव्हती. प्रधानजी आणि सेनापती ह्यांना तर कळेचना कि हे काय चालू आहे ते. प्रधानजी चाचरत म्हणाले "राजन हे काय"? "आम्ही सांगतो" हिम्मतराव म्हणाले. " हे सुरजनगरीचे राजे दिसतात तितके सरळ नाहीत. एक नंबरचे दगलबाज आहेत. आपल्यचं शत्रूशी हातमिळवणी करून आपल्या विरुद्ध कारस्थान रचलय ह्यांनी… त्या दिवशी राजांनी आम्हाला परत सुरजनगरी अन ह्या पर्वतरांगांमधील पायवाटा ह्यांवर लक्ष ठेवायला सांगितले होते. मी आणि माझे सहकारी ह्या डोंगर दर्या आणि जंगल पार करून पाहून आलो. त्रीविक्रमाशी हातमिळवणी करून आपले राज्य त्याच्या ताब्यात द्यायचा डाव होता ह्या कपिलसेनचा. पण आम्ही आम्ही तो राजे अन विश्वासराव ह्यांना कळवला".

तिथून पुढे विश्वासराव बोलू लागले "आम्हाला राज्यांनी निघण्यापूर्वीच हि शक्यता बोलून दाखवली होती अन एकदम सावध राहण्यासाठी बजावले होते. आम्ही सुरजनगरीच्या वेशिबहेरच थांबलो होतो. दोन्ही बाजूला उत्तर आणि दक्षिण दिशेला धुळीचे लोट हवेत दिसत होते म्हणजे त्रिविक्रमाच्या फौजा डोंगर चढून आपल्या राज्याकडे कूच करीत असणार हे कळून चुकले. ह्या कपिलसेनची फौज आम्ही पूर्णपणे आत शहरात येण्याची वाट बघत होती. आम्हाला हिम्मतरावांकडून योउग्य तो संदेश मिळाला होता कारण कापिलसेनचा जो सेवक संदेश घेऊन आला होता तो आम्हाला चुकवून डोंगरांच्या दिशेने जात असताना हिम्मतरावांना सापडला अन सगळा उलगडा झाला. त्यांनी लगेच आम्हाला संदेश पाठवला. मग काय आमची वाट बघत असलेल्या सुरजनगरीचा आम्ही चांगलाच समाचार घेतला. आमच्या फौजेची कत्तल करण्याच्या इराद्याने आमची वाट बघत थांबलेल्या सुरजनगरीच्या फौजेवर आम्ही मध्य रात्री हल्ला बोल करू हे ध्यानी मनीही नसावे. अर्धवट पेंगुळलेल्या अन गाफील अशा फौजांचा काही वेळातच फडशा पाडून पहिला त्यांच्या ह्या दगाबाज राजाला जेरबंद केला. त्या बरोबर बाकीच्यानी शस्त्रं खाली ठेवली. मानाजीरावांना आर्धी फौज देऊन आम्ही इकडे आलो. आता मानाजीरावांनी सुरजनगरीवर आपली पताका लावलीय. तीन पिढ्यांच्या सलोख्याची ग्वाही देणार्याने असा दगा केला अन म्हणूनच आम्हाला पण असं वागावं लागलं”.

राजा धर्मसेन म्हणाला "कपिलसेन तुम्ही तर मैत्री अन सलोख्याच्या गोष्टी करत होतात? हीच का तुमची मैत्री? अन हाच का तो सलोखा? हीच का तीन पिढ्यांची विश्वासार्हता? मला लाज वाटते तुम्हाला कधी काळी मी आपला मित्र समाजात होतो ह्याची...” कपिलसेन काहीच बोलू शकला नाही. विश्वासरावांकडे वळून राजे बोलले “विश्वासराव पण अजून आपली पूर्ण फत्ते नाही झाली आत्ताशी हा दगलबाज हाती आला आहे. अजून त्रिविक्रमाच्या फौजांवर विजय मिळवायचा आहे.". विश्वासराव म्हणाले "होय राजे आता पुढची कामगिरी सांगा ... हा विश्वासराव आपल्या मातृभूमीसाठी हे शिरकमल उतरून द्यायला तयार आहे". राजा धर्मसेन बोलले “विश्वासराव तुमच्या सारख्या माणसांमुळेच आपले राज्य अन त्याची सुरक्षितता टिकून आहे. पण तुमच्या सारखे जीव लावणारे अन जीव ओवाळून टाकणारे मातृभक्त योध्ये ह्या धर्मपुरीला हवे आहेत. तुमच्या तोंडून शत्रूच्या शिरांना कलम करण्याची भाषा शोभते ही असली नव्हे.” राजांनी आपल्या विश्वासू मंडळीना एका बाजूला घेतले. हिम्मतरावांना त्रिविक्रमाचे सैन्य कसे अन कोणत्या बाजूने येत आहे ते विचारून घेतले. अन पुढची आखणी सुरु केली.

 (क्रमश:)

 ©अभिजीत अशोक इनामदार
  नवी मुंबई, कामोठे      

No comments:

Post a Comment