रण संग्राम (भाग ५)
दिनांक : १६ फेब्रुवारी २०१६
लिखाण: अभिजीत अशोक इनामदार
तीकडे दक्षिणेला विश्वासराव प्राणपणाने
झुंजत होते. त्रिविक्रमाची त्या बाजूची अर्ध्याहून अधिक फौज त्यांनी कापून काढली होती
पण त्याचबरोबर त्यांची सुद्धा बरीचशी फौज खर्ची पडली होती. पण आता त्याची परवा कुणालाच
नव्हती. सगळीकडे मृत सैनिकांच्या प्रेतांचे खच पडले होते, रक्ताचे पाट वाहत होते पण
लढाई सुरूच होती.
इकडे उत्तरेला अचानक त्रीविक्रमाने
दिलेला संदेश घेऊन त्याचा खास सरदार पर्वताच्या मध्यावर आला जवळच्या सैनिकांना त्याने
काहीतरी सांगितले... ते सैनिक थोडे गोंधळले पण त्रीविक्रमाचा हुकुम होता अंमलबजावणी
तर व्हायलाच हवी. अन अचानक... त्रिविक्रमाची फौज पर्वताच्या माथ्याकडे धाऊ लागली होती.
त्रिविक्रमाच्या फौजा शत्रूला पाठ दाखवून पळत होत्या. सेनापतीना एकदम आनंद झाला
"अरे कुठे जाता असे पळून... हल्ला करा... कोणालाही सोडू नका" सेनापतींचा
आदेश ऐकून धर्मपुरीचे सैन्य आणखीनच चवताळले अन अजून त्वेषाने हल्ला चढवण्यासाठी वरती
चढू लागले. मध्यावर असलेली त्रिविक्रमाची फौज बर्यापैकी वरती चढून गेली अन त्यांच्या
मागे धर्मपुरीचे सैन्य.... अन अचानकच वरती धावणारे त्रिविक्रमाचे सैन्य जगाच्या जागी
झोपले... हे असे काय झाले? हा नक्की काय प्रकार झाला हे सेनापती विचार करत होते. पण
दुरून बघणाऱ्या राजा धर्मसेनच्या लक्षात हि खेळी आली. त्याचा चेहरा काळवंडला त्याला
चिंतीत बघून प्रधानजी म्हणाले "राजन आपली दोन्ही आघाडींवर सरशी होताना दिसत आहे...
तरीही तुम्ही चिंतीत का आहात"? राजा म्हणाला "प्रधानजी आपल्या सैन्याला पर्वताच्या
पायथ्याशी यायचा हुकुम पाठवा..." प्रधानजी आश्चर्याने म्हणाले "राजन
...." राजा धर्मसेन म्हणाला “आत्ता... लगेच... ताबडतोब" राजाचे ओलसर डोळे
बघून प्राधानजींनी लगेच तसा हुकुम पाठवला पण तो पर्यंत उशीर झाला होता. त्रिविक्रमाची
खालून वरती गेलेली फौज खाली झोपल्या बरोबर वरून पाठीमागच्या त्याच्या सैन्याने धर्मपुरीच्या
सैन्यावर वरतून भाले, दगड, गोटे यांचा वर्षाव सुरु केला. ह्या अचानक हल्ल्याने धर्मपुरीचे
सैन्य भांबावले... त्यांना प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही. आकाशातून पाउस पडावा
त्याप्रमाणे अनेकानेक गोष्टी सू सू करीत त्यांच्या डोक्यात, चेहऱ्यावर, पाठीवर, पोटावर
पडत प्रहार करीत होत्या. हीच ती त्रिविक्रमाची खेळी होती... सहज लढून विजयश्री मिळत
नाही म्हणून मग त्याने हि खेळी खेळली होती. अर्थातच असल्या लढायांमध्ये ना कसले नियम
ना कसले करार… शत्रूचा कोणत्याही मार्गाने संहार करायचा हे एकच उदिष्ट. त्रीविक्रमाला
ह्या आधी कुठल्याची ठिकाणी एवढी कडवी झुंज मिळाली नव्हती. एवढे चिवटपणे अन कुठल्याही
ठिकाणी लढणारे सैन्य त्याने पाहिले नव्हते. आपली एवढी सगळी शूर फौज अशा ठिकाणी खर्ची
पडताना बघून त्याचा राग उसळत होता. त्याने सोबत आणलेल्या एकूण फौजेच्या २ त्रितीअंश
फौज त्याने आत्तापर्यंत त्याने गमावली होती. हाती आसलेल्या फौजेला सोबत घेऊन काहीही
करून धर्मपुरी त्याला जिंकायची होती.
धर्मपुरीच्या सैन्याची दाणादाण
उडाली होती. प्रधानजीनी पाठवलेला संदेश मिळाला होता. सेनापती आपल्याला माघार घ्यावी
लागतीय ह्या विचाराने कासावीस झाले पण "शक्य तेवढे जीव वाचवा" हे संदेशातले
वाक्य खूप महत्वपूर्ण होते कारण आता त्यांच्या जवळ फक्त पंच सहस्त्र सैन्य शिल्लक होते.
जमेल तेवढे सैन्य खालच्या बाजूला सरकत होते. पण जागोजागी पडलेले शत्रू सैन्य, आपले
साथीदार, त्यांची शस्त्रे ह्यातून अन वरून होणारा मार झेलत त्याना खाली उतरणे अवघड
होत होते. आता वरचे दगड भले संपले असावेत म्हणून मग वरतून मोठ मोठ्या शिळा गडगडत खाली
येऊ लागल्या. त्यांच्या पाठोपाठ लाकडी ओंडके येऊ लागले अन धर्मपुरीचे सैन्य आणखीनच
मारले जाऊ लागले. कोणातरी त्रिविक्रमाच्या सैन्याने लाकडी ओंडक्याला मशाल लावली अन
पेटते ओंडके खाली येऊ लागले. अन उत्तर पर्वतावर मृत्यूचे थैमान सुरु झाले. पेटत्या
ओंडक्यांमूळे आजूबाजूची सुकलेली झाडे पेटू लागली. ती आग पसरत पसरत खालच्या बाजूला येऊ
लागली. मृत सैनिकांच्या शवांना हा अशा प्रकारे भडाग्नी मिळाला. जे जिवंत होते पण जखमी
होते… उठून जाऊ शकत नव्हते त्यांना देखील ह्या आगीने भस्मसात करून टाकले. त्यामध्ये
दोन्ही बाजूचे सैन्य होते. त्या सैन्यांचा आक्रोश पर्वतभर भरून राहिला. राजा धर्मसेन
अन त्रिविक्रम हतबल पणाने ह्या संहाराकडे पाहत होते. सगळीकडे धूर भरून राहिला होता. राजा धर्मसेन ने
बंदी बनवलेल्या कपिलसेन कडे पाहिले अन म्हणाला "पाहिलेत राजे शत्रूशी हातमिळवणी
केल्याचा परिणाम"? कपिलसेन काही बोलू शकला नाही.
आता पर्वताच्या शिखाराकडील हालचाली
धुरामुळे अस्पष्ट झाल्या होत्या. हीच योग्य वेळ आहे हे राजाने ओळखले आपले सगळे शिल्लक
सैन्य त्याने गोळा केले. अन पुढील सूचना दिल्या. त्रीविक्रमाला आजची रात्र पुन्हा पर्वतावर
काढायची नव्हती त्याने त्याच्या शिल्लक फौजेला पुढे जाउन आग विझवून तसेच पुढे कूच करण्याचे
हुकुम दिले. आग विझवण्यासाठी ओल्या झाडाच्या फांद्या, माती अशी सापडतील ती साधने वापरीत
त्रिविक्रमाची फौज पुन्हा पायथ्याकडे सरकू लागली. वाटेत कुठे आग असेल तर ती विझवून
किंवा दुसरीकडे जिकडे आग नाही अशा ठिकाणाहून ते पुढे सरकू लागले. आता उन्ह कलतीला लागली
होती. सूर्यास्ताला तसा थोडा अवधी होता. अजून निर्णायक लढाई संपली नाही हे धर्मसेन
जाणून होता अन म्हणूनच त्याने पुढची आखणी केली होती.
आपली सगळी शिल्लक फौज घेऊन त्रिविक्रम
स्वतः खाली उतरत आहे हे बघून राजा धर्मसेन सुद्धा तयार झाला. धुरातून, आगीतून, अर्धवट
जळलेल्या सैनिकांच्या प्रेतांतून वाट काढीत त्रिविक्रम खाली सरकत होता. त्याच्या भोवती
त्याच्या खास सरदारांचे कडे होते. शिरस्त्राण धारी राजा त्रिविक्रम एका उमद्या सफेद
घोड्यावरून येत होता. राजा धर्मसेनने त्याची फौज पायथ्यापासून बरीच मागे आणून उभी केली
होती. एका छोट्या टेकडीवजा जागेवरून तो पुढील हालचाली टिपत होता.
तिकडे दक्षिणेला विश्वासरावांचे
दोन खास सहकारी सरदार धारातीर्थी पडले होते. आता त्रीविक्रमाचा फक्त एकाच मुख्य सरदार
समशेर प्राणपणाने लढत होता. सैनिकांचा खच पडला होता. उत्तरेला झालेला संहार दोन्हीकडचे
सैन्य पाहत होते. विश्वासराव भाल्याचा एक अन तलवारीचा एक असे दोन घाव झेलून घायाळ झाले
होते पण तरीही ते आवेशाने लढत होते. आपल्या साथीदारांना आपल्या कृतीतून प्रोत्साहित
करीत होते. अन अशातच समशेर अन त्यांची नजरा नजर झाली. दोघेही एकमेकांवर चालून गेले
अन दोघांचे तुंबळ युद्ध पेटले. एकजण आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी तर एकजण आपल्या
राजाच्या सार्वभौम राजा होण्याच्या स्वप्नासाठी लढत होता. दोघेही वीर योध्ये होते एकमेकांवर
वरचढ होण्याचा प्रयत्न करीत होते पण कोणीच कमी नव्हते. तलवारीच्या प्रत्येक घावाबरोबर
दोघेही आपले कसब पणाला लावत होते. आजूबाजूला दोन्ही बाजूला आता खूपच कमी शिल्लक राहिलेले
सैनिक आपण लढायचे सोडून आपल्या ह्या सरदारांची लढाई बघण्यासाठी थबकले पण काही क्षणातच
पुन्हा आपली लढाई त्यांनी सुरु ठेवली. कारण जो सरदार विजयी होईल त्याला त्याचे सैन्य
लढायचे सोडून असे लढाई पाहत थांबलेले खचितच आवडणार नाही हे त्यांना माहिती होते.
तिकडे त्रिविक्रमाची फौज आता
पायथा जवळ करीत आली होती. पण समोर असलेली शांतता त्रीविक्रमाला आश्चर्यचकित करत होती.
सकाळची आठवण होऊन त्याने सावधपणे आजू बाजूच्या झाडांमागे अन इतर कुठे शत्रू सैन्य लपले
आहे काय हे बघण्याचा हुकुम दिला. पण तसे कोणीच दिसले नाही. आता धर्मसेन कोणाची खेळी
खेळतोय हे बघायला तोही उत्सुक होता अन अचानक...
(क्रमश:)
©अभिजीत अशोक इनामदार
नवी मुंबई, कामोठे
No comments:
Post a Comment