रण संग्राम (भाग ४)
दिनांक : १२ फेब्रुवारी २०१६
अभिजीत अशोक इनामदार
राजा धर्मसेन, प्रधानजी, सेनापती,
विश्वासराव आणि इतर मान्यवर सरदार सर्वांनी विचार विनिमय करून आखणी केली. विश्वासरावांनी
पुन्हा सुरजनगरीच्या मार्गाने खिंडीपुढेजाउन दक्षिणेकडच्या पर्वत रांगांच्याबाजूने
त्रिविक्रमाच्या फौजेवर हल्ला करायचा असे ठरले. त्यासाठी त्यांच्या सोबत आणखी काही
सरदार देण्यात आले. अर्थात हे अतिशय कठीण असे काम होते. कारण त्या बाजूला मुळातच रहदारीचा
रस्ता नव्हता, अवघड पर्वतरांगा अन जंगल अन त्यातून जाणारी बिकट वाट असे दुहेरी आव्हान
होते. पण आपल्या राज्याच्या रक्षणार्थ आपल्या प्राणांचीही पर्वा न करता ही अवघड कामगिरी
घेण्यास विश्वासराव अन त्यांचे सहकारी आगदी सहज तयार झाले. राजांनी बरोबर आणलेल्या
ताज्या दमाच्या फौजेतील आर्धी फौज विश्वास रावांबरोबर दिली. स्वतः राजा धर्मसेन आणि
बरोबरची राहिलेली आर्धी फौज इथेच थांबून खिंडीच्या बाजूने किंवा उत्तरेच्या डोंगरांवरून
येणाऱ्या फौजेचा सामना करणार होते. सर्वांनी आपली कुलदेवी काळभैरवीची करुणा भाकली.
देवीचा जयजयकार करून या रणात यश देण्याची विनवणी केली. राजांनी सर्वाना प्रोत्साहित
केले अन विश्वासराव आणि त्यांची फौज रवाना झाले.
विश्वासराव अन त्यांचे साथीदार
गेल्याची साक्ष दूर गेलेल्या घोड्यांच्या टापांचा आवाज देत होता. हळू हळू तो आवाज कमी
कमी होत गेला. उडालेली धूळ खाली बसू लागली. नकोशी शांतता सगळीकडे पसरली. कुठे घोड्यांच्या
फुरफुरण्याचे आवाज येत होते तेच काय ते शांतता भंग करत होते बाकी सगळेच शांत होते.
खिंडीच्या तसेच उत्तरेच्या पर्वतरांगांवरील पाय वाटेकडे सगळे लक्ष देऊन बसले होते.
शत्रूला अंदाज येऊ नये म्हणून बरेचसे सैन्य अलीकडच्या वळणावर सावध उभे होते. काही जंगलांच्या
दिशेने पेरून ठेवले होते. उंच झाडांच्या टोकावर चढून बहादूर सैनिक लांबून येऊ घातलेल्या
शत्रूवर नजर ठेऊन होते.
काही वेळातच उत्तरेच्या पर्वतरांगांच्या
वरच्या बाजूला हालचाल दिसू लागली होती. हळू हळू त्रिविक्रमाच्या फौजा रात्रीच्या अंधारात
पर्वत चढून वरपर्यंत पोहचले होते. इकडे धर्मसेनने शत्रू टप्प्यात आल्याशिवाय हल्ला
करायचा नाही अशी सक्त ताकीत सर्वाना दिली होती. सकाळचं कोवळं उन्ह संपून आता कडक उन्हाचा
कडाका सुरु झाला होता. त्रिविक्रम स्वतः ह्या उत्तरेकडून येणाऱ्या फौजेचे नेतृत्व करीत
होता. कितीही अडचण आली तरी आपली इच्छा पूर्ण करायचीच अन धर्मपुरच्या राज्यावर विजय
संपादन करायचा हे त्याने ठरवले होते. आज सकाळी आलेली खबर तितकीशी चांगली नव्हती...
धर्मसेनला कुणकुण लागून त्याने सुरजनगरीवर हल्ला बोल केला होता. कपिलसेनला जेरबंद केले
होते. पण त्याचे सैन्य अजून सुरजनगरीमध्ये असेल अन ते परतण्यापूर्वीच आपण धर्मपुरच्या
राज्यावर पोहचलो असू. त्यासाठीच आपण ह्या पर्वतरांगांच्या बाजूने जाण्याची शक्कल लढवली.
स्वतःच्याच बुद्धीचातुर्यावर हसत त्रिविक्रम आपल्या फौजेला भर भर पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित
करीत होता. खरेतर त्याचे राज्य उत्तर बाजूला सपाटीवर होते. त्याच्या फौजेला असल्या
जंगलांची अन पर्वत चढण्याची सवय नव्हती. रात्रभर मशालींच्या उजेडामध्ये फौजेला पुढे
जाण्यास उद्युक्त करून तो इथपर्यंत घेऊन आला होता. अवघड वाटेमुळे बरेचसे जड असे लढाई
साहित्य त्याने बरोबर आणले नव्हते. कित्येक सैनिकांनी घोडे न आणता चालत चढण पूर्ण केली
होती त्यामुळे बरेचजण दमले होते. पण त्रीविक्रमाला हि संधी हाताची जाऊ द्यायची नव्हती.
आपले मनुष्यबळच विजयी होण्यासाठी उपयोगी पडेल अशी त्याची खात्री होती. त्याच्या सोबत
त्रिदश सहस्त्र फौज होती आणि आणखी तेवढीच फौज त्याने सुरजनगरीला वळसा घालून दक्षिण
पर्वत रांगांकडून धर्मपुरीवर धाडली होती. त्रिविक्रमाची फौज खाली उतरत होती एक प्रकारची
भयाण शांतता वातावरणात होती. पहिली तुकडी पायथ्याजवळ पोहचली तसा एक उंच झाडावरून मोठा
करण्याचा आवाज झाला अन अचानक धर्मपुरीचे झाडात अन आजू बाजूला लपलेले सैन्य त्रिविक्रमाच्या
फौजेवर तुटून पडले. बेसावध सैन्यावर हा असा अचानक हल्ला झाला तो त्यांना सहन झाला नाही.
फौजेमध्ये हाहाकार उडाला. त्यांना काही कळायच्या आतच त्यांची पहिली एक तुकडी धर्मपुरीच्या
सैन्याने गारद केली होती. आता धर्मपुरीच्या सैन्यामध्ये जोश आला होता. ते हळू हळू पुढे
सरकत होते. तसेच त्रिविक्रमाच्या फौजही सावध झाल्या होत्या. त्यांनीही आपल्या तलवारी
उपसून लढाई सुरु केली होती. आता युद्धाला तोंड फुटलं होतं.
तिकडे विश्वासराव आणि सहकारी
दक्षिण पर्वताच्या पायथ्यापासून चढून वरती पोहचले होते. त्रिविक्रमाची फौज आता पर्वत
उतरून खिंडीकडे निघाली होती. त्या बेसावध फौजेवर विश्वासरावांनी हल्ला बोल केला होता.
त्रिविक्रमाची दमलेली फौज अचानक झालेल्या हल्ल्याने गांगरून गेली होती. शिवाय त्रिविक्रम
सोबत नसल्याने त्याचा सरदार फौजेला लढण्यासाठी उद्युक्त करत होता तो पर्यंत विश्वासरावांनी
त्यांच्या बर्याचश्या फौजेला कापून काढले. मग त्रिविक्रमाची फौज चवताळून उठली अन मग
घनघोर युद्धाला तोंड फुटले होते.
आता दोन्ही आघाड्यांवर युद्ध
सुरु झाले होते. राजा धर्मसेन दोन्ही बाजूला लक्ष ठेवून होता. आवश्यक आदेशांचे संदेश
दुतांकरवी पाठवत होता.
कधी सरशी तर कधी माघार असा हा
खेळ दोन्ही बाजूला बघायला मिळत होता. दक्षिणेकडे बर्यापैकी यश मिळताना दिसत होते कारण
त्यांचा राजा त्यांच्या सोबत नव्हता अन ती फौज दमली होती. उत्तरेकडे त्रिविक्रम स्वतः
सैन्याचे मनोबल वाढवीत होता. त्यांच्या बाजूने चांगली गोष्ट अशी होती ते पर्वताच्या
वरच्या बाजूस होते आणि धर्मपुरीचे सैन्य खालच्या बाजूला. धर्मपुरीचे सैन्य आपल्याला
कणभरही पुढे जाऊ न देता आणखीनच वरती येत आहे अन आपलं मनुष्यबळ जी आपली ताकत होती ते
कमी पडू लागतंय कि काय असे त्रीविक्रमाला आता वाटू लागले. अन अचानक त्याला एक खेळी
सुचली. त्याने लगेच आपल्या खास सरदाराला जवळ बोलावून काहीतरी सांगितले. त्या सरदाराचा
चेहरा खुलला अन त्याने त्याचा घोडा तसाच रणधुमाळीमध्ये पुढे दामटला. पर्वताच्या माथ्यावर
थांबलेल्या सैन्याच्या सरदारांना काहीतरी सांगितले अन स्वतः पर्वताच्या मध्यापर्यंत
चाललेल्या युद्धाकडे पुढे सरकू लागला.
(क्रमश:)
©अभिजीत अशोक इनामदार
नवी मुंबई, कामोठे
No comments:
Post a Comment