Monday, 23 May 2016

भुताटकी ... भाग २ (कथा)

भुताटकी ... भाग  

लेखक: अभिजीत अशोक इनामदार
पुलावरच भूत हि गोष्ट आता गावभर पसरली होतीच पण त्याची दहशत पण वाढली होती. शेडगे मास्तर गावचे आदर्श शिक्षक ... नाकासमोर चालणारा अन जगणारा माणूस. कधीही कुणाच्या अध्यात मध्यात. त्यांनीही ह्या भुताच्या गोष्टी ऐकल्या होत्या पण त्यांचे मन काही त्या मानायला तयार नव्हत्या. मुळात शिक्षक अन विज्ञानाची आवड असलेले शेडगे मास्तर कुठलीही अंधश्रद्धा पाळत नसत. कुठलीही गोष्ट स्वतःच्या बुद्धीच्या पातळीवर पडताळून पाहत अन मनाला अन बुद्धीला पटली तरच ती गोष्ट ते करीत असत. त्यांची देवावर श्रद्धा होती पण अंधश्रद्धेला त्यांचा विरोध होता. अशातच ह्या भुताच्या गोष्टींची त्यांना कमाल वाटे. ते म्हणीत "ऐकलं का? भूत वगैरे असे काही नसते हो. हे सगळे मनाचे खेळ असतात". पण लोक काही ऐकत नसत. एकेदिवशी मास्तरांना शेजारच्या गावी समारंभाला जावे लागले होते. कार्यक्रम उरकून निघेपर्यंत रात्र झाली अन शेवटची गाडी निघून गेली होती. मग मास्तरांना प्रश्न पडला कि आता कसे जावे. तिथल्या गावातील एकानी त्यांना सोडायची तयारी दाखवली. मोटारसायकल सुरु करण्यापूर्वी तो एकंच बोलला ... "मास्तर नदीच्या पुलाच्या अल्याडला अंगाला सोडतू .... पण म्होरं न्हाय येणार ... चालाल न्हवं? लई वंगाळ भूत हाय म्हण पुलाव" आपल्या गावच्या भुताची कीर्ती गावाबाहेर पण पसरलेली बघून मास्तरांना अशा अवस्थेत पण मजा वाटली. ते "बर" म्हणाले पुलापर्यंत तरी सोडलं ना ... ठीक आहे मी जाईन तिथून." कुणीतरी "आज हथच र्हावा वस्तीला ... सकाळच्याला घरी न्हिउन सोडतू ... असेही म्हणाले पण मास्तर काही ऐकायला तयार नव्हते. मग शेवटी ते निघाले .. नाईलाज म्हणून सोडणारे गृहस्थ पण निघाले. ....... ©अभिजीत अशोक इनामदार

त्या गावातून बाहेर पडल्यावर एकदम त्या दुचाकी स्वराला आठवले अन तो एकदम म्हणाला " अव मास्तर आज आवस हाय नव्ह का? ऐका माझं ... सकाळच्याला जावा". पण मास्तर म्हणाले "तुम्हाला जमत नसेल तर ठीक आहे मी जाईन चालत" मग त्यांचा नाईलाज झाला. १५ - २० मिनिटात गाडी गावाच्या वेशीजवळ आली. त्यांनी गाडी थांबली अन मास्तर उतरले. गाडीवाला गाडी वळवून निघून गेला. मास्तरांनी पिशवीतून ब्याट्री काढली अन हळू हळू पुलाच्या दिशेने चालू लागले. आज का कुणास ठाऊक पण इथे आल्या बरोबर त्यांना एकदम उदास भकास वाटू लागले. उगाच मनात लोकांनी सांगितलेल्या भुताच्या गोष्टी आठवू लागल्या. पण मनाचा दृढ निश्चय होता अन म्हणूनच ते आत्ता आले होते. मनातली मरगळ त्यांनी झटकण्याचा प्रयत्न केला अन चालू लागले. पुलाच्या जवळ ते पोहचले तोच त्यांना काही तरी सरकावल्यासारखा आवाज आला. त्यांनी आजूबाजूला उजेड टाकून पाहिले कोणीही नव्हते...... ©अभिजीत अशोक इनामदार

आजूबाजूला पाहत असताना ते चालतच होते त्यामुळे त्यांचे समोर जरा दुर्लक्ष झाले होते आणि अचानक भयाण शांतता चिरत खर्रर्र खर्रर्र खर्रर्र खर्रर्र असा आवाज झाला .... काहीतरी गोष्ट त्यांच्या पायाला लागून पुढे ढकलली गेली होती. ह्या आवाजामुळेच कि काय एकदम टिटवी ओरडली अन एकामागून एक असे एकदम घाबरवून टाकणारे आवाज ऐकून मास्तर पण जरा दचकले. एका जागी थांबून त्यांनी चहुबाजूला उजेड टाकून पहिला कोणीही नव्हते. मग त्यांनी खाली त्यांनी आपल्या पायाकडे पाहिले तर पाय एकदम लाल झाला होता ...  असं काय पायाला लागले कि रक्त यावे? असा विचार त्यांच्या मनात आला. पण रक्त येण्याबरोबरच कळ किंवा किंवा वेदना का नाही जाणवत? अशा कोणत्या गोष्टीला धडकलो आपण? दगड असता तर कळ तर आलीच आली असती अन शिवाय आपल्या पायांनी दगड एवढ्या लांब कसा जाइल अन त्याचा असा आवाज कसा येईल? मास्तरांना काही कळेनासे झाले. त्यांनी नीट वाकून बघितले तर त्यांना कळले कि हे काही रक्त नव्हे ... हे तर हे तर लाल लाल रंगाचे ... कुंकू आहे? हे कुठून आले? त्यांनी रस्त्यावर समोर उजेड टाकला ... त्यांच्या पायापासून दूरपर्यंत त्या कुंकवाची रेष उमटली होती. काय वस्तू होती ती जी पायाला धडकली? मास्तर हळू हळू त्या रेषेच्या मार्गांनी पुढे सरकले. जी वस्तू त्यांच्या पायाला धडकून पुढे गेली होती ती पुढे पडलेली होती. मास्तरांनी आपल्या चालण्याचा वेग हलकेच वाढवला अन पुढे येउन पाहू लागले अन एकदम थबकले ... ती वस्तू उचलण्यासाठी पुढे केलेला हात झटकन मागे घेतला स्वतः दोन पावले मागे आले. अंगातून थंड अशी कळ यावी तसे ते कळवळले. भांबावून दोन क्षण उभे राहिले. खिशातून रुमाल काढून त्यांनी कपाळावरचा घाम टिपला. कारण त्यांनी जी वस्तू पाहिली ती होती एक कवटी ... हो कवटीच. लाल भडक कुंकू गुलाल ह्यांच्या मिश्रनानी वेगळ्याच रंगाची अशी ती कवटी भयानक वाटत होती. कशालाही घाबारणारे मास्तर ... पण त्यांच्याही घशाला कोरड पडली. ....©अभिजीत अशोक इनामदार

थोडा वेळ ते थांबले जरा भानावर आले अन त्यांनी धीर एकवटून आजू बाजूला पाहिले. कवटीबरोबर आर्धी चिरलेली दोन तीन लाल रंगात माखलेली लिंब अस्ताव्यस्त होऊन रस्त्याच्या कडेला पडलेली होती. एवढ्यात त्यांना घर्र्र घर्र्र आणि सर्र सर्र असे आवाज ऐकू आले. एका पाठोपाठ एक चित्र विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. पाठीमागून काहीतरी सरकत किंवा धावत गेल्याचं त्यांना जाणवलं. त्यांनी दोन तीन वेळा कोण आहे? कोण आहे? असे विचारले पण काही उत्तर आले नाही. त्यांनी पुन्हा चालायला सुरुवात करताच शुक शुक शुक शुक असा आवाज आला. आता मात्र त्यांचा धीर सुटू लागला होता. गावकरी म्हणतात तसे खरेच इथे भूत आहे? कि अजून काही आहे? काही कळायला मार्ग नव्हता. पण प्रत्यक्ष कान अन डोळे तर भीती दर्शवत होते. दर तीन चार पावलांवर मागून येणारा शुक शुक आवाज आता असह्य होऊ लागला होता. परत एकदा खर्र खर्र आवाज झाला अन एक तीव्र दर्प मास्तरांच्या नाकात शिरला. कोणीतरी काहीतरी जाळावे ... असा तो दर्प होता. नक्की काय होतंय हे कळायला मार्ग नव्हता. भीतीनी गाळण उडालेली पण तरीही काहीही करून मास्तरांनी ह्या गोष्टींचा छडा लावायचाच असे ठरवले अन पटा पटा चालायला सुरुवात केली.

 (क्रमश:)

 ©अभिजीत अशोक इनामदार
  कामोठे नवी मुंबई                 

No comments:

Post a Comment