Monday, 23 May 2016

एक व्यथा… सूर्याची (कविता)

एक व्यथा… सूर्याची

लिखाण : अभिजीत अशोक इनामदार

आपण माणसं सगळ्याच गोष्टी किती ग्रांटेड घेतो ना? प्रत्येक गोष्टीत आपण निसर्गावर अवलंबून असून देखील आपण असेच करत असतो. आपल्या जगण्यासाठी आवश्यक गोष्टी जसे की, हवा पाणी, सूर्याकडून मिळणारी नैसर्गिक उष्णता, उजेड ह्यातील एकही गोष्ट जर थांबली तर? आपले जगणे किती मुश्किल होईल नाही? ह्यावरील काही कविता पोस्ट करण्याचा मानस आहे.

आजची कविता थोडी मजेशीर आहे... आपल्या आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही व्यथा असतातच. प्रत्येकाच्या व्यथेचे स्वरूप वेगळे असेल कदाचित पण बहुतेकांना काही ना काही व्यथा असतातच. पण उद्या जर आपल्याला उजेड, उर्जा, उष्णता… किंबहुना जीवनच देणाऱ्या सूर्याने जर तुम्हाला सांगितले की त्याचीही काही व्यथा आहे तर? काय म्हणता...? नाही पटत... आता तुम्हीच वाचा...

 
रम्य अशा त्या संध्याकाळी सूर्य जेव्हा अस्तास निघाला होता

आपल्या सगळ्या किरणांचा पसारा त्यांनी आवरून घेतला होता

तरी देखील काही खट्याळ किरणांचा लपाछपीचा खेळ चालूच होता

त्यांच्यावरतीच चिडून मग… सूर्य तांबूस लाल झाला होता

 

खरं तर त्याचा रिलिव्हर चंद्रही अजून आला नव्हता….

अन त्याच्याच वरचा सगळा राग सूर्यानी कोवळ्या किरणांवर काढला होता

 

व्यथित होऊन सूर्य मग मला म्हणाला:

आम्हासही वाटते कधी

टाकावी हाफ डे अन जावं घरी निघून

घरामध्ये करावा मस्त आराम

तिच्या हातची कांदाभजी अन आल्याचा चहा घेऊन


पण आमच्या सारख्या इमर्जन्सी सर्व्हिस पुरवनार्यानी

नसतात द्यायची कधी कुठली कारणं

म्हणूनच की काय… रिलिव्हर आल्याखेरीच

आमच्या डोळ्यांची फिटत नाहीत पारणं

 

वरिष्ठांच्या हुकुमापुढे आमचं काही चालत नाही

जणू काही आमच्या शिवाय इथे कोणाचं पानच हलत नाही

पण भाग्यवंतांच्याच नशिबी असतं म्हणतात असं सुख

बाकी आम्ही पडलो बिचारे इथे सर्वांसाठी नारायणमुख
 

रिलिव्हरची त्या वाट पाहून कातरवेळ पुरती टळून गेली

तरी देखील न येऊन त्यानी पुरतीच कमाल केली

सहज म्हणून मग सूर्यानी मस्टर जरा चाळून पाहिले

आजच्या दिवशी चंद्राची लिव्ह असल्याचे मग कळले…
 

अमावस्येच्या त्या प्रत्येक रात्री चंद्र कधीच कामावर येत नाही

त्याच्या मागचे कारण मात्र अजून बिचाऱ्या सूर्याला कळले नाही....

©अभिजीत अशोक इनामदार
 कामोठे, नवी मुंबई.

No comments:

Post a Comment