खालील लिखाण हे मूळ नटसम्राट
नाटकाबद्दल नसून नुकत्याच आलेल्या चित्रपटातील नटसम्राट अन त्यातील पात्रांवर आधारित
आहे. त्याचा मूळ नाटकातील संहितेशी काहीही संबंध नाही.
दिनांक : १-०२-०२०१६
लेखक: अभिजीत अशोक इनामदार
विषय क्रेडीट : श्रीनिवास चितळे काका
नटसम्राट... त्यांच्या मुलांच्या
नजरेतून (मकरंद)
विषय क्रेडीट : श्रीनिवास चितळे काका
नमस्कार... मी मकरंद. काय म्हणताय...
कोण मकरंद? अरे हो नुसतं मकरंद सांगून तुम्हाला कसं कळणार म्हणा. तो तुमचा दोष नाही...
असलाच तर कदाचित आमच्याच नशिबाचा असेल. नटसम्राट नावाच्या वटवृक्षाला फुटलेल्या पारंब्या
आम्ही... त्या वटवृक्षाच्या खांद्यांवरून जमिनीपर्यंत लोळणार्या... स्वतःला जमिनीत
गाडून घेऊन नव्या अंकुरची पालवी लेऊन पुन्हा आभाळाकडे झेपावण्याची कुवत नसलेल्या आणि
म्हणूनच तशाच अस्ताव्यस्त जमिनीवर लोळणार्या. "नटसम्राट" नावाचं वलय आमच्या
भोवती होतं तोपर्यंत तुम्ही सारे बर्यपैकी ओळखत होताच कि आम्हाला. तो वृक्ष उन्मळून
पडला आणि आमच्या सोबतचं ते वलय विरलं.... ते कायमचच. काय म्हणता... आता ओळख लागतीय...?
हम्म्म बरोब्बर तोच मकरंद मी... मकरंद गणपतराव बेलवलकर. नटसम्राट बेलवलकरांचा मुलगा.
बाकी तुमच्या मनात आमच्या बद्दल प्रेम, जिव्हाळा असण्याची सुतराम देखील शक्यता नाही.
परवाच नाही का नटसम्राट चित्रपट पाहून तुम्ही बाहेर पडत होतात तेव्हा मला, माझ्या बायकोला
अन विद्याला शिव्या शाप घालत बाहेर पडत होतात... आम्ही तिथेच तर होतो ना सगळे... पुढच्या
शो ला नटसम्राट वडील आणि सोशिक आईला पुन्हा छळण्याचं प्ल्यानिंग करत. आम्हाला ऐकू येतच
होतं सारं पण काय करणार? तुमच्या लेखी आम्ही म्हणजे नालायक मुलं... म्हातार्या आई बापांना
न सांभाळणारी, त्यांच्याच घरातून त्यांना बाहेर काढणारी, त्यांची दुरावस्था करणारी.
मग आमच्या बद्दल तुम्हाला जिव्हाळा का वाटावा नाही का? पण तुम्हाला सांगू का... तुम्ही
परवा पाहिलेली गोष्ट हि खूप वर्षांपूर्वी घडून गेलेली आहे. तुम्ही तिचे चित्ररूप दर्शन
परवा घेतलत. कित्येक वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांची कैफियत तुम्ही ऐकलीत... पाहिलीत.
पण त्या सगळ्या घटनांची दुसरीही काही बाजू असेल तर? काय म्हणता दुसरी कोणती बाजू? शांतपणे
ऐकून घेणार असाल तर सांगतो. मोठ्या माणसाची दुरावस्था झाली अन त्याची कथा सांगताना
ज्या प्रकारे सांगितली जाते त्याला कैफियत म्हणतात. कैफियत... काय सुंदर शब्द आहे पहा.
पण आमच्या सारख्या सामान्य अन क्षुद्र माणसाचं काही सांगणं म्हणजे... म्हणजे... रड्गानच
होईल बघा.
आज बरोब्बर दहा वर्षे झाली. अजूनही
तो दिवस मला जसाच्या तसा आठवतो. बाबांचा वाढदिवस होता. आई बाबा कोणालाही काहीही न सांगता
विद्याच्या घरून निघून गेले होते. गेले तीन महिने आम्ही त्यांचा शोध घेत होतो. आजच्याच
दिवशी कोणीतरी बाबा त्या रंगमंदिरात आहेत असे सांगितले होते. आम्ही सगळे लगेचच तिकडे
गेलो होतो. मी, नेहा, विद्या, राहुल आम्ही सारेच होतो. त्या बूट पॉलिश करणाऱ्या मुलानी
सांभाळले होते म्हणे त्यांना गेले काही दिवस. तो ही होता. अन अजून एक कोणीतरी सिद्धार्थ
म्हणून नाटक वेडा पण होता. आम्ही बाबांना त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी आलोत म्हणून
सांगितले. त्यांनी काही आमचे ऐकले नाही. त्यांचा आमच्यावरील कमालीचा राग काही कमी झाला
नाही. त्यांची तब्ब्येत काही त्यावेळी एवढी खराबही नव्हती बरका. पण त्यांनी त्याच दिवशी...
त्या रंगमंचावरच देह ठेवला. एका मानी, हट्टी नटाने त्याच्या कर्मभूमीतच देह त्याग केला.
त्यांचं शेवटचं दर्शन तरी झालं आम्हाला. पण आई... आईचं दर्शन नाही... काह्ही नाही.
त्या बूट पॉलिश करणाऱ्या मुलानी सांगितले कि आई गेली.... अन तिचे सगळे अंत्यविधी आम्हाला
कोणाला न कळवताच झाले होते. कितीही झाले तरी आई होती हो ती आमची. मला तर पायाखालची
जमीनच सरकल्याचा भास झाला ते सगळे ऐकून. अन पुढच्या क्षणी बाबांनी देह ठेवला. हा दुहेरी
आघात होता आमच्यावर. कधीही कल्पना न करता येणारा. ह्या दहा वर्षांमध्ये खूप सोसलं आम्ही…
तुम्हा लोकांचा तिरस्कार, जळजळीत नजरा, टोमणे अन अजून बराच काही. आम्ही वागलोच होतो
ना तसे. आम्ही चुकलो... साफ चुकलो... नाही म्हणताच नाही मी. पण... पण कधी कुणी आमचं
मन जाणून घेतलंत का? निदान तसा प्रयत्न तरी? जाऊ द्या तसाही तुम्हाला काय फरक पडतो
म्हणा. काय म्हणता? जाणून घ्यायचं तुम्हाला? बर...
खुप वर्षांपूर्वी... मी लहान
होतो तेव्हा... बारा - तेरा वर्षांचा असेन. बाबा घरी आले होते खूप दिवसांनी. कुठल्याश्या
नाटकाचा दौरा संपवून आले होते. ते आले कि त्यांच्या बरोबर त्यांचे मित्रहि घरी यायचे.
नाटकांच्या चर्चा होत, संवाद फेक चाले, कोणाचं काम चांगलं झालं त्याला दाद मिळे, कोणी
माती खाल्ली... त्याची थट्टा होई. त्यांची भाषा तर काय नेहमीच शिवराळ... कधी म्हणून
सरळ बोलत नसत. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांचं अन त्यांच्या मित्रांचं पिणं वाढलं
होतं. आईचं अन त्यांचं ह्यावरून काहीतरी वाजायचं... त्यातलं काही बाही कानावर पडे पण
आम्ही काही बोलण्याची टाप नव्हती आमची. घरी असले कि सतत मोठ्याने बोलणे, शिव्या हे
नेहमीचच झालं होतं. आम्हाला अभ्यास करताना बर्याचदा त्रास व्हायचा पण सांगणार कोणाला?
त्या दिवशी म्हणाले चल मकरंद तुला नाटक शिकवतो. अन मग कुठल्याश्या सीझरच्या नाटकातला
संवाद मला वाचायला दिला अन म्हणाले म्हणून दाखव. समोर ते स्वतः त्यांचे मित्र… माझी
फे फे उडाली. मुळात मला नाटक प्रकारात काहीच गती नव्हती. आता नव्हती ती कला माझ्या
अंगात तर तो माझा दोष असेल का? सगळ्यांसमोर मला ओरडले बाबा. अरे नटसम्राट गणपतरावाचा
मुलगा तू ना... असा कसा? अजून नाही नाही ते बोलले. मी रात्रभर रडत राहिलो. उपाशी पोटी
कधी झोप लागली कळलंच नाही. मला समजावून सांगायला. प्रेमानी कुरवाळायला ते आलेच नाहीत.
मी त्या नंतर अनेकदा प्रयत्न केला ते संवाद पाठ करण्याचा... आगदी प्रामाणिक प्रयत्न…
पण नाहीच जमले. बाबाही कधी आले नाहीत मला शिकवायला. मुळात त्यांचे दौरे, मित्रांच्या
मैफिली यातून ते आमच्या वाट्याला आलेच किती? आगदीच नगण्य काळासाठी. ते नेहमीच दंग त्यांच्या
सीझर, अथल्लो, शेक्स्पिअर मध्ये. ती त्यांची वंदनीय, पूजनीय दैवत. पण आम्हाला आमचे
बाबा हवे होते ते आमच्यासाठी कुठे होते? कॉलेजात असताना एकदा मी मित्रांसोबत बियर घेऊन
आलो होतो. घरी बाबा नव्हते. आईनी मला रात्रभर बाल्कनीत उभा केला होता अंगठे धरून. मग
हीच आई बाबांच्या बाबतीत अशी कडक का होऊ शकली नाही? अशा किती तरी गोष्टी होत्या ज्या
बाबतीत ती बाबांना कधी बोलली नाही पण आम्हाला बोलली. बाबांचे दौरे वाढत गेले... रंगभूमीवरचे
त्यांचे योगदान वाढत गेले पण त्याच बरोबर त्यांचा हेकटपणा सुद्धा वाढत गेला. अन आमच्यातले
अंतर सुद्धा वाढत गेले. माझ्या लग्नानंतर तर हे हळू हळू वाढू लागले. हि जनरेशन ग्याप
भरून काढणे गरजेचे होते. मी पूर्ण प्रयत्न करत होतो. पण गोष्टी उलटंच घडत गेल्या. अखेर
त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली. त्यांच्या सत्कार समारंभाच्या दिवशी तर त्यांनी
आम्हाला हादरावूनच टाकले. त्यांनी घर माझ्या नावावर केले. बाकीची रक्कम विद्याच्या
नावे केली. खरं तर असं करायला नको हवे होते त्यांनी. माझी तशी अपेक्षा नव्हतीच मुळी.
त्यांची इच्छा म्हणून मी ते स्वीकारले. मला माझे स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायचे होते.
मी त्या प्रयत्नात होतो. माझं काम... त्याचं टेन्शन असताना दररोज नेहा मला काहीतरी
बाबांबद्दल सांगत असे. मी दिवसभर कामात व्यस्त… घरी आल्यावर दररोज नवीन काही तरी ऐकायला
मिळे. खरं सांगू मला वाटते आमच्यातला संवाद कमी झाला होता. रोज रोज तेच तेच ऐकून मलाही
राग येत होता. पण मेघाला, माझ्या मुलीला शिव्यांची कविता शिकवणे झाले… अन पुढे जाउन
तिच्या शाळेतल्या कार्यक्रमातील तिच्या नाचाच्या स्टेप्स बदलणे हे जरा जास्तच झालं
होतं. ते मलाही नव्हते आवडले. पण त्यानंतर जो प्रकार झाला तो खरच व्हायला नको हवा होता.
बाबा अन नेहाचा वाद झाला. नेहा सुद्धा हट्टाला पेटली. अन शेवटी सगळ्यांच्याच मनात नसलेला
असा पर्याय वेगळे होण्याचा... वेगळे राहण्याचा बोलला गेला. आता वाटते खरेच मी हे थांबवू
शकलो असतो? कदाचित होय. पण इतर वेळी कडकपणे वागणारे बाबा आणि आई स्वताहून विद्याकडे
राहायला गेले. हे त्यांचे घर असतानाही. केवळ मेघाच्या शाळेची गैरसोय होऊ नये म्हणून....
हि गोष्ट माझ्या मनाला खूप खोलवर लागून राहिली.
विद्याकडेही गेल्यावर ते नीट
वागतील अशी अपेक्षा होती. आता नीट म्हणजे कोणाच्या दृष्टीने नीट हा वादाचा मुद्दा आहे
म्हणा. पण जावयाच्या घरी तरी त्यांचे दारू पुराण (जांभूळ आख्यान) कमी व्हायला हवे होते.
पण ते काही झाले नाही. उलट राहुलच्या घरी येणाऱ्या मोठ मोठ्या माणसांसमोर ह्यांच्या
वागण्याने विद्याला अवघडलेपणा येऊ लागला होता. तिच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या रात्री
त्यांनी केलेला प्रकार मला अचंबित करणारा होता. राहुलने जास्त मनावर घेतले नाही हा
त्याचा चांगुलपणा. पण म्हणून आपण असे वागायचे? राहुलच्या साहेबांशी बोलताना वागताना
थोड तारतम्य असायला हवे होते. नाही त्यांच्या मनात काही नसते आत एक बाहेर एक असे ते
वागत नाहीत हे आईचे स्पष्टीकरण जरी खरे असले तरी आपण आता कोठे राहतोय... कुठल्या लोकांत
वावरतोय हे पण बघायला नको का? थोडं स्वतःला बदलायला नको का? दीक्षित साहेबांच्या मुलाचं
नाटक पाहताना सुद्धा तेच केले. प्रत्येकवेळी आडमुठेपणा वाकडी भाषा कशाला? प्रत्येकाला
ह्याची सवय असतेच असे नाही ना. विद्याने हा सगळा प्रकार मला फोनवर सांगितला तेव्हा
मीही चाटच पडलो होतो. पण त्या नंतर जो प्रकार विद्याच्या घरी घडला... तो घडला नसता
तर... विद्याने बाबांवर चोरीचा आरोप केला? हि आमच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट घटना
होती. आई बाबांनी मला तर काहीच सांगितले नाही अन त्याच रात्री तो दोघे कुठेतरी निघून
गेले. त्या नंतर आम्हाला आई दिसलीच नाही. हे असे कसे वागले विद्या अन राहुल? मी त्यानंतर
जवळपास ५ वर्षे बोललो नव्हतो विद्याशी. शेवटी राहुलच्या अन नेहाच्या सांगण्यावरून मी
तिला माफ केलं. कारण हा आरोप म्हणजे आमच्या मानी बाबांच्या मनावर आघात होता. तो व्हायला
नको होता.
ज्यावेळी बाबांशी स्पष्ट बोलायला
हवे होते तेव्हा त्यांच्याशी बोलू शकलो नाही. माझं मन त्यांच्या समोर मोकळं करू शकलो
नाही. पण ते सुद्धा का नाही ओळखू शकले माझे मन? का नाही त्यांनी मला शिकवले नाटक? का
नाही मला दिली संधी माझ्या त्या चुका सुधारण्याची? माझ्याच वडिलांकडून शाबासकीची थाप
मिळवायला मी का आयुष्यभर तरसत राहिलो? आपला हट्टी अन फक्त नाटक अन रंगभूमीवरतीच प्रेम
असणारा स्वभाव का नाही त्यांनी बदलला? आई बाबांना म्हणालेली "तुम्ही नाटक घरी
घेऊन आलात. ते तिथेच रंगभूमीवर ठेऊन यायला हवे होते". पण ते तसे त्यांनी नाही
केले. बाप म्हणून लहानपणी आम्हाला त्यांचा दराराच वाटला अन मोठेपणी कायम रंगभूमीवर
वावरावे तसे त्यांचे घरातले वावरणे नाही पटले मनास. त्याच्याही पलीकडे आपले काही आयुष्य
आहे हेच त्यांना मान्य नव्हते कदाचित. घर सोडून जाताना त्यांनी का ठणकावून सांगितले
नाही... तुला हवे तर तू दुसरी सोय बघ... मी कुठेही जाणार नाही. ते तसे म्हणाले नाहीत
ह्याचाच मला आश्चर्य वाटते. कारण ते तसे म्हणाले असते तर ते त्यांच्या स्वभावाला अनुसरून
रास्त असते एकदम. विद्याच्या घरून निघाल्यावर त्यांनी माझ्याशी बोलणे पसंत केले नाही
हा सुद्धा हट्टीपणाच नव्हता काय? आईची तब्ब्येत बरी नसताना तिला घेऊन कुठेतरी निघून
गेले हा सुद्धा हट्टीपणाच नव्हता काय? आई लाख म्हणाली असेल पण तिची समजूत त्यांनी का
काढली नसेल? तिचा मृत्यू कसा झाला? का झाला? आमच्यामुळे त्यांना त्रास झाला ते दुखावले
गेले. आमच्या खूप मोठ्या चुका झाल्या मी नाही म्हणतच नाही पण त्यांना एकदाही आम्हाला
माफ करावेसे वाटले नाही? निदान मेघासाठी तरी त्यांनी घरी यायला हवं होतं. त्या बूट
पॉलिश करणाऱ्या मुलाबरोबर राहून देखील पिणं अजिबात कमी केलं नव्हतं त्यांनी. हे असे
का वागावे? आपलं बेफाम स्वैर जगणं स्वतःच्याच अटींवर जगत आले ते... थोडं समजुतीनं घेतलं
असतं तर... तर कदाचित आईचा असा दुर्दैवी अंत झाला नसता. आपल्या आईचा मृत्यू आपल्यामुळे
झालाय... आईच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत ह्या भावनेनं कित्येक रात्री झोप नाही
लागलीय विद्याला अन मला सुद्धा. त्यांनी जर आपल्या मायेच्या मनाचे पंख पसरून अलगदपणे
आम्हाला आपल्या पंखांखाली घेतले असते तर आज चित्र वेगळे असते कदाचित… पण त्यांनी त्यांचा
इगो सांभाळला आणि आम्ही आमचा. कोणी कोणाला बोलायचे? आज मी वयाची पन्नाशी गाठलीय. अजूनही
म्हातारा होत जाईन. पण आपण केलेल्या चुकांचं
ओझं पाठीवर वाहत आलोय मी आयुष्यभर. हो खूप चुका झाल्या. पण त्या सुधारण्याची संधी मात्र
मिळाली नाही. हि खंत धड मरू पण देणार नाही. धगधगत्या नटसम्राटचा अंगार तुम्ही अनुभवलात...
पण त्यातलाच एक धगधगता निखारा उराशी कवटाळून मीही जगत आलोय गेली कित्येक वर्षे अन एक
दिवस असाच संपूनही जाईन. तेव्हा तुम्हाला कळेलच असेही नाही कारण नटसम्राट नावाचं वलय
आता माझ्या सोबत नसेल. अन माझं असं संपून जाण ह्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणंही
नसेल.
©अभिजीत अशोक इनामदार
कामोठे, नवी
मुंबई
No comments:
Post a Comment