Monday, 23 May 2016

मोरपीस (कथा)


मोरपीस
 
©अभिजित अशोक इनामदार

स्थळ पनवेल बस स्थानक. वेळ सकाळी १० - १०.३० ची असेल. नेहमीचीच वर्दळ आज पण पाहायला मिळत होती स्थानकावर. मुंबईत आत जाणारे वा मुंबई बाहेर जाणार्यांची गाडी पकडण्याची धडपड चालूच होती. काल रात्री असं झालं होतं कि आमच्या ऑफिस ला दिवस सुट्टी आहे हे कळल्यावर आमच्या कुटुंबांनी आम्हाला बाहेर गावी फिरायला नेण्याचा आग्रह केला. अन आम्ही जर त्यांना  यावेळी बाहेर फिरायला घेऊन गेलो नाही तर घरामध्ये असहकार आंदोलन करू असे आमचे वर्षांचे चिरंजीव आणि सौभाग्यवतिनी जाहीर केले. मग आम्ही आपलं काही वाटाघाटी करता येतात का ते पाहिलं. पण साफ अपयश… कारण त्यांनी वाटाघाटीना साफ नकार दिला. मी आपला तुम्हाला डिनरला घेऊन जातो. मुव्हीला घेऊन जातो अशा ऑफर देऊन पाहिल्या. पण काही फरक पडेना. असहकाराचा पहिला फटका म्हणजे आज रात्रीच्या (म्हणजे काल रात्री) जेवणाची सोय आपली आपण करा असं  जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा मग आम्ही जरा घाबरलो. मग काय करायचे असे विचारात पडलो अन मग साहजिकच कुठे फिरायला जावे या वरती एक चर्चासत्र चालू झाले. सर्व ठिकाणांची उजळणी झाली. अन मग मुरुड जंजिरा वगैरे भाग आम्ही फायनल केला. मग जायचा कसं? यावर चर्चा. गाडी करून जायचं कि बसनी जायचं? मग असे ठरले की मुरुडला बसनी जाऊ लागली तर तेथून गाडी करू. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही सगळेजण आवरून पनवेलच्या दिशेनी रवाना. जाताना मग हायवे पर्यंत ऑटो तिथून बसने पनवेल हे सोपस्कार. ते सगळं सहजा सहजी पार पडत नाही. ज्या ज्या वेळी आम्हाला घाई असते नेमकं तेव्हा ऑटो वेळेवर मिळणं, जी मिळते तो ऑटो वाला आम्हाला जिकडे जायचं आहे तिकडे त्याला यायचं नाही असं सांगतो, मग उगाच चीड चीड त्रागा. आम्हाला लवकर जायचा असतं आणि ते ऑटो वाल्यांनी ताडलेलं असतं. मग तो जास्तीचे पैसे मागतो. आपण नाही म्हटलं तर "काय साहेब फ्यामिलीला बाहेर घेऊन चाललात अन - ५० रुपयांकडे काय बघता राव. रुपये कमी द्या. फार तर" मला एक कळत नाही मी माझ्या फ्यामिलीला बाहेर घेऊन चाललो तर ह्याला का जास्तीचे पैसे द्यायचे? आमच्या मनीचे हे विचार सौ. नी ताडलेले असतात अन आमचे हे हावभाव ओळखून लगेच सौभाग्यवती म्हणतात "चला आता.... जिथे पैशांसाठी घासाघीस करावी तिथे तुम्ही काही बोलत नाही. अन नको तिथे बसतात वेळ घालवत". झालं आमच्या इज्जतीचा भाजी पाला. ऑटो वाला "ह्या ह्या ह्या ...."

हायवेला उतरून आम्ही बस थांब्यावर आलो. आमच्या बाबतीत नेहमी घडणारी गोष्ट म्हणजे - एकापाठी एक अशा पनवेल गाड्या येतात. मग कोणत्यात चढायचं हे नक्की होत नाही. जी गाडी आपल्या बरोबर समोर थांबते तिच्यात जागा नसते. मागच्यात गर्दी कमी दिसते म्हणून आम्ही तिकडे धावतो. तिच्या पर्यंत पोहचे पर्यंतच त्या गाडीच्या कंडक्टर महाशयांनी डबल बेल मारलेली असते. ती गाडी आम्हाला वाकडं  दाखवत अन खंडीभर धूळ अन धूर चारून निघून जाते. मग आम्ही परत पहिल्या गाडीकडे धावतो तर ती पण निघालेली असते अन आम्ही पोहोचेपर्यंत ती गाडी पण निघून जाते. "साधी गाडी पकडता येत नाही ........" सौ.चा टोमणा. आम्ही आपले हताश नजरेने गेलेल्या गाड्यांकडे पाहतो. आज पण हेच झालं. अजून काही वेळानी एक गाडी आली अन मग आम्ही कसे बसे त्याच्यात शिरलो. अशा वेळी खात्रीपूर्वक सांगतो जणांना वेगवेगळ्या ठिकाणी जागा मिळते. आजही तेच झाले. मग परत कंडक्टर सुट्टे पैसे मागतात, आमच्याकडे नेमकी तेव्हा ५०० वा १००० ची नोट असणे. मग परत त्याच्याशी वाद, कंडक्टरचं  मग खाली उतरा म्हणणं अन त्यासाठी बेल पण मारणं. मग परत आम्हाला धडकी भरणं. मग गयावया करणं, कंडक्टर साहेबांची मनधरणी करणं हे आलंच. हे सगळं यथासांग पार पडून गाडी पनवेल डेपो मध्ये शिरली. पैसे देऊन तिकीट काढून सुद्धा केवळ कंडक्टर साहेबांच्या कृपेनेच म्हणजे जणू आम्ही फुकटातच इथपर्यंत आलोत अशा रीतीने त्यांचे आभार मानून बसचा निरोप घेऊन पुढे मार्गक्रमण करतो.

आम्हाला मुरुडला जायचं आहे म्हणून त्या गाड्या जिथे लागतात तिथे जाऊन उभे राहिलो. माझा अजून एक अनुभव आहे… जेव्हा जेव्हा पनवेल वरून साताऱ्याला जाण्यासाठी म्हणून तिथे येऊन थांबतो तेव्हा एकही गाडी लवकर येत नाही. बर मी हे एका ठरवीक वेळेबद्दल म्हणत नाही बरे. वेगवेगळ्या वेळी आलो तरी हि बोंब ठरलेली. अन आज एक नाही दोन नाही तर / गाड्या एकामागोमाग स्थानकात दाखल. पण आज मुरूडची एकही गाडी नाही. आपल्याला ज्या गावी जायचं असतं त्याच गाड्या उशिरा का येतात हे एक मला उलगडलेल कोडं आहे. सगळ्या सातारा गाड्या आल्या तश्या  निघून गेल्या. आम्ही जैसे थे. जेव्हा साताऱ्याला जायचा असतं तेंव्हा मात्र अशाच एका मागे एक मुरुड त्या भागात जाणाऱ्या गाड्यांची रांग लागते हे काही वेगळं सांगायला नकोच नाही का?

असो...... आम्ही आपले ठेविले अनंते.... म्हणत वाट पाहत थांबलो. शेवटी ती मुरूडची गाडी आली. धक्काबुक्की करत वरती चढून जागा मिळवली. चिरंजीवाना विंडो सीट मिळाली त्याच्या शेजारी त्यांच्या मातोश्री अन मग त्यांच्या बाजूला आम्ही - असे आम्ही सगळे बसलो. समान ठेवलं. मघाशीच सुट्टे  पैसे मिळाल्यानी इथे काही त्या प्रकारचा त्रास होता आम्ही तिकीट वगैरे काढून जरा स्थिर स्थावर झालो.

आमचे तिकीट काढून कंडक्टर महाशय मागच्या सीट जवळ गेले. - १० मिनिटांनी जोर जोरात आवाज येऊ लागले. मागे वळून पहिले तर एक १२ - १३ वर्षाचा मुलगा. भेदरलेल्या अवस्थेत उभा अन आपले सगळे खिसे तपासात असलेला दिसला.

कंडक्टर त्याला म्हणाले " पैसे नाहीत तर खाली उतर". असे म्हणून त्याला बाहेर खेचू लागले.

तो मुलगा गयावया करीत म्हणाला "साहेब मी चोर नाही हो ... अन ना ही फुकटात जाण्यासाठी गाडीत चढलो माझ्याकडे खरेच पैसे होते. मामानी दिले होते १०० रुपये. पण आता कुठे गेले कळत नाही"

कंडक्टर "अरे असे रोज बघतो मी...  मामानी...  काकांनी पैसे दिलेत सांगणारे...  पैसे पडले चोरी झाले असे म्हणणारे. पैसे नाहीत ना खाली उतर."

तो कळवळला पण कंडक्टर बधला नाही. अर्थात त्यांना याची सवय होती. त्यांनी गाडी थांबवली त्यामुलाला खेचू लागले. मला राहवले नाही म्हणालो "आहो कसे वागताय त्याच्याशी? तुमच्या मुलाच्या वयाचा असेल तो."

कंडक्टर " साहेब आम्हाला माहित आहे असल्यांशी कसे वागायचे ते. आम्ही रोज बघतो. तुम्ही शिकवू नका".

मी "आहो पण काय झालाय ते तरी विचारा त्याला. काही करता येतं का ते पहा."

मुलांनी परत म्हटलं "साहेब मी फुकटात जाण्यासाठी नाही गाडीत चढलो माझ्याकडे खरेच पैसे होते. मामानी दिले होते १०० रुपये. पण आता कुठे गेले काळत नाही"

कंडक्टर "तुम्हाला तिकीट काढावं लागेल. मी काहीही करू शकत नाही. बोला काय करू?"

मी म्हटलं "ठीक आहे" त्याला विचारले कुठे जायचं तुला? तो म्हणाला "मुरुड".

मी तिकिटाचे पैसे दिले आणि तिकीट त्याच्या हातात दिले. अन नि सांभाळून ठेवायला सांगितले. मी हे केल्याचे पाहून जरा सौ. आणि चिरंजीव हसले .... पण प्रेमानी ते मला कळले. आणि आता तास मस्त झोप काढावी म्हणून डोळे मिटले. 

आम्ही मुरुडला पोहचलो गाडीतून खाली उतरलो. तोच मुलगा समोर आला अन म्हणाला "साहेब खूप आभारी आहे तुमचा" अन सरळ मला वाकून नमस्कार केला. मी त्याला उठवला अन म्हटले "अरे ठीक आहे त्यात काय एवढे? तुझे नाव काय" तो म्हणाला "सागर".

मी त्याला आम्ही ज्या जागी राहण्याचे निश्चित केले होते तो पत्ता दाखवला कसे जायचे विचारले. तो म्हणाला " मला माहित आहे ही जागा. इथून जवळच आहे. मी तुम्हाला तिथे सोडतो. मग तो आम्हाला पायी तिथपर्यंत घेऊन आला". जाण्या आधी परत माझे आभार मानले. आम्ही खोलीत निघालो तोच मागून सागराचा आवाज आला "साहेब....."

मला वाटले की आता त्याच्याकडे असेही पैसे नाहीत अन तो इथपर्यंत सोडण्यासाठी आला म्हणून काही बक्षीस मागत असावा. मी खिशातून १० - १० च्या नोटा काढल्या वळून त्याच्याकडे पहिले. त्याला हातानीच जवळ बोलावले ते पैसे त्याच्या हाती ठेवले. तो झटकन मागे सरकला आणि डबडबलेल्या डोळ्यांनी मला म्हणाला "अहो साहेब पैसे नकोत हो." एखाद्याबद्दल आपण किती पटकन मत करतो ना? एखादवेळी मनुष्य परीस्तिथीनी वाकलेला असतो. ज्याच्या जवळ पैसा नाही तो नेहमी लाचारच असावा असं काही आहे का? त्याला त्याचा मान सन्मान काहीच असू नये असं काही आहे का? किंबहुना ज्याच्या जवळ पैसा त्यालाच मान ही तर आपल्या समाजाची नेहमीचीच धारणा.....

मला माझी चूक उमगली खजील होऊन मी म्हणालो "मग का हाक मारली होतीस?"     

सागर "तुम्ही इथे किती दिवस आहात ते विचारायचे होते?"

मी  "का रे? आहे दिवस"

सागर "तुम्ही गाडीत जे माझे तिकीट काढले होते त्याचे पैसे तुम्हाला परत करायचे होते म्हणून"

मी " अरे असू दे त्यात काही नाही एवढं" "हवा तर तुला खाऊ घे तुला त्या पैशांचा... ठीक आहे?"

सागर " ७० रुपयांचा खाऊ? परवडणार नाही साहेब आम्हाला."

मी पुन्हा निरुत्तर. धीर करून मी विचारले "भूख लागलीय का?"

तो मानेनीच हो म्हणाला. मी "ठीक आहे बैस येथे मी येतो आवरून." मी फ्रेश होऊन बाहेर खुर्चीत बसलो. तिथल्या वेटरला चहा आणि खाण्याची ओर्डर दिली. सागरला समोर बसायला सांगितलं. तो अंग चोरून खुर्चीत बसला. मी म्हटलं "सांग आता"

सागर बोलू लागला "साहेब मला वडील नाहीत. आई, मी आणि छोटी बहिण असे तिघेच असतो. आई शहाळे विकते किनाऱ्याला. मी शाळा करून याच हॉटेल मध्ये पडेल ते काम करतो. पनवेलला मामा आहे पण त्याची पण परिस्थिती अशीच आहे. म्हणून मग त्याला जास्त त्रास नाही देत. आज सकाळी त्यांनी खंरच १०० रुपये दिले होते. पण ते पडले कुठे तरी."

चहा अन खाणं आलं. खायला घेऊन येणाऱ्या वेटरनी त्याला पाहिलं अन म्हणाला "ये सागऱ्या इथं काय बसलायस साहेबासमोर...." मी त्याला हातानीच जायला सांगितलं. तो गेला.

समोरच्या खाण्याच्या पदार्थाकडे बघण्याचं तो कष्टानी टाळत होता. मी त्याला खायला घे म्हणून खून केली. तो म्हणाला "साहेब मला जे खायचं आहे ते घरी घेऊन जाऊ?" मी जरा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले… तोच तो म्हणाला "छकुलीला....  माझ्या बहिणीला पण देईन थोडं यातलं".

मी म्हणालो "ठीक आहे"

तो गेला अन विचारात पडलो. एवढासा मुलगा, घरची परीस्तिथी हालाकीची पण वागणं किती अदबशीर. कुठेही अविचार नाही. एवढ्या लहानवयात ही प्रौढी कशी आली? वडील नसल्यामुळे घर चालवताना आईची होणारी त्रेधा तिरपीट पाहून नक्कीच त्याची प्रौढी वाढली असेल.

दिवस समुद्रकिनारा, किल्ला आणि आजूबाजूचा परिसर पाहण्यात निघून गेले. सागराचा विचार कधीच मनातून निघून ही गेले. परतण्याची वेळ आली. बिल सेटल केलं आणि समान घेऊन निघणार तोच कौंटरवराच्या माणसानी एक पाकीट हातात दिले. पाकीट साधे वर्तमानपत्रांनी बनवले होते.

मी विचारले "काय आहे हे?" तो म्हणाला "उघडून पहा म्हणजे कळेल".

कुतूहलापोटी मी ते उघडून पाहिले. आत मध्ये एक शंख शिंपल्यांची सुंदर अशी हातानी तयार केलेली माळ होती. ती माझ्या पत्नी साठी होती. एक हातानी अतिशय छान रंगवलेलं ग्रीटिंग होतं. ते माझ्या मुलासाठी होतं. अन दुमडलेला वहीचा कागद होता. तो उघडून पाहिलं तर त्यात सुंदर वळणदार अक्षरात लिहिलेलं होतं. "साहेब आपण केलेली मदत मी विसरलो नाही. तेच पैसे जमवण्यासाठी जास्त वेळ काम केलं त्यामुळे ह्या दोन दिवसात आपल्याला भेटता आलं नाही. - सागर"

त्याच्या खाली एक सुरेख मोरपीस होतं.... बहुदा माझ्यासाठीच त्यानी ते ठेवलं असावं अन त्या मोरपिसाखाली होत्या मळलेल्या अन दुमडलेल्या १० - १० च्या नोटा 

©अभिजित अशोक इनामदार
  कामोठे, नवी मुंबई             

No comments:

Post a Comment