Monday, 23 May 2016

असहिष्णू मी आणि माझा समाज (लेख)

असहिष्णू मी आणि माझा समाज

लिखाण: अभिजीत अशोक इनामदार 
 
मी आज जबाबदारीपूर्वक असा वक्तव्य करतोय कि आमच्यातला Tolerance संपला आहे आणि आम्ही दिवसेंदिवस Intolerant होत चाललो आहो. आता हा काय नवीन वाद.. असे काहीना वाटेल पण हि पोस्ट कोणताही राजकीय अजेंडा असलेली नाही किंवा कोण्या एका व्यक्तीला समुदायाला किंवा समूहाला उद्देशून नाही. पण खरच सांगा हो एकदा सहिष्णुता... असहिष्णुता म्हणजे नक्की काय हो? ती काय फक्त राजकीय पुढारी, प्रसिद्ध व्यक्ती ह्यांनीच सांगायची गोष्ट आहे का? ती आपली... माझी... तुमची सगळ्यांचीच जबाबदारी नाही का? मग ही असहिष्णुता कोणा एका राजकीय पक्षाबद्दल, जाती बद्दल किंवा कोणा एका व्यक्ती बद्दल असावी का? समाज म्हणून आम्ही तुम्ही किती सहिष्णू वागतो हे आपण पाहतो का? तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनात आपण किती असहिष्णू वागतो ह्याचा विचार तरी केला जातो का?

सर्वात प्रथम मी जेंव्हा असे लिहितो कि आम्ही किंवा आमच्यातला Tolerance संपला आहे तेव्हा त्या आम्ही मध्ये मी सुद्धा आहे. गेली कित्येक वर्षे मी पाहत आलोय आपली लोकसंख्या वाढली, शहरांकडे सुधारणांचे वारे वाहू लागले, कामानिमित्त शहरांकडे येणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली अन शहरे दिवसेंदिवस फुगू लागली. त्यामुळे मुलभुत सुविधा जसे कि रस्ते, वीज, पाणी कमी पडू लागल्या. मग त्या वाढवण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणा करू लागली. पण गरज आणि पुरवठा ह्यात नेहमीच तफावत राहिली. आता ह्या सगळ्याचा लेखाच्या शीर्षकाशी काय संबंध असे वाटू शकते पण ह्या सगळ्याच गोष्टींमुळे किंबहुना हि जी तफावत सतत राहिली (गरज आणि पुरवठा ह्यांच्या मधील) त्यामुळे हि असहिष्णुता वाढीस लागलीय. नाही कळतंय?

आता मला सांगा तुम्ही रस्त्यावरून चालला आहात मग तुम्ही चारचाकी मध्ये असा दुचाकीवर असा अथवा चालत चालले असा...  मला सांगा तुम्ही रस्त्यांवर मुक्काम करायला येता का हो? म्हणजे तुमच्या पुढे एखादे वाहन असेल तर तुम्ही ते वाहन गेल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही हे जरी दिसत असेल तरी पाठीमागून सतत होर्न वाजवणारे आजकाल आपण सगळेच आहोत नाही का? समोरचा जाईपर्यंत थांबण्याची गरज कोणाला वाटत नाही. तुम्ही जा अथवा रस्त्यांवर राहा मला पुढे जाऊ द्या बस बाकी गोष्टींशी मला घेणे देणे नाही. एखादी गाडी वळत असेल तर त्या वाहन चालकाला गाडी वळवू देता मध्ये मध्ये गाड्या घालणारे लोक बघून नाही वाटत का हि खरी असहिष्णुता आहे? आमचा Tolarance कमी झाला आहे? समोरच्याला Tolerate करण्याची आमची क्षमता कमी झाली आहे? लहान लहान शाळकरी मुलांच्या हातात गाड्या देऊन मग ते मुल गाडी कशी चालवतो हे बघण्याची जबाबदारी कोणाची? हि लहान लहान पिल्लं गाडीच्या सीटवर आपला पार्श्वभाग एका बाजूला वाकडा करून, कधी दोन, तर कधी तीन तीन जणांच्या संख्येने, भर गर्दीच्या रस्त्यांवर पी पी -- पो पो करत इतरांना कट मारून जातात. कधी ते कोणाला धडकतात तर कधी कोणाला तरी धडकवतात ह्याची जबाबदारी त्यांच्या पालकांची नाही काय? अन आपले आपत्य असे वागत आहे हे माहिती असून देखील त्यांना काहीच बोलणारे पालक त्या लहान मुलांना समाजात इतरांशी - समाजाशी कशा प्रकारे वागण्याची शिकवण देत आहेत? ही सहुष्णू शिकवण आहे?

जिथे मी जाईन तिथे मला पहिली सेवा मिळावी किंवा दुकानात गेल्यावरती दुकानदारांनी सगळ्यात आधी मला हवी ती वस्तू काढून द्यावी अन मग बाकीच्यांना. मग माझ्या आधी कोणी आले असेल तरी त्यांनी थांबावे... असे जवळ जवळ प्रत्येकालाच वाटते. ट्रेन च्या तिकीटाची रांग असो कि दवाखान्यातील तपासनिसाठीची रांग... आमच्यावर लक्ष ठेवायला कोणीतरी हवे असते. नाही तर प्रत्येकजण पुढे जायला तयारच असतो. कारण आमचा Tolerance कमी झाला आहे. मोठ्या मोठ्या दुकानांमध्ये, मॉल मध्ये तासान-तास खरेदी केली जाते पण जेव्हा बिलिंग ची वेळ येते तेव्हा तिथे असणारी लाइन हि खूप असह्य करते नाही? सिग्नलला हवालदार नाही... पळवा गाडी... आपला सिग्नल ग्रीन होईपर्यंत थांबायला वेळ आहे कोणाला? पेट्रोल पंपावर लाइन आहे घुसावं मधेच गाडी, रस्त्यांवर गाडी चालवताना आपल्या ठरल्या लेन मध्ये गाडी चालवायला लाज वाटते, सिग्नल इंडिकेटर देणे म्हणजे कमीपणाच हो... तो कोणी घ्यावा? वेगाची मर्यादा ठरवून दिलेली आहे, त्याचे बोर्ड जागोजागी हायवेवर आहेत पण आम्हाला बघणारं कोणी नाही ना मग पाळवा गाडी. लिस्ट काढायची म्हटली तर बरीच मोठी लिस्ट होईल... तरी आपल्याच चालीने चालणाऱ्या सरकारी ऑफिसेसचा उल्लेख इथे टाळलाय… जाऊ द्यात. एकूणच काय तर मी आणि माझा पहिला नंबर बाकी दुनिया जाये भाड मे,  अशी वृत्ती वाढीला लागलीय. माझ्या पोळीवर चांगल साजूक तूप हवे... इतरांना ते मिळो ना मिळो, किंबहुना इतरांना पोळी सुद्धा मिळालीय कि नाही ह्याच्याशी मला काही घेणे देणे नाही. हि सुद्धा एकप्रकारे असहिष्णुताच नव्हे काय?

बर हे असे वागणारी माणसं बघायला तुम्हाला कुठे लांब जाण्याची गरजच नाही, हि अशी बरीच माणसं आपल्या आजूबाजूला वावरत असतात... आगदी कुठेही… म्हणजे किराणा दुकानात, दुधाच्या दुकानात, भाजीच्या गाडीवर, मेडिकल मध्ये, दवाखान्यात, रस्त्यावर, वाहतुकीमध्ये, रेल्वे स्टेशनवर, बस थांब्यावर, बस मध्ये, ट्रेन मध्ये, वडापावच्या गाडीवर, चाटच्या गाडीवर, उसाच्या रसाच्या दुकानात, कॉफी क्याफे मध्ये, ब्यांकेमध्ये, ATM च्या लाइनमध्ये, आहो आगदी एअरपोर्ट वर Security चेकच्या लाइन मध्ये, ऑफिसच्या लिफ्ट मध्ये, मुंबई मध्ये ट्याक्सी शोधताना, मॉल मध्ये, मुलांच्या खेळण्यांच्या दुकानात आगदी कुठेहि हि अशी माणसं तुम्हाला दिसतील. म्हणजे थोडक्यात कुठेही लांब जाता जिथे तुम्ही आत्ता आहात तिथेच तुम्ही आजू बाजूला पाहिलात तरी अशी माणसं दिसून येतील.

अशा वेळी आपण तर ह्या वरच्या प्रकारच्या लोकांत नाही आहोत ना हे प्रत्येकाने आपापल्या मनाशी तपासून पहावे अन ठरवावे कोण सहिष्णू... अन कोण असहिष्णू….       

©अभिजीत अशोक इनामदार
  नवी मुंबई, कामोठे

No comments:

Post a Comment