Monday, 23 May 2016

भुताटकी ... भाग ४ (शेवट) (कथा)

भुताटकी ... भाग (शेवट)

लेखक: अभिजीत अशोक इनामदार
मास्तरांचा हा असा झालेला अंत बघून सगळा गाव हादरला होता. भुताच्या गोष्टीना तर ऊत आला होता. माणसं कसल्या कसल्या गोष्टी फुलवून फुलवून सांगत होते. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज गावात बर्याच जणांनी किंबहुना तरुण पिढीनी पहिल्यांदाच गावात पोलिस आलेले पाहिले होते. मास्तरांची बॉडी वैद्यकीय तपासणीसाठी अन शव विच्छेदनासाठी गेलेली होती. पोलिसांनी माहिती गोळा करायला सुरुवात केली होती. त्यातूनच पुलावरच्या भुताची गोष्ट अन त्याच्या संदर्भात मास्तर करत असलेला तपास हा सुद्धा पोलिसांना कळला होता. मास्तर हे अंध्श्रध्येच्या विरोधात होते हे कळायला सोनावणे साहेबाना वेळ लागला नाही. त्यांनी गावातील महत्वाची माणसं बोलावून मास्तरांबद्दल अजून चौकशी सुरु केली. त्यांच्या पश्चात कोणी नाही हे हि त्यांना कळले. भूताबाद्दलाचे सगळ्यांचे सगळे अनुभव त्यांनी स्वतः ऐकून घेतले. आपल्या पोलिसी आवाजात त्यांनी प्रश्न विचारले. पुलाजवळ दिसणाऱ्या वस्तू गायब होतात हे ऐकून सोनावणे साहेब जरा आश्चर्यचकित झाले. आणखी मिळेल ती माहिती गोळा करून साहेब निघून गेले. विचारांच्या तंद्री मध्ये ते कधी पोलिस चौकीत पोहचले ते कळलेच नाही त्यांना. मास्तरांना खरच भूतानि मारले असेल? कसे शक्य आहे ? आत्ता पर्यंतच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या केसेस सोडवल्या होत्या. असल्या बर्याच केसेस त्यांनी ह्या आधी पाहिल्या होत्या. भूत बित गोष्टी काही नसतात हा त्यांचा ठाम विश्वास होता. 

दुसर्या दिवशी अचानक सोनावणे साहेबाना तातडीच्या कामानिमीत्त बाहेर गावी जावे लागले. ज्या दोन हवालदारांना त्यांनी ह्या केस मध्ये लक्ष घालायला सांगितले होते ते भूता खेतावर विश्वास ठेवणारे होते अन त्यामुळेच मास्तरांची केस काही पुढे सरकली नव्हती. आज साधारण आठ दिवसांनी ते पुन्हा रुजू झाले होते आन आल्याबरोबर मास्तरांची केस कुठेपर्यंत आलीय ते विचारले. काही प्रगती नाही हे बघून ते भयंकर चिडले. गेल्या आठवड्यात दोन वेळा पूर्वी सारख्याच वस्तू पुलाजवळ आढळल्या हि बातमी गावकर्यांकडून कळल्याचे त्यांना समजले आणि ह्या हवालदारांनी त्यावर काहीही केले नव्हते हे समजल्यावर तर त्यांची अजून चीड चीड झाली. वैतागून त्यांनी चहा मागवला. चहा घेऊन जरा तरतरी आली अन एकदम काहीतरी आठवले तसे साहेब म्हणाले "अरे त्या मास्तरांच्या शव विच्छेदन अहवालाचं काय झालं"? "कालच आलाय साहेब" असे म्हणून शिंदेनी एक फ़ाइल त्यांच्या समोर ठेवली. ती वाचता वाचता सोनावणे साहेबांच्या चेहऱ्यावर काळजी किंवा आश्चर्य असे मिश्र भाव उमटले होते. अन लगेच त्यांच्या हातून घडलेली सगळ्यात मोठी चूक त्यांच्या लक्षात आली. साहेब तडक उठले अन म्हणाले "शिंदे गाडी काढा". गाडी पुन्हा मास्तरांच्या गावाकडे धाऊ लागली होती. साहेब काय झालाय हे सांगत नव्हते. कारण साहेब स्वतःच आश्चर्यचकित होते ... वैद्यकीय अहवालानुसार मृत्यू चे कारण दोरीने गळा आवळून श्वास कोंडल्यामुळे असा नमूद केला होता. शिवाय मास्तरांच्या अंगावर, कपड्यावर कुठल्याही पशु किंवा जनावरांच्या नाही तर माणसांच्या हातांचे ठसे सापडले होते. गावात पोहचतच त्यांनी चार महत्वाची माणसे बोलावली अन मास्तरांच्या घराचे कुलूप तोडले. पहिल्याच दिवशी जे काम करायचे राहिले होते ते आज केले जात होते. आत मध्ये मास्तरांच्या घराची झडती घेण्याचे काम सुरु झाले. मास्तरांच्या घरात फारसे काही आढळले नाही. तेवढ्यात एक जण आला अन साहेबाना सांगू लागला  "त्या दिशि मास्तर म्हणत व्हते कायतरी पुरावा हाय ..... भूत बित काय न्हाय म्या ते दाखीवतो समद्यास्नी". साहेब म्हणाले

"कळेलच आता". मास्तरांची एक फ़ाइल सापडली त्यात बर्याच पेपरची कात्रणे होती. त्यामध्ये बरीचशी भुताच्या गोष्टी किंवा तत्सम माहितीवरील होती. ती भरभर चाळुन पहिली. पण शेवटची - कात्रणे वेगळीच होती. त्यात भुताच्या गोष्टी नव्हत्या. त्यातल्या प्रत्येक कात्रणात कुठेतरी अवैध वाळू उपसा त्या संदर्भातील गुन्हे अन बातम्या होत्या. कुठे तलाठी किंवा तहसीलदार ह्यांच्यावर हल्ला तर कुठे इतर कोणाला मारहाण किंवा खून अशा बातम्या होत्या. ह्या सगळ्या बातम्या आजू बाजूच्या गावात घडणार्या होत्या. हि कात्रणे का काढली असतील मास्तरांनी? "शिंदे अजून काही मिळतंय का पहा" असा साहेबांचा हुकुम सुटला. लाकडी कपाटात देवाची पोथी जश्या एखाद्या कपड्यात गुंडाळून ठेवतात तसे काहीतरी ठेवलेलं होतं. काढून बघितले असता त्यात एक डायरी निघाली. पहिल्याच पानावर "मला काही झाल्यास हि डायरी पोलिसांच्या ताब्यात द्यावी" असं सुवाच्च अक्षरात मास्तरांनी लिहून ठेवलं होतं. 

साहेबांनी डायरी वाचून काढली अन भुताचा छडा लागला. भूत वगैरे काहीही नसून केवळ नदीच्या वाळू उपशाला कोणी विरोध करू नये म्हणून हि भुताची शक्कल लढवण्यात आली होती हे त्यांच्या लक्षात आले. भुताची भीती बसून रात्री त्या बाजूला कोणी येणार नाही अन आपले काम बिनबोभाट करता येईल अशी हि चाल होती. लाखो रुपयांचा खेळ होता मग त्यासाठी हि अशी भुताची दहशत बसवली तर विनासायास सगळं सोपं होणार होतं. लोकांना दहशत बसावी म्हणून अवैध वाळू उपसा करणाऱ्या गुंडांची माणसं हि सगळी कामं बिनबोभाट करत असावीत असं मास्तरांनी नमूद केलं होतं. अन म्हणूनच ती बातम्यांची कात्रणे काढली होती हे आता साहेबांच्या लक्ष्यात आले. मास्तरांनी पुढे लिहिलं होतं "ते लोक पुलाजवळ काहीही आणून ठेवत असणार. हे करताना कोणी ओळखू नये म्हणून स्वतःला पूर्ण झाकून घेत असणार. दुसर्या रात्री तिथे टाकलेल्या वस्तू गुपचूप उचलून नेत असणार. तिथे येणारे आवाज तेच लोक काढत असावेत. शुक शुक करून लोकांना घाबरवणे कि जेणेकरून लोकांनी रात्रीच्या वेळी त्या बाजूला जाऊ नये. खर्र खर्र आणि सप्प सप्प येणारे आवाज हे वाळू लोखंडी पाट्यांमध्ये भरून त्र्याक्तर मध्ये भरताना होत असणार. शिवाय जो एक दर्प कधी कधी तेथे येतो तो तिथे रॉकेल टाकून पेटवलेल्या शेकोटीचा आहे. परवाच मी नदीच्या वरच्या बाजूला दुपारी अर्धवट जळलेली लाकडे पहिली आहेत. शिवाय ओली वाळू वाहून नेताना त्यातून गळणारे पाणी रस्त्यांवर पडत असावे सकाळपर्यंत ते पाणी सुकूनहि जात असणार त्यामुळे त्याचा काही पुरावा राहत नसावा. हे सगळे रात्री लोकना घाबरवायला उपयोगी पडत असावे कारण सुरुवातीला मी स्वतः सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीना घाबरलो होतो. पण ह्या सगळ्याच्या मागे नक्की कोण आहे हे अजून मला समजले नाही. पण येत्या काही दिवसात तेही मी शोधून काढीन." इतक्या सगळ्या गोष्टी त्यांनी बारकाईने नमूद केल्या होत्या. पण ह्या सगळ्या गोष्टी मास्तरांनी वर्तवलेल्या शंका होत्या. साहेबांनी सगळ्या गोष्टी सोबत घेऊन कोणाला काहीही सांगता मास्तरांचे घर सील करून निघाले. पण एकूणच मास्तरांची डायरी मिळाल्या नंतर आता तपासाला वेगळीच दिशा मिळाली होती.

मास्तरांनी जेव्हा आपण ह्या गोष्टीचा छडा लावणार असे जाहीर केले तेव्हा पासून त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती. अन त्या दिवशी त्यांनी टेकाडावरून आपल्याला पाहिले असावे अन त्यांनी कोठे बोभाटा करू नये म्हणून त्यांना संपवण्यात आले अन मागे पुरावा काहीही सोडला नाही. पण मास्तरांनी ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या असतील असे कोणालाही वाटले नाही. पण कोण असतील हे लोक ह्याचा अजून उलगडा झाला नव्हता. सोनावणे साहेबांनी लगेच काही हवालदारांना गावकर्यांच्या नकळत रात्रीच्या वेळी नदीवर पहारा देण्यास सांगितले. आता हे काय नवीन हीच त्या हवालदारांची प्रतिक्रिया होती पण साहेबांपुढे बोलण्याची टाप नव्हती. पण जास्त वेळ लागता आठवड्यातच त्यांच्या प्रयत्नाला यश आले. वाळू उपसा करायला आलेली टोळी आयतीच त्यांच्या हातात सापडली. पोलिसी खाक्या दाखवल्यावर आपोआप सगळे बाहेर आले. मास्तरांनी वर्तवलेल्या एकूण एक शंका आगदी बर्रोबर होत्या. त्या माणसांनी ह्या सगळ्या मागे जयसिंग राव म्हणजेच माजी आमदार साहेबांचा धाकटा भाऊ हा खुद्द आहे असे सांगितले. हे सगळे त्याच्या सांगण्यावरून केले असा जबाब दिला. मास्तरांच्या खुनाची कबुलीही दिली अन अखेर जयसिंगच्या हातातही बेड्या पडल्या. मास्तरांच्या डायरीनेच जवळपास सगळी केस सोडवली होती. 

मनुष्य हाच सगळ्यात हिंस्र पशु आहे. आपल्या फायद्यासाठी आपल्या लालासेसाठी त्याची कुठल्याही थराला जायची तयारी असते ... तयारी काय तो जातोच. पशु सुद्धा त्यांना भूक लागेल तेव्हाच शिकार करतात पण ह्यांच तसं नाही. कितीही पैसा, कितीही मोठं घर, कितीही मोठी गाडी जवळ असली तरीही अजून हवे अजून हवे ह्याची हाव काही सुटत नाही. अन मग ह्याच हव्यासापायी सुरु होतो एक जीवघेणा खेळ ज्यात इतर सामान्य जणांच्या मनाचा, भावनेचा, विचाराचा, रागाचा, लोभाचा, भीतीचा कशा कशाचा म्हणून विचार केला जात नाही. ज्याच्या हाती सत्ता किंवा ज्याच्या अंगात ताकत तो काहीही करायला मोकळा मग मरेनात का उकिरड्यावर पडलेल्या कचर्यातल्या कस्पटा समान जगणारे लाचार सामान्य लोक. त्यांची पर्वा का अन कुणी करावी? ही कस्पटे काय तुम्ही म्हणाल त्याला घाबरतील. त्यांना कायदा सांगा घाबरतील, त्यांना नियम सांगा घाबरतील, आजारांची भीती घाला ... घाबरतील, त्यांना भुतांबद्दल सांगा त्यावरती ते घाबरतील .... इतकच काय घराच्या बाहेर पडायचंही बंद करतील. माणुसकीचा जिथे अंत होतो तिथे अपसूकच ह्या असल्या भुताटकी जन्माला येतात .... त्यासाठी पिशाच्च योनीतून कुणीतरी येण्याची गरजच काय? माणसाच्या मनामध्ये जो पर्यंत पिशाच्च रुपी सैतान वास करत राहतील तोपर्यंत असल्या भुताटकी गावा गावांमध्ये वास करत राहतील अन मास्तरांसारखे निष्पाप जीव हकनाक मारले जातील. दुर्दैवानी भूता खेतांच्या अंधश्रद्धेला बळी पडू नका असे सांगणार्या मास्तरांचा मनुष्यरुपी भुताटकी कडूनच अंत व्हायचा होता अन तो झाला.

काही महिन्यानंतर: पुलावरच्या भुताच्या गोष्टी आता विरल्या होत्या अन गावात शांतता होती. सगळीकडे अलबेल होतं. अन अचानक एकेदिवशी पारावरती चर्चा सुरु होती " आवं काल राताच्यालाच झालं न्हवं हे" महादू सांगत होता "आवं पांडबा असा घाबरला व्हता अन म्हणत व्हता काल रातच्याला येताना पुलाजवळ मास्तरांना बगितलं ........... "     

(समाप्त)

©अभिजीत अशोक इनामदार
  कामोठे नवी मुंबई                 

No comments:

Post a Comment