Monday, 23 May 2016

रण संग्राम (भाग ६ शेवट) (कथा)

रण संग्राम (भाग ६ शेवट)

दिनांक: १६ फेब्रुवारी २०१६
लिखाण: अभिजीत अशोक इनामदार 

पायथ्याशी आलेल्या त्रिविक्रमाच्या फौजेवर आजू बाजूला असलेल्या झाडांच्या टोकांवरून भाले अन बाण यांचा वर्षाव सुरु झाला. त्रिविक्रमाची फौज खाली येण्याचा मार्ग साफ करत असतानाच धर्मसेनने त्याचे निष्णात तिरंदाज उंच झाडांच्या टोकांवर चढवून बसवले होते. आगदी टप्प्यात आल्यामुळे ते व्यवस्थित नेम धरून त्रिविक्रमाच्या एका एका सैनिकाला टिपत होते. असं म्हणतात संधी प्रत्येकाला मिळते... काही वेळापूर्वी असलेली परिस्थिती अन आत्ताची परिस्थिती एकदम उलट होती. आता त्रिविक्रमाच्या सैन्याला काय करावे ते सुचेना. झाडाच्या टोकांवरून येणाऱ्या बाणांनी ते घायाळ होऊ लागले. त्रीविक्रमाने आपल्या तोडीच्या राज्याशी सामना होतोय हे पाहून स्मित हास्य केले. अन स्वतःशीच पुट पुटल्यासारखा म्हणाला "हा आहे खरा दिग्विजयी अमरसेनचा नातू" पण काही क्षणच त्याने हि स्तुती केली. लगेचच त्याने त्याच्या सैन्याला एकत्र न राहता पांगण्याचा हुकुम दिला जेणेकरून आपल्या दिशेला सोडलेले सगळेच बाण लागू नयेत. धर्मपुरीच्या तीरांदाजना नेम धरून मारेपर्यंत आपण पुढे सरकत राहायचे असे त्याने ठरवले. मोठ मोठ्या ढाली स्वसौरक्षणार्थ वरती धरण्याचे फर्मावले. पण तो पर्यंत धर्मपुरीच्या तीरांदाजानी त्यांना अपेक्षित कामगिरी पूर्ण केली होती. त्रिविक्रमाच्या पहिल्या दोन तुकड्या त्यांनी गारद केल्या होत्या. अन अजूनही त्यांचे काम चालूच होते. काही क्षणात त्यांच्या जवळील बाणांचा साठा संपू लागला तशी राजा धर्मसेनला सूचना मिळाली अन मग स्वतः धर्मसेन घोड्यावर स्वार होऊन आपली शेवटची तुकडी घेऊन टेकडीमागून हल्लाबोल करून आला. आता त्रिविक्रम सुद्धा पुढे आला अन निर्णायक लढाईला सुरुवात झाली.

आज सुर्योदयापासून दोन्ही कडचे सैन्य न थकता न थांबता अविरत पणे लढत होते. कधी त्रिविक्रमाची सरशी तर कधी धर्मसेनची असे करता करता दिवसभर विजयश्रीने दोन्ही सैन्यांना दोलायमान स्थितीत ठेवले होते. निर्णायक विजयश्रीने अजून कोणाच्याच गळ्यात माळ घातली नव्हती. तिकडे दक्षिणेला समशेर अन विश्वासराव एकमेकांवर वार करून करून थकले. अन विश्वासरावांचा एक मोक्याचा वार समशेर वर बसला अन समशेर कोसळला होता. समशेरचे आगदी थोडे राहिलेले सैन्य आपला सरदार पडलेला पाहून घाबरले. पळण्यासाठी वाट शोधू लागले. असंख्य जखमा असूनदेखील विश्वासरावांनी पुन्हा घोड्यावर मांड जमवली अन ते अन त्यांचे बोटावर मोजता येतील एवढे साथीदार अभूतपूर्व पराक्रम करून आपल्या दुप्पट सैन्याला गारद करून खाली सुरु झालेल्या रणधुमाळीकडे निघाले.

त्रिविक्रमाची खासियत अशी होती कि त्याच्या बरोबर त्याच्या अवती भोवती नेहमी विश्वासू अन ताज्या दमाची फौज असे. त्यामुळे आता रणांगणात उतरलेली फौज ही आजच्या दिवशी आधी लढलेली नव्हती. त्यामुळे धर्मसेनला चोख प्रत्युत्तर मिळाले. एक एक पडणारा योद्धा बहुमोल होता. धर्मसेनची फौज हि ताज्या दमाची नसली तरी आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी पेटून उठलेली अशी होती. क्षणा क्षणाला चित्र पालटत होतं. त्रिविक्रम अन धर्मसेन मधोमध येउन लढत होते. अजून दोघांचे युद्ध सुरु झाले नव्हते. शत्रू पक्षातील योध्ये मारत मारत ते दोघे पुढे सरकत होते. आणि अखेर ते दोघे आमने सामने आलेच. दोघांनी एक मेकांना आव्हान देऊन लढायला सुरुवात केली. दोघांच्या तलवारी, हाताचा वेग… ठरायचं नाव घेत नव्हत्या. त्रीविक्रमाचा निसटता वार धर्मसेनच्या हातावर झाला त्याबरोबर त्याने पुढचाच वार त्रिविक्रमाच्या उजव्या खांद्यावर उतरवून सव्याज परत केला. असे करता करता दोघेही एक मेकांना एक एक घाव देत अन घेत होते. आजूबाजूच्या सैन्यामध्ये काय चालू आहे ह्याचा त्या दोघांना विसर पडला होता अन अशातच त्रिविक्रमाच्या मागून कोणीतरी भाला टाकला अन तो धर्मसेनच्या छातीत उजव्या बाजूला लागला. त्याबरोबर धर्मसेन कोलमंडला... त्याची तालावारीवाराची पकड जराशी सैल झाली तोच क्षण साधून त्रीविक्रमाने त्याच्या तलवारीवर वर केला अन तालावर धर्मसेनच्या हातून निसटली. हि तर त्रीविक्रमची नेहमीची खेळी होती. ऐन लढाईत त्याचा एक खास माणूस त्याच्या मागे त्याच्या हालचालींवर लक्ष ठेऊन असे अन वेळ साधून समोरच्या योद्ध्याला असा वर्मी घाव देई की बस सगळा नूरच पालटून जात असे. धर्मसेन पडला... धर्मसेन पडला असा आवाज झाला. पण धर्मसेनचे सैनिक लढायचे थांबले नाहीत. त्यांनी त्रिविक्रमाच्या फौजेची कत्तल सुरूच ठेवली. मरणच येणार असेल तर मातृभूमीच्या रक्षणार्थ येऊ दे अशी त्यांची धारणा होती. त्रीविक्रमाने धर्मसेनला शरण येण्यास सांगितले. आपल्या सैनिकांना थांबवण्याची आज्ञा देण्यस सांगितले. धर्मसेनने मानेनेच नकार दिला. त्याचे ते धारिष्ट्य बघून त्रिविक्रम चवताळला अन त्याने तलवार धर्मसेनच्या मानेवर ठेवली अन म्हणाला "तर मग मरणाला तयार हो धर्मसेन" धर्मसेनच्या मनात अनेक विचार तरळले... आजोबा-वडील यांच्या पराक्रमाच्या गोष्टी, त्यांचा दिग्विजय, त्याची मातृभूमी, त्याची प्रजा ज्यांचा त्याने आपल्या संतती सारखा सांभाळ केला होता, त्याची राणी सत्यवती.... त्याचे सरदार, प्रधानजी, सेनापती, विश्वासराव, हिम्मतराव सगळेच एकसे एक हिरे... आणखी अजून बरेच चेहरे. राजा धर्मसेन त्याच्या मातृभूमीच्या रक्षणार्थ रणभूमीत देह ठेवला हीच एक समाधानाची बाब असा विचार करून त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले अन तो मरणाला तयार झाला. त्रीविक्रमाचा तलवार घेतलेला हात उंचावलेला त्याने पाहिला... आता हा क्षण अन पुढच्या क्षणी आपले मस्तक धडा वेगळे… हा एकच विचार त्याच्या मनी आला अन काहीतरी अघटीत घडले.... तलवार घेतल्या उंचावलेल्या त्रिविक्रमाच्या हातावर तो हात खाली येण्याआधीच सपकन एक भाला येउन घुसला... त्रिविक्रम कळवळला... हातातली तलवार गळून पडली. तो मागे सरकला. धर्मसेन ने चमकून पाहिले भरधाव घोडा फेकीत आलेले विश्वासराव काही क्षणात राजांजवळ पोहचले. राजांच्या छातीतला भाला मोठ्या कष्टाने उपासाला. काही सैनिक लगेच कडे करून त्यांच्या भोवती उभे राहिले. त्रीविक्रमाच्या सैनिकांनी त्याला सौरक्षण दिले. धर्मसेन म्हणाला "विश्वासराव काय वेळ साधलीत..." विश्वासराव म्हणाले "राजन आपण बाहेर पडावे इथून... आज ह्यांचा पाडाव केल्याशिवाय हा विश्वासराव रणात पडायचा नाही". संपूर्ण शरीर जखमांनी भरलेलं असताना सुद्धा हे उभे कसे होते हेच आश्चर्य होते. राजा धर्मसेनचा उर भरून आला, डोळ्यात पाणी तरळले. धर्मसेन म्हणाला “विश्वासराव आपण मिळून पाडाव करू... मी कुठेही जाणार नाही. तुमच्यासारखी जिवलग आणि जीवाला जीव लावणारी माझी माणसं असताना मला कशाचीच भीती नाही”.

सुर्य मावळला होता... सूर्यास्तानंतरचा मंद प्रकश सगळीकडे पसरला होता. पशिमेला केशरी लाल झालेलं आकाश आज दिवसभर सांडल्या रक्ताची आठव करून देत होतं. विश्वासराव अन धर्मसेनने पुन्हा तालावर पेलल्या... तोच पूर्वेला खिंडीतून घोड्यांच्या टापांचा आवाज आला. आता ही कोणाची फौज आली ह्या विचाराने दोघांनी वळून पाहिले तोच एक आरोळी ऐकू आली "जय काळभैरवी" त्याला प्रतिसाद म्हणून लढणाऱ्या सैन्यातून कोणीतरी ओरडला "जय काळभैरवी". राजांनी चमकून विश्वासरावांकडे पाहिले. विश्वासराव म्हणाले "राजे आपले हिम्मतराव आलेत मानाजी रावांची कुमक घेऊन". लढाईचा नूर एकदमच पालटला. तापलेल्या उन्हात कडाडून वळीवाचा पाउस फुटावा तशी मानाजीरावांची फौज येउन त्रिविक्रमाच्या उरल्या सुरल्या फौजेवर फुटली. काही क्षणातच सगळ्यांचा धुव्वा उडाला. राजा त्रिविक्रम कैद झाला. अखेर विजयश्रीने धर्मपुरीच्या गळ्यात माळ घातली होती.

प्रधानजी, सेनापती ह्यांच्याशी विचार विनिमय करून राजा धर्मसेनने राजा कपिलसेन अन महत्वाकांक्षी त्रिविक्रम ह्यांना त्याच्या राज्याशी दगलबाजी, आक्रमण, अन आजच्या दिवसाच्या झालेल्या नर संहाराला जबाबदार म्हणून देहदंडाची शिक्षा सुनावली. ताबडतोब शिक्षेची अंमलबजावणी झाली. आपल्या सैन्याची झालेली हानी पाहन राजा धर्मसेन हळहळला. त्रिविक्रमापेक्षा बळाने आर्ध्या असलेल्या त्याच्या फौजेने यश तर संपादन तर केले होते पण खूपशा प्राणांच्या आहुती नंतर. राजांनी सर्व जखमींच्या जखमांवर इलाज करण्यासाठी वैद्यांना सूचना दिल्या, धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या अंतिम कार्याबाद्दलच्या सूचना दिल्या. राणी सत्यवतीला विजयाची बातमी देणारा संदेश दिला गेला. ज्यांच्यामुळे हा विजय मिळाला त्यांच्यासाठी वियोत्सव करणे गरजेचे होते म्हणूनच मग वाद्यांच्या तालात राजा धर्मसेन आपल्या जिवलग सरदारांना सोबत घेऊन धर्मपुरीच्या विजयपथाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला.

(समाप्त)

©अभिजीत अशोक इनामदार
  नवी मुंबई, कामोठे

No comments:

Post a Comment