Monday, 23 May 2016

भुताटकी ... भाग 3 (कथा)

भुताटकी ... भाग 3 

 लेखक: अभिजीत अशोक इनामदार

मास्तरांनी पटापट चालत घर गाठले. खरे तर त्यांना वाटत होते कि कोणीतरी खोडसाळपणा करत असेल. पण त्यांना वाटले होते त्यापेक्षा खूपच गंभीर अन भयानक प्रकार होता. आजचा त्यांनी स्वतः अनुभवलेला प्रकार तर त्यांच्याही आकलना पलीकडचा होता. नाही म्हटलं तरी आपण स्वतः सुद्धा खूप घाबरलो होतो हि गोष्ट त्यांनी स्वतःच्या मनाशी मान्य केली. घरी बसून पाणी पिल्यानंतर त्यांना जरा बरे वाटले. मास्तर एकटेच होते. खूप वर्षांपूर्वी त्यांची पत्नी मरण पावली होती अन त्यांना कोणी मुलबाळही नव्हते. तेव्हापासून ते एकटेच होते. शेजारच्या रखमानी त्यांचं जेवणाचं ताट कधीच आणून ठेवलं होतं. जेवणाची इच्छाच नव्हती. कसे बसे दोन घास खाउन मास्तर उठले. उरलेलं अन्न झाकून ठेवले अन बिछान्यात पडले. एव्हाना ते बर्यापैकी सावध झाले होते ... भानावर आले होते  झाल्या गोष्टींचा ते आपल्या बुद्धिनी विचार करू लागले. सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी ठरवली ती अशी कि उद्या सकाळी ह्या गोष्टीची वाच्यता कुठेही करायची नाही. कारण त्यांनी लोकांना ह्या गोष्टीबद्दल बोलायला आणखीनच बळ मिळाले असते.                  

रात्री मास्तरांनी काही आराखडे मनात तयार ठेवले होते. सकाळी आवरून झाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी हा प्रकार अनुभवला होता त्या दत्तू  लोहाराला त्यांनी गाठला. त्याच्या तोंडून त्या दिवशीची हकीकत व्यवस्थित ऐकली. काही शंका विचारल्या ... हे असे होते का? तसे होते का? काय काय दिसले? कसले आवाज आले? कसले वास आले? पण घाबरलेल्या दत्तूच्या मनात भीती बसली होती त्यामुळे बर्याच प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे नव्हती. नाइलाजानी त्यांनी त्याला जायला सांगितले. अन आपल्या कामाला लागले. पण पुलावरच्या भुताचा विषय काही डोक्यातून जात नव्हता. खरच तिथे भूत असेल? कि अजून काही? ह्या गोष्टीचा तपास करायलाच हवा होता. मग ते ज्यांना ज्यांना  तसे भुताचे अनुभव आले होते त्यांना भेटू लागले. दत्तू सारखेच प्रश्न त्यांना विचारात. पण गावातील बरेच जण घाबरलेले असल्यामुळे तिथे भूत आहे हे जवळपास सगळ्या गावानी नक्की केले होते. अशा  अवस्थेत गावकर्यांची काही मदत होईल असे काही वाटले नाही. मग मास्तरांनी स्वतःच काहीतरी करण्याचे ठरवले.   

त्यासाठी त्यांनी पुन्हा त्या जागी रात्रीच्या वेळी जायचे ठरवले. एक दोन दिवस वाट पाहून मग जाऊ असे त्यांनी ठरवले. अन मग मास्तरांनी रोज रात्री उशिरा त्या बाजूला जाण्यास सुरुवात केली. पहिले दोन तीन दिवस त्यांना काहीच दिसले नाही. त्याच्या पुढच्या दिवशी पुन्हा तसाच अनुभव आला. ह्यावेळी कवटी नव्हती तर फक्त लिंब आणि काळी बाहुली होती. दर दोन चार दिवसांनी असेच काहीतरी पुलाजवळ सापडलेले दिसे. पण एक मात्र होते जी गोष्ट सकाळी गावकर्यांना दिसत असे ती दिवसभर तिथेच पडून राही कोणी त्याला हात लावत नसे पण रात्री त्या गोष्टी गायब होऊन जात अन दोन तीन दिवसांनी वेगळंच काहीतरी दिसे. हि गोष्ट इतर कोणाच्या नाही पण मास्तरांच्या नजरेत नक्कीच आली होती. अजून एक गोष्ट म्हणजे ज्या दिवशी अशा काही वस्तू तिथे पडत तेव्हा तिथे काही तरी द्रव पदार्थ सांडत गेल्या सारखा दिसे. पण सकाळी त्याचे काही निशाण नसे. मास्तरांनी आता रोज मुख्य रस्त्यावरून जाण्या ऐवजी आडवाटेने जायला सुरुवात केली. नदीच्या इतर भागात ते फिरू लागले अन अजून काही धागे दोरे मिळतायत का ते पाहत.

रोज रात्री आले कि ते आज काय नवीन पहिले, ऐकले त्याचे टिपण काढून ठेवीत. परवाच्याच पेपर मध्ये भुताटकी वर आलेला लेख अन अजून बरीचशी माहितीची कात्रणे काढून ठेवली होती. त्या बरोबरच अजूनही काही महत्वाच्या बातम्यांची कात्रणे त्यांनी ठेवली होती. एव्हाना गावात अजून एक दोघांनी हा पुलावरच्या भुताचा थरार अनुभवला होता अन त्याच्या चर्चा गावात झडत होत्या. लवकरच काहीतरी उपाय करावा ह्यावर कालच गावात बैठक झाली होती. अन कोणीतरी मांत्रिक किंवा तांत्रिक बोलावून काहीतरी उपाय करावा असा एकमतानी ठराव पण झाला होता. मास्तरांनी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे थोतांड आहेत असे सांगितले. काल रात्री त्यांच्या हाती बरंच काही लागलंय असे सांगितले. माझ्याकडे पुरावे आले कि मी सर्वांसमोर ठेवीन असेही सांगितले. पण गावकर्यांनी काही ऐकले नाही. पण मास्तर भुताचा तपास करतायत हे गावाला कळून चुकले होते. एक दोघांनी "मास्तर अव कशा पायी असं काय करतायसा ... उगा काही झालं तर मग"? अशी आपली भीती अन मास्तरांविशायीचे प्रेम दोन्ही व्यक्त केली होती. मास्तरांना ह्या भाबड्या लोकांबद्दल जिव्हाळा होता म्हणूनच तर ते हे सगळे करत होते. आज मास्तर नेहमीपेक्षा लवकरच बाहेर पडले. आज त्यांनी नदीच्या वरच्या बाजूनी जायचे ठरवले होते. गावाच्या बाहेर आले अन नेहमीच्या रस्त्यांनी जाता वरच्या बाजूला जाण्याची जी आडवाट होती ती पकडली. त्या वाटेनी गेल्यावर थोड्याश्या टेकाडासारख्या जागी ते पोहचले. तिथून त्यांना संथ वाहणारी नदी दिसत होती उजव्या बाजूला नदी वरचा छोटा दगडी पूल दिसत होता. नदीच्या वरच्या बाजूला काही म्हणजे डाव्या बाजूला काहीतरी हालचाल वाटत होती. सगळीकडे सामसूम होती मधेच एखादी टिटवी ओरडत होती अधून मधून रातकिड्यांची कीर कीर चालू होती. आता ह्या संपूर्ण भागावर लक्ष ठेवण्यासाठी मास्तरांना डाव्या बाजू पासून उजव्या बाजू पर्यंत पुलाची जागा दिसेपर्यंत एका जागी बसून राहणे शक्य नव्हते. त्यांना कधी इकडे कधी तिकडे असे फिरावे लागत होते. ह्या सगळ्या आवाजांबरोबर आज पुन्हा नेहमीचा खर्र्र खर्र्र आवाज ऐकू आला ... पाठोपाठ सप सप असे आवाज हि आले. हे आवाज डाव्या बाजूनी येत होते. म्हणजे नदीच्या वरच्या बाजूला. मास्तरांनी आता पुलाकडे आपला मोर्चा वळवला. तिकडे काही दिसतंय का ते पाहण्यासाठी ते उजव्या बाजूला येउन थांबले. सारखे दोन्हीकडे फिरून त्यांची चांगलीच दमछाक होत होती.  

एक दगडावर ते बसले अन पुलाकडे नजर लाऊन बसले. अन अचानक त्यांना असे जाणवले कि एक पांढरी आकृती पुलाकडे येत आहे. त्यांनी डोळे चोळून काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला पण नीट काहीच दिसत नव्हते. त्या आकृतीला चेहराच नव्हता. ना नाक ना डोळे ना कान .... आकृतीच्या हातात कसलासा दिवा होता त्याचा उजेड त्या आकृतीच्या आजू बाजूला पडत होता. त्यामुळे ती आकृती उठून दिसत होती. त्याच्या पाठीमागे काळ्या रंगाच्या दोन आकृत्या वेग वेगळ्या आकाराच्या येत होत्या. त्यांच्या हातात काहीतरी होते. पुलाच्या जवळ आल्यावर त्या तिन्ही आकृत्या खाली वाकल्या ... त्या तिथे वाकून काय करतायत ते एवढ्या लांबून दिसत नव्हते. पण अचानक कसलेसे आवाज येऊ लागले. कसले तरी मंत्र त्या आकृत्या म्हणतायत कि काय असे त्यांना वाटू लागले. त्या आकृत्या काही वेळातच तिथून उठल्या त्या पांढर्या आकृतीजवळ असणारा उजेड नाहीसा झाला अन अचानक आल्या तश्या त्या तिन्ही आकृत्या नाहीश्या झाल्या. मास्तर ह्या प्रकारांनी एकदम दचकले. आता पुलाजवळ जाऊन बघावे काय आहे? असा विचार करून मास्तर उठणार तोच एकदम मागून शुक शुक असा आवाज आला. आजचा प्रकार नवीन होता अन ह्या वेळी इथे हा आवाज येईल असे त्यांना वाटले नव्हते. मनाचा हिय्या करून ते उठले अन मागे वळले तोच एकदम अचानक फक्कन मोठा उजेड त्यांच्या चेहऱ्यावर पडला. काही कळायच्या आत अचानक झालेल्या प्रकाशझोतानी ते गोंधळले. त्यांनी आपले हात वर करून डोळे झाकून घेतले. दोन तीन क्षणांनी त्या उजेडाची सवय झाल्यावर हलकेच डोळ्यावरील हात हळूच बाजूला करून डोळे किलकिले करून पाहण्याचा प्रयत्न करू लागले. एक मोठी काळी आकृती समोर उभी होती ... त्या आकृतीची सावली मास्तरांच्या पायापर्यंत पडली होती. "कोण आहे? ....  कोण आहे"? असे मास्तरांनी विचारले पण समोरून काहीच उत्तर आले नाही. अचानक ती आकृती पुढे सरकू लागली ... ह्या आकृतीलाहि चेहराच नव्हता. एवढ्यात कोणीतरी पाठीमागून धावल्या सारखे त्यांना जाणवले. वळून पाहायच्या आत त्यांच्या मानेभोवती कशाचा तरी फास बसला होता. जोर लाऊन त्यांनी मागे वळण्याचा प्रयत्न केला अन मागे जे दिसले ते पाहून "अरे हे तर भूत्त्त ...." असे अस्पष्ट वाक्य तोंडून बाहेर पडले. पाय आपटून जीवाच्या आकांतानी मास्तर ओरडण्याचा प्रयत्न करत होते पण शब्द फुटत नव्हते.......  

भल्या पहाटे आज सगळे नदीच्या पुलाकडे धावत होते. आज ... आज कोंबडी किंवा बाहुली किंवा लिंब असे काही नव्हते  ह्या वस्तू ज्या जागी असत तिथे आज होते ...... कुंकू अन गुलालात माखलेले मास्तरांचे कलेवर .... भुताचा छडा लावण्याच्या ध्यासानी झपाटलेले मास्तर आज त्याच जागी निष्प्राण निस्तेज होऊन पडले होते. कुणीतरी म्हणत होते "तरी म्या म्हणत हुतो मास्तर नगा त्या फंदात पडू ... पार चांगला शिकला सवरलेला माणूस पण हकनाक गेला बघा." सगळा गाव सुन्न होऊन बघत होता ..... पुलावरच्या भूतानि डाव साधला होता ... अन त्याचा पहिला नरबळी मिळवला होता.  

(क्रमश:)

©अभिजीत अशोक इनामदार
  कामोठे नवी मुंबई                 

No comments:

Post a Comment