रण संग्राम (भाग २)
दिनांक : १० फेब्रुवारी २०१६
अभिजीत अशोक इनामदार
राजांनी ताबडतोब त्याला हजर करण्यास
सांगितले. राजा कापिलसेनचा सेवक येउन राजा धर्मसेन समोर उभा राहिला. राजांना प्रणाम
करून त्याने बसलेल्या मान्यवरांना कमरेत लावून वंदन केले. अन हातातला खलिता प्रधानजिंच्याकडे
सुपूर्त केला. राजांनी त्याच्या प्रणामाचा स्वीकार करून प्रधानजींच्याकडे पाहिले. प्रधानजींनी
खलिता उघडून वाचायला सुरुवात केली. "हे
राजन धर्मसेन मैत्रीपुर्वक नमस्कार... अंदाजानुसार त्रीविक्रमाने आपल्या राज्यांकडे
त्याचा मोहरा वळवला असून त्याच्या पहिल्या दश सहस्त्र घोड दळानी सुरजनगरीवर हल्ला बोल
केला. बरीच नासधूस करून बाजारपेठ लुटली. पण हि फक्त सुरुवात होती. आमच्या सैन्यांनी
त्यांचा बिमोड करून जास्त नुकसान होऊ न देता त्यांना राज्याबाहेर हुसकून लावले असले
तरी हे संकट टळले नाही अशी माझी खात्री आहे. त्रिविक्रमाचा सप्त सहस्त्र सैन्याचा सागर
शक्य तितक्या वेगाने सुरजनगरीकडे कूच करीत आहे हि आजची खबर आहे. हे केवळ सुरजनगरीवरील
संकट नसून, हे वादळ सुरजनगरीनंतर धर्मपुरीच्या
दिशेने कूच करेल म्हणूनच ह्या संकटाचा आपण मिळून सामना करावा असे मला वाटते. हे राजा
धर्मसेन… दिग्विजय करणाऱ्या महान राजा अमरसेनचा तू नातू असून शूरवीर राजा शूरसेनचा
तू पुत्र आहेस. तू सुद्धा एक महान योद्धा आहेस याची मला खात्री आहे. आपल्या तीन पिढ्यांच्या
मैत्री संबंधाना स्मरण करून ह्या कठीण प्रसंगी तू आम्हाला मदत करावीस असे मी आवाहन
करीत आहे. माझा हा संदेश मिळताच क्षणाचाही विलंब न करता आपली सगळी फौज घेऊन तू स्वतः
सुरजनगरीकडे प्रस्थान करावे अशी मी तुला विनंती करीत आहे. त्रीविक्रमासारख्या सैतानापासून
आपली राज्ये वाचवण्यासाठी आपल्याला एकत्रित पणेच लढणे गरजेचे आहे. त्वरित उत्तरादाखल
खलिता धाडावा. राजा कापिलसेन" खलिता वाचून पूर्ण झाल्यावर प्रधानजींनी त्या
सेवकाला बाहेर जाउन विश्राम करण्यास सांगितले. तुझ्या बरोबरच आम्ही आमचा परतीचा संदेश
देऊ असे सांगून त्याला बाहेर पाठवले. राज्यांकडे वळून म्हणाले "महाराज अपेक्षित
असा हा संदेश आहे. आपणास लवकरात लवकर सुरजनगरीच्या बचावासाठी निघणे गरजेचे आहे".
धर्मसेनने सेनापातीकडे बघून विचारले "आत्ता आपली किती फौज तयार आहे सेनापती"?
"तीस सहस्त्र स्वार काही वेळातच कूच करू शकतील अशीच आपली तयारी असते महाराज. दिवस
उजाडेपर्यंत आणखी तीस सहस्त्र फौज गोळा होऊन तयार राहील" सेनापती म्हणाले.
"ठीक तर मग पहिली तुकडी अन आम्ही सुरजनगरीच्या मदतीला येत आहोत असा संदेश ताबडतोब
रवाना करा प्रधानजी". महाराज उठले अन तयारीसाठी निघून गेले. सेनापती त्यांच्या
सरदाराना गोळा करून त्यांची कामे त्यांना समजावू लागले. सगळीकडे सैन्य तयारीला लागले.
रात्रीच्या काळोखात सुद्धा येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी धर्मपुरीत एक प्रकारचे
चैतन्य सळसळू लागले. राजा धर्मसेनने सर्व प्रथम आपल्या राज्याची सुरक्षितता कशी असावी
ह्या बद्दल विचार केला. प्रधानजी ना पाचारण करून सागराच्या बाजूने असणाऱ्या हद्दीवर
तटबंदीचे काम कुठेपर्यंत आले ते पहिले. ते काम समाधानपूर्वक पूर्ण झाल्याचे पाहून आता
आपल्या राज्याच्या वेशीबाहेर पडल्यानंतर दोन्ही दिशांना (उत्तर अन दक्षिण) असणाऱ्या
पर्वत रांगांवर नजर ठेवण्यासाठी म्हणून काही मोर्चे बंदी करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
आणखी अजून काय योजना कराव्यात ह्या बद्दल प्रधानजींशी चर्चा केली. एव्हाना उजाडून गेले
होते. एक सैन्याची तुकडी सुरजगरीच्या दिशेने कधीच गेली होती. सेनापती स्वतः त्याबरोबर
जाणार होते पण राजांनी त्यांना मागे थांबवून घेतले होते. आपले मात्तबर असे दोन सरदार
त्यांनी पाठवून दिले होते. आम्ही मागून येत आहोत असा संदेश पाठविला होता.
विचारग्रस्थ अवस्थेत राजा धर्मसेन
फेर्या मारत होता. आलेले संकट कसे परतवून लावायचे ह्याबद्दल अजूनही व्यूहरचना त्याच्या
मनात चालूच होती. "राजन सगळी तयारी झाली
आहे. आपली फौज सुद्धा बरीच पुढे पोहचली असेल. आपण पण आता घाई करावी कारण आपण जेवढे
लवकरात लवकर सुरजनगरीकडे प्रयाण करू तेवढे चांगले होईल. न जाणो आपण पोहचण्य पूर्वीच
त्रिविक्रमाची फौज सुरजनगरीत पोहचली तर आपल्या मित्र राष्ट्रावर अन आपल्या सैन्याच्या
तुकडीवर आसमान कोसळेल" प्रधानजी म्हणाले. राजा धर्मसेन म्हणाला “प्रधानजी अजून तिथली नक्की परिस्थिती काय आहे
याची पूर्णतः कल्पना आली नाही. थोडी माहिती करून घेऊ अन मगच आम्ही बाहेर पडू.” पुढचा
आक्खा दिवस राजांनी विचार करण्यात घालवला. सगळी व्यवस्था चोख पार पडून सुद्धा राजा
धर्मसेन अजूनही धर्मपुरीच्या बाहेर पडला नव्हता. नेहमी राजांचे मन ओळखणारे प्रधानजी
त्यानाही हे जरा नवीन वाटले. राजे सुरजनगरीच्या रक्षणाला स्वतः जाणार नाहीत कि काय?
किंवा राजे घाबरून स्वतःचे प्राण वाचवू बघतात कि काय? किंवा त्रीविक्रमाशी संधी करावी
असे विचार तर त्यांच्या मनात चालू नाहीत ना? अशा अनेकाविध शंकांनी त्यांना घेरले.
(क्रमश:)
©अभिजीत अशोक इनामदार
नवी मुंबई, कामोठे
No comments:
Post a Comment