राज्याभिषेक
लेखक: अभिजीत अशोक इनामदार
"आये भाकर दे...
मल्हा सांगावा हाये…
गडाव जाया पाहिज्ये...."
"का रं बाबा....
आता कुठं स्वारी
हाय"
"आगं कुठं स्वारी
आसल तर आधी
कुनास्नी बी ठाव
नसतंय.... ते माझ्या
सारख्या शिपायाला कळणार हाय
व्हय? आगं आपलं राजं
बादाश्या व्हणार... मोट्टा आभिषेक
करणार..... मोठं सिंव्हासन
व्हणार.... "
"आगं बाय खरं
का? बरं झालं
बाय. माझा ऱ्हाजा
मोठ्ठा हुंदे". "शिरप्या तू जाणार
हायस गडाव .... बघाया
ते आभिषेक का
काय ते ..."
"म्हायत न्हाय... हवालदारास इचारतो....
का गं?"
"मला बी घिऊन
चल की संगट....
मल्हा ऱ्हाजाला बघाय
भेटल... त्याचं कवतिक बघाय
भेटल. लई खस्ता
खाल्या त्यानं. तेच्यामूळच आज
हे चांगलं दिस
बघाय मिळत्यात नव्ह?....
न्हाय तर आपल्याली
कोण इचारत व्हतं?
समदं पाटील-देशमुख आपल्याले
गिळाय टपलेले.... ऱ्हाजानी
यवस्था केली अन
चार घास मिळालं...
घर दार शाबूत
झालं... पोरंबाळं खाऊ पिऊ
लागली... पिक पाणी
आलं. राखलं गेलं...
हे समदं ऱ्हाज्यामुळं
झालं. मंग तेचं
कवतिक बघाय मला
बी जायचं हाय...."
"खुळी का काय?
राजं तुझीच वाट
बघत बसल्यात नव्हं
तिथं.... कवा शिरपतीची
आय येतीय मल्हा
भेटाय..... आगं
मला जाया भेटल
का न्हाय ते
ठाव न्हाय.... अन
म्हनं मला घेऊन
चल... चल वाढ
मला भाकर".
श्रीपती जेऊन गेला
गडाच्या दिशेनी.... पण श्रीपतीच्या
आईला काही चैन
नव्हती. राजांच्या अभिषेकाला आपण
जावं हि तिची
खूप इच्छा होती.
तो सोहळा आपण
स्वतः च्या डोळ्यांनी
पाहावा ही तिची
मनोकामना… पण पूर्ण कशी होणार?
पुढचा आठवडाभर काही
न काही घटना
घडत होत्या... नवीन
नवीन बातम्या कानी
येत होत्या. अजून
२ आठवड्यांनी राजांचा
राज्याभिषेक होणार होता. श्रीपतीला
गडाच्या बंदोबस्तासाठी तिथंच थांबावं लागणार
होतं. झालं म्हणजे
ती जी एक
आशा होती पण
धूसर झाली. लक्ष्मी
बाईंच्यापुढे आता काय करावे
हा प्रश्न होता...
श्रीपती गडावर निघून गेला.
त्याची बायको आणि मुलं
काही दिवसांसाठी म्हणून
तिच्या माहेरला निघून गेली.
आता लक्ष्मीबाई एकट्याच
राहिल्या घरी. आता
आपण काहीही करू
पण जाऊच असं
त्याना वाटायला लागलं. पण
राजांचा राज्याअभिषेक ज्या गडावर
होणार होता तो
कोणत्या बाजूस आहे, तिथे
जायला किती वेळ
लागेल हे काहीच
माहित नव्हतं. पण त्यांनी
ठाम निश्चय केला
आणि राज्याभिषेकाच्या बरोबर
६ दिवस आधी
त्या आपली शिदोरी
अन कपड्याचं बोचकं
घेऊन पहाटे पहाटे
घराबाहेर पडल्या. गावाबाहेर येऊन
त्यांनी काही जणांना
विचारलं अन आपल्याला
कुठल्या बाजूला चाललं पाहिजे
हे नक्की केलं
अन मार्गक्रमण चालू
झालं. बरच मोठं
अंतर कसं संपणार
या विचारात त्या
चालत राहिल्या. दुपार
झाली.... विसाव्याची जागा बघून
शिदोरी सोडली... पाटाचं पाणी
घेतलं अन जेवण
उरकून घेतलं. थोडावेळ
थांबून पुन्हा चालायला सुरवात.
संध्याकाळ होताच नजीकच्या गावात
धर्मशाळेत किंवा मंदिरात उतरायचं
जेवण करून झोपायचं
असं ठरवलं. त्यानुसार
त्या एका धर्मशाळेत
उतरल्या. बरोबरच्या शिदोरीतून जेवण
बनवलं अन पाठ
टेकली. दिवसभराच्या चालीने थकलेलं
अंग निद्रिस्थ होऊ
लागलं.... मध्यरात्रीच्या सुमारास काही तरी
गडबड ऐकू येऊ
लागली... पाठोपाठ घोड्यांच्या टापांचा
आवाज. लक्ष्मीबाई जाग्या
झाल्या. पाहता पाहता टापांचा
आवाज धर्मशाळे बाहेर
येऊन थांबला. १
सैनीक आत आला.
लक्ष्मीबाईंच्या बरोबरच असलेले अजून
एक कुटुंब ते
ही घाबरले.
सैनिक "कौन हो...
किधर से आये
हो? किधर जाना
है?"
त्या कुटुंबातील गृहस्थानी सगळे
सांगितले "पाव्हण्याच्या मुलीच्या लग्नासाठी गेलो
हुतो... गावाला परत चाललो" असं
म्हणून त्यांनी पिशवी काढून
काही नाणी त्याला
दिली. सैनिकांनी ती
हळूच ठेऊन घेतली
अन लक्ष्मीबाईंकडे वळला
व म्हणाला " बोलो...
किधर जा रही
हो? कहा से
आई हो? " लक्ष्मीबाई
घाबरल्या काय बोलावे
कळेना... घशाला कोरड पडली
धीर एकवटून म्हणाल्या
"गडाव चाललीय... ऱ्हाजाला भेटाय
अन तेचा अभीशेक
बघाय..."
सैनिक कडाडला "खामोश... कौनसा राजा...
काहे का अभीशेक?
शरम नाही आती
ऐसे बोलते हुये... यहा
राजा एक ही
है सुलतान साहब...
"
लक्ष्मीबाई "जनता मानती
त्यो खरा ऱ्हाजा...
आम्ही न्हाय मानत
तुम्हच्या सुलतानाला"
सैनिक चिडला त्यांनी लक्ष्मीबाईना
पकडून मारायला सुरुवात
केली. त्या गयावया
करू लागल्या आक्रोश
करू लागल्या... पण
ते ऐकायला तो
तयार नव्हता... त्याना
वाचवायला कोणीही नव्हते. बराच
वेळ मारून सैनिक
थांबला... अन माघारी
वळला. त्याचा एक
साथीदार बाहेर उभा होता.
ते दोघेच होते.
त्यांनी दुसऱ्या सैनिकाला झालेला
प्रकार सांगितला. तो म्हणाला
"ले के चलो
साली को साहब
के पास वही
देखेंगे क्या करना
है साली का"
भेदरलेल्या लक्ष्मीबाई भिंतीला टेकून
बसलेल्या होत्या... आता काय
होणार ह्या विचारात.
आपण आज सकाळी
किती आनंदात होतो.
आपल्या राजाला पाहण्यासाठी आपण
कोणालाही न सांगता
घराबाहेर पडलो... किती सोप्प
वाटलं होतं सारं...
राजाला जवळून पाहता येईल...
कानशिला वर हात
फिरवून त्याची इडा पिडा
काढून टाकू.... अन
अजून काय काय
... आपल्या
त्या विचारांचे आता
त्याना हसू आले
आणि आता आपले
काय होणार या
विचारात बसल्या. आपल्या ह्या
प्रवासाच्या पहिल्याच रात्री आपल्या
नशिबी हे काय
वाट्याला आले? कदाचित
आपल्या प्रवासाची ही पहिली
रात्र ही आयुष्याची
शेवटची रात्र तर ठरणार
नाही ना या
विचारांनी त्याना धडकी भरली.
तो पर्यंत ते दोघे सैनिक
आत आले आणि
म्हणाले "बुढीया चल हमारे
साथ.... तुझे हम
आज दिखाते है
कौन असली राजा
है...." त्यांना खेचून बाहेर
आणण्यात आले. पुन्हा
फरपट चालू झाली.
त्यांना आता न्ह्यायचे
कसे हा प्रश्न
होता. शेवटी तिचे
हात दोरीच्या एका
टोकाने बांधण्यात आले आणि
त्या दोरीचे दुसरे
टोक हाती पकडून
तो पहिला सैनिक
व त्याचा साथीदार
आपापल्या घोड्यांवर स्वार झाले.
जसे ते पुढे
जाऊ लागले तसे
लक्ष्मी बाई खेचल्या
जाऊ लागल्या अन
त्या घोड्यापाठी धाऊ
लागल्या. आता आज
आपलं काही खरं
नाही ह्या विचारांनी
त्यांना पुन्हा पुन्हा रडू
येऊ लागले. काही
अंतर पार होताच
घोड्यांच्या टापांचे आवाज येऊ
लागले... ते दोघेही
सैनिक थांबले. आवाज
जवळ जवळ येऊ
लागला अन एकापाठी
एक अशे १०
घोड्यांनी त्यांना वेढले. त्यांच्या
म्होरक्या एक पोक्ता
माणूस होता. गालावर
भरघोस पिळदार मिशा,
डोक्याला पगडी, रुंद छाती,
रेखीव नाक, भरगोस
कल्ले, रुंद कपाळ,
कपाळावर गंधाचा टिळा... एकूणच भारदस्त व्यक्तिमत्व.
धर्मशाळेत विसाव्यासाठी म्हणून आलेलं हे
पथक त्यांना धर्मशाळेत
आल्या आल्या घडलेला
प्रकार कळला होता
अन म्हणूनच हे
पथक ह्याच्या मागावर
बाहेर पडलं होतं.
२ मिनिटांत त्या
दोन सैनिकांचा धुव्वा
उडवून लक्ष्मीबाईंना सोडवण्यात
आले.
बजाजी घोड्यावरून उतरले अन
म्हणाले "बाई कोण
आपण? कुठे चाललात?"
लक्ष्मी बाईंनी कोण कुठल्या
शिवाय कुठे अन
कशासाठी चालल्या ते सांगितले
व त्यांना विचारले
"आपण कोण?"
बजाजी म्हणाले "आम्ही बजाजी, राजांच्या
सेनेत हाये. आता
गडाकड चालूया... गडाच्या
पायथ्याला एका बाजूच
चौकी पाहारा आमच्या
लोकांचा आहे. आमचं
सरदार तिथंच हायती.
त्यास्नीच भेटाय निघालुय".
लक्ष्मी बाईना आनंद झाला.
आपणाला सोबत नेण्याची
विनंती केली. त्यांनी नकार
दिला. कोण कुठली
बाई आपली ना
ओळख ना पाळख
उद्या तिथे जाऊन
काही आफत आली
तर... लक्ष्मी बाईना
त्यांची अडचण कळली.
त्यांनी आपला मुलगा
श्रीपती राजांच्याच
सैन्यात आहे असे
सांगितले. तिथल्या जवळच्या किल्लेदाराचे
नाव सांगितले. ती
माहिती ऐकून त्यांचा
एक साथीदार म्हणाला
"तरीच मगापासून आठवतुय... कुठ
तरी बघितलया म्हातारीला...."
अन तसाच बजाजींना
म्हणाला "म्या ओळखतू
शिरपतीला... त्याचीच माय हाय
हि."
मग बजाजीनि तिला परत
धर्मशाळेत आणली... दवा पट्टी
केली. दुसऱ्या दिवशी
सकाळी त्यांनी लक्ष्मी
बाईना घरी परत
जाण्यास सांगितले. पण लक्ष्मीबाईनी
नकार दिला व
परत आपल्याला सोबत
न्यावे अशी विनंती
केली.
बजाजी म्हणाले "बाई ऐका
आमचं... परत कालच्या
सारखा काही झालं
तर? तुम्ही पुन्यांदा
कधीतरी जावा म्हराजास्नी
भेटाय... आता लई
मोठी मोठी मानसं
इनार हायेत. तुम्हास्नी
न्हाई कुणी भेटू
देणार... बरं आम्ही
फकस्त पायथ्याला जाणार...
गडाव जायाला मिळलंच आसं काय
बी न्हाय... जाऊ
बी न्हाई बी."
लक्ष्मी बाई म्हणाल्या
"राजा ह्यो माझ्यासाठी
हाये आन मी
त्येंची रयत हाये
न्हवं? मग आमास्नी
भेटाय येळ न्हाय
असा न्हाय हुणार.
अन राजांचं तुमच्या
सारखं सैनिक असल्याव
मल्हा कसली भ्या...?
तुम्ही मला पायथ्या
पातुर तर न्ह्या.
न्हाईच वरती जाता
आलं तर गड
बघून यीन म्हागारी."
हो नाही करता
करता बजाजी तयार
झाले अन पुढचा
प्रवास चालू झाला.
आता सोबतीला लोक
होते त्यामुळे जरा
थोडा धीर आला
होता त्यांना. लक्ष्मीबाईना
एका घोड्यावर बसवले
होते ... तो घोडा
मध्ये ठेऊन त्याच्या
पुढे काही व
मागे काही असे
घोडे धावत होते.
३ दिवसांच्या धावणी
नंतर ते पथक
गडाच्या पायथ्याला पोहचले. पायथ्याला
पोहचून २ दिवस
झाले... कालपासूनच गडावर अभिषेकच्या
पूजाविधी-समारंभ यांना सुरुवात झाली.
तरी लक्ष्मी बाई
गडाखालीच होत्या. बाजाजीनी त्यांची
त्यांच्या सरदारांशी गाठ घालून
दिली. पण ते
स्वतःच बंदोबस्तात व्यस्त होते
की या गोष्टीत
लक्ष घालणे जमले
नाही. लक्ष्मी बाई
सारख्या बजाजीना आठवण करू
देत होत्या. पण
त्यांचाहि नाईलाज होता.
उद्या सकाळी राजे सिंहासनावर
आसनस्थ होणार होते, छत्र
धरी होणार होते.
लक्ष्मी बाई तळमळत
होत्या. गडावर, पायथ्याला प्रचंड
गर्दी उसळली होती
जो तो आनंदात
होता. गडावर वरती
जाण्यासाठी परवानगी लागत होती
त्यामुळे लक्ष्मी बाई वरती
जाऊ शकल्या नव्हत्या.
संध्याकाळ झाली होती....
गडावरचे व्यापारी नरहर शेठ
आपला नवीन आलेला
माल वरती पाठवण्याच्या
व्यापात होते. बजाजीनी त्यांना
पहिले व लक्ष्मीबाई
बद्दल सांगितले. त्यांच्या
सामानाची वाहतूक करणाऱ्या लोकांत
त्यांना घेऊन जाण्याची
विनंती केली. बजाजी म्हटली
तर मोठी आसामी,
सरदारांचे एकदम खास
त्यांचे ऐकले तर
पाहिजे म्हणून नरहर शेठ
शेवटच्या टप्प्यातल्या असामींबरोबर लक्ष्मीबाईना घेऊन
जाण्यास तयार झाले.
रात्र बरीच झाली
होती. तरी गडाचा
चढणीचा रस्ता पूर्ण भरून
होता. टप्प्या टप्प्यावर
तपासणी होत होती.
नरहर शेठ स्वतः
बरोबर असल्याने जास्त
काही त्रास ना
होता लक्ष्मी बाई
गडावर दाखल झाल्या.
आपण एक अभूतपूर्व
प्रवास करून गडापर्यंत
पोहचलो याचेच त्यांना नवल
वाटत होते. एवढा
लांबचा प्रवास... केवढा मोठा
गड... चढायला किती
बिकट. राज्याभिषेकाची तयारी,
सगळीकडे असलेला झगमगाट, दिव्यांची
आरास, त्याने उजळून
निघालेला संपूर्ण गड, राजांच्या
एका शब्दावर काहीही
करायला तयार असणारे
हे सगळे लोक. हे
सगळंच किती अलौकिक होतं, अद्भुत होतं, अवर्णनीय होतं. लक्ष्मी बाईनी हा असा तामजाम,
डामडौल कधीच पाहिला नव्हता. हे सगळंच त्यांच्यासाठी नवीन होतं. पण त्या बरोबरच आपल्या
राजाचं कौतुक वाटत होतं.
सततच्या प्रवासानी लक्ष्मीबाई थकल्या
होत्या. नरहर शेठच्या
माणसांनी त्यांना झोपण्याची व्यवस्था
करून दिली. पडल्या
पडल्या त्यांना झोप लागली.
आगदी पहाटे पहाटेच
राजांच्या अभिषेकाचे विधी चालू
झाले होते . मंगल
वाद्य वाजत होती.
मंत्रांचे घोष सुरु
होते सगळीकडे
गडबड, लगबग दिसत
होती. लक्ष्मीबाई न्हाऊन
माखून स्वछ् कपडे
करून राजदरबाराकडे गेल्या.
सर्व रस्ते तुडुंब
भरलेले होते. सगळीकडे आनंदी
आनंद होता. सगळ्या
दारादारात सुरेख रांगोळ्या काढल्या
होत्या, लोकांनी गुढ्या उभारल्या
होत्या. लोक नवे
कपडे घालून बाहेर
पडले होते. राजदरबाराचा
परिसर लोकांनी फुलून
गेला होता, मुंगीलाही
शिरायला वाव मिळणार
नाही एवढी गर्दी.
स्त्रियांसाठी वरती असलेल्या
चौथरयाकडे लक्ष्मी बाई गेल्या.
सूर्योउदय काही वेळातच
होणार होता. राजे
सिंहासनारूढ होण्याकरिता आवरून त्यांच्या
महालातून बाहेर पडल्याची वार्ता
आली होती. मुहूर्ताचे
घटिकापात्र घंगाळात बुडत आले
होते. लक्ष्मीबाई चौथऱ्यावर
चढून आगदी तन्मयतेने
सिंहासनाच्या दिशेनी पाहत उभ्या
राहिल्या. महाराज आले महाराज
आले.... एकच गलका
झाला. मुजरे झडले…
नजरा झुकल्या.... सारे तन्मयतेने
पाहू लागले. लक्ष्मीबाई
राजांना डोळ्यात सामावू पाहत
होत्या.... जमेल तेवढं
त्यांचं ते रूप
मनात साठवून घेत
होत्या. आनंदानी त्यांचे डोळे
भरून वाहू लागले.
गेले ५ - ६ दिवस
केलेल्या अखंड श्रमाचं
फळ मिळालं होतं.
त्या अंगभर गदगदल्या....
राजमाताना वंदन करून
राजे सिंहासनरूढ झाले....
शिंग फुंकली गेली...
जयघोष झाले.... राजांच्या
जय जयकारांनी परिसर
दणाणून गेला. चिंब भिजल्या
डोळ्यांनी लक्ष्मीबाई राजमातांच स्वप्न
साकार होताना पाहत
होत्या... अन त्याच
वेळीं उंच स्वरात ललकरिचा आवाज घुमत होता.... गो ब्राह्मण
प्रतिपालकsss क्षत्रिय
कुलावतंसsss सिंहासनाधीश्वरsss महाराजाधीराजsss..........!!!!
(समाप्त)
©अभिजित अशोक इनामदार
कामोठे, नवी मुंबई
४१० २०९