Thursday, 18 August 2016

१४ सेकंद

लेखन : अभिजीत अशोक इनामदार
दिनांक : 18 ऑगस्ट 2016

सकाळचे 10 - 10.30 वाजलेले. गर्दीचा बहर त्यातल्या त्यात कमी झालेला. आर्धी अधिक भरलेली बस निघण्याची डबल बेल झाली आणि गाडी पनवेल स्थानकातून बाहेर पडली. आपले मशीन चालू करून तिने तिकिटे फाडण्याचे काम सुरु केले. हो… नुकतीच तीन-चार महिन्यांपूर्वी पनवेल आगारात रुजू झालेली, सडपातळ बांध्याची, गोल चेहऱ्याची, सावळ्या वर्णाची, नाकी डोळी नीटस, केसांचा व्यवस्थित बो करून त्यावर व्यवस्थित काळी जाळीदार कॅप घातलेली, वाहकाच्या खाकी पेहरावात म्हणजे खाकी हाफ शर्ट आणि खालती खाकी प्यांट घातलेली ती एकदम खुलून दिसत होती. त्यात तिचे प्रसन्न स्मित हास्य वातावरण अजूनच प्रसन्न करीत होते.  

पुढच्याच स्टॉप वर तो बस मध्ये चढला. काही तरी चारपाच स्टॉप नंतरचे तिकीट काढले. समोर जाऊन रिकाम्या जागी बसला. रापलेला वर्ण, हातापायानी दणकट गडी, खुरटी दाढी वाढलेली, नाही म्हणायला कोणीतरी ओवाळल्याची खूण म्हणून कपाळावर लाल कुंकवाचा नाम आणि हातात स्पंजच्या गावाकडे मिळायच्या त्या टाईपच्या दोन मोठ्या राख्या. बाकी आज अंघोळ केली आहे का अशी शंका घ्यायला पुरेपूर वाव असा अवतार…

ती आता मागे बसलेल्या इतर प्रवाशांची तिकिटे काढण्यासाठी मागे गेलेली. आपल्याच कामात दंग असलेली. हा दर पाच मिनिटांनी मागे वळून तिच्याकडे पाहू लागला. अगदी लोचट किंवा अश्लील जरी नसली तरी काहीतरी हवे आहे अशी त्याची नजर होती. त्याचे तसे सारखेच मागे तिच्याकडे वळून पाहणे हळू हळू खटकू लागले होते.

बस जसजशी पुढे सरकत होती तशी गर्दी वाढत होती. नवीन आलेल्या माणसांच्या गर्दीत ती मागे जरा नजरेआड झाली की त्याच्या चेहऱ्यावरची बेचैनी वाढत होती. मध्ये मध्ये तर त्याने मागे वळून, उभा राहून तिच्याकडे पहिले. आता हे तिलाही कुठेतरी खटकत होते. तिने भुवया उंचावून "काय" असा नजरेनेच सवाल केला. काही नाही अशी मान हलवून करून तो खाली बसला. 

त्याचे सारखे सारखे वळून बघणे असह्य होऊन काही जणांच्या नजर जळजळीत झाल्या. काहींनी त्याच्यावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली.

- जाळलं मेल्याचं लक्षण हातात राखी बांधायची... अन दुसऱ्यांच्या पोरी/बहिणी रस्त्यावर पडल्यासारख्या लाळघोटेपणा करायचा - महिला वर्गातून एक प्रतिक्रिया

- नाहीतर काय? घरी पण बायकांना असाच निरखून बघतो कि काय कोण जाणे? - अजून एक अनुमोदन वजा प्रतिक्रिया

- काय पण एक एक नग असतात... एवढे बोलून पण पुन्हा वळून पाहतोय बघा.

बसमधील वातावरण हळू हळू तंग होण्याच्या मार्गावर. एव्हाना ती तिकिटे काढून पुढे येते. तिच्या हक्काच्या सीटवर टेकते. सुदैवाने म्हणा कि दुर्दैवाने पण तो तिच्या शेजारच्याच सीटवर विराजमान असतो. आता त्याला मान पूर्ण 180 अंशात फिरवायला न लागता फक्त 90 अंशताच वळवून ती दिसत असते.  

आता तिचा संयमही संपतो... आपले स्मितहास्य, लाघवीपणा गुंडाळून ती सुद्धा डोळ्यातून अंगार काढू लागते.

- अहो काय कधी बाई पहिली नाही काय? का लेडी कंडक्टर बघितली नाही. कधीचे वळून वळून बघताय? 14 सेकंदापेक्षा जास्तवेळ रोखून बघितले तरी आता मी पोलीस केस करू शकते म्हटलं... तुम्ही तर 14 मिनिटे झाली मला बघताय. काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? कितीही राग आला असला तरीही एकेरीवर न घसरता… पण आवश्यक ती जरब तिच्या आवाजात पटकन दिसून येते.

आता पुढे काहीतरी पाहायला मिळणार म्हणून बरेच बघे श्वास रोखून, डोळे ताणून बघू लागतात. आयष्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते फार मोठ्या प्रॉब्लेम्स मुळे फ्रस्ट्रेट होऊन कोणावर तरी राग काढायचा म्हणून संधीच्या शोधात असणारे शर्टाच्या बाह्या सारून हात मोकळे करायला म्हणून सरसावतात...

तोच तो आशाळभूत नजरेने परत तिच्याकडे पाहतो. जागेवरून उठून उभा राहतो अन दरवाजाकडे सरकतो आणि म्हणतो

- अहो द्या लवकर. इतका वेळ तुमच्याकडे बघतोय म्हणजे लक्षात नाही आलं काय?    

ती पुन्हा आश्चर्यचकित होऊन, भुवया आणि खांदे एकदम उडवून पुन्हा नजरेनेच काय असे विचारते

तो - अहो ताई माझे राहिलेले 5 रुपये द्या हो. हे काय आता उरण फाटा आला... मला उतरायचंय.

सुमारे 14 सेकंद सगळेच जण त्याच्याकडे अचंबित होऊन पाहत राहिले अन नंतर काय झाले होते ते कळल्याबरोबर… एखाद्या गाडीच्या चाकातून हवा जाताना जसा फस्स्स आवाज येतो तसा काहीसा सामूहिक हसण्याचा बसभर आवाज झाला अन त्याच्या “अहो ताई” ह्या हाकेने तिच्या चेहऱ्यावर पुन्हा ते स्मितहास्य परतले...         

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ...!!!

©अभिजित अशोक इनामदार
  कामोठे, नवी मुंबई  

Thursday, 11 August 2016

वखार (लेख)

वखार

लेखन : अभिजीत अशोक इनामदार
दिनांक : 11 ऑगस्ट 2016

आत्ता जरी नवी मुंबईमध्ये राहत असलो तरी आमचे बालपण हे खेड्यात गेले असल्यामुळे बऱ्याचशा गावाकडच्या लहानपणीच्या आठवणी मनात तशाच घर करून आहेत. काळानुरूप आम्ही वाढलो, बदलत गेलो पण तिथल्या गोष्टींशी असलेली नाळ काही तुटत नाही. माझ्या लहानपणी मी माझ्या आईला आणि काकूला माझ्या वयाच्या 12 वर्षांपर्यंत तरी चुलीवर स्वयंपाक करताना पाहिले आहे. त्या काळी ग्यास, टीव्ही अशा गोष्टी दैनंदिन गरजेच्या प्रकारात न मोडता चैन सदरात मोडत असल्यानं साहजिकच त्या घरी उपलब्ध नव्हत्या.

नाही म्हणायला रॉकेल (हल्ली त्याला सॉफिस्टिकेटेड भाषेत केरोसीन की कायसे म्हणतात) वरती चालणारा एक स्टोव्ह होता. पण संपूर्ण घरातील माणसांचा नाष्टा, स्वयंपाक त्यावर होऊ शकत नसे त्यामुळे चूल पेटवणे हे गरजेचे असे. शिवाय मागच्या अंगणात आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी एक वेगळी चूल होती. त्यामुळे चुलीशी तसे लहानपणापासून परिचित आहोत. तर ह्या चुलींना लागणारे इंधन म्हणजेच लाकडे, ग्रामीण बोलीमध्ये त्याला जळण किंवा सरपण असेही म्हणतात ते मिळण्याची जागा म्हणजेच वखार.

आमच्या घराशेजारीच शंकर भाऊंचे घर अन आणि रस्त्याच्या पलीकडे म्हणजे घरासमोर त्यांची लाकडाची वखार होती. तिथे काहीही बोर्ड वगैरे नव्हता. त्यांचा मुलगा दत्तू सुतार ती वखार चालवीत असे. माझ्या बालपणी तो जवळपास पंचविशी पार केलेला असावा. कायम निळा फुल्ल बाह्यांचा बनियन आणि खाली पांढरा लेंगा अशा अवस्थेत तो वखारीत वावरत असे. वखारीतच काय तर घरून वखारीत किंवा वखारीतून घरी जाता येता सुद्धा त्याचा हाच पेहराव असे. आयताकृती वखारीत आत मध्ये समोर उजव्या बाजूला सगळा लाकडांचा साठा असे. डाव्या बाजूला कव्हर्ड एरियामध्ये तो इतर सुतार काम करे. त्यामध्ये शेती साहित्याची म्हणजे नांगर, कुळव, फावडे, कुदळी, टिकाव वगैरेची दुरुस्ती किंवा नवीन साहित्य बनविणे, घराची दारे, खिडक्या, कपाटे वगैरे ही चाले. आमचे तिथे जाणे व्हायचे ते जळण आणण्यासाठी आणि रिकाम्या वेळेत तिथे खेळून धुडगूस घालण्यासाठी.

घरातले जळण संपले असेल आणि घरी काका किंवा बाबा कोणी नसेल तर मग काकू किंवा आई आम्हाला तिकडे पाठवीत असे. मग आम्ही जळण आणायला आलोय म्हणून सांगितले की आम्हाला दत्तू काका जळणाची लाकडे कोणती ते दाखवीत असे अन त्यातील लाकडे उचलून तराजूमध्ये ठेवायला सांगे. त्याकाळी बहुतांश वेळा मिळणारी लाकडे म्हणजे बाभळ किंवा लिंबाची असत. एक मण किंवा दोन मण जी काही सांगितली असतील तेवढी लाकडे तोलून झाली की मग आम्ही ती एक एक करून काढून खाली ठेवत असू. मग दोन्ही हात पुढे करायचे अन दुसऱ्याकोणीतरी त्या दोन्ही हातांवर आडवी लाकडे रचायची. ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार त्याला पेलेल एवढी लाकडे त्या हातावर झाली कि तो मग घराकडे जाई तो पर्यंत दुसऱ्या भावाच्या हातावर लाकडे दिली जात. अशा प्रकारे जळण आणणे ही घराची सामूहिक ऍक्टिव्हिटी पार पडे.

आता ती लाकडे वाहून आणताना हातांना ती टोचत, काहीवेळा ओरखडे उठत वा क्वचित प्रसंगी खरचटे पण त्याचे काही विशेष नसे. मागल्या खेपेस असे काही झाले म्हणून आम्ही पुढच्या खेपेस पुन्हा जळण आणायला गेलोच नाही असे कधी झाले नाही. उलट प्रत्येकवेळी उत्साहाने उड्या मारत आम्ही त्या वखारीत जात असू. बर आदल्या दिवशी संध्याकाळी लाकडे आणली की दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा फार फार तर संध्याकाळी आमची आज्जी आणि दत्तू ह्यांचा एक लडिवाळ संवाद घडे.

आज्जी - दत्या मेल्या जळण दिलंस का काल रात्री?

वास्तविक आम्ही जळण आणलेल तिने पाहिलेला असत, पण विषय फोडायची तिची अशी एक विशिष्ठ पद्धत होती.

दत्तू - व्हय कि व माई काल रातांच्यालाच दिलहाय न्हवं तुमच्या नातवंडासंगंट

आज्जी - मग सुक्काळीच्या जरा चांगल काढून नाही का देता येत?

दत्तू - आव चांगलच तर दिलहाय न्हवं...

आज्जी - हुम्म्म तर तर मोठा सांगतोयस चांगलं दिलंय म्हणून... सगळीच तर बाभळ आहे

दत्तू - मग माई आता आता काय सागवानी लाकूड द्यायचा काय जळणाला?

असे म्हणून दत्तू खी खी खी करून हसे

आज्जी - मुडद्या तुला सागाचं लाकूड दे म्हणून म्हणाले का मी? पण जरा चांगली द्यायची ना?

दत्तू - म्हंजी कशी?

आज्जी - मेल्या लहान पोरं आलेली बघून सगळी ओली बाभळ दिलीस तू? वाळकी लाकडं द्यायला काय जीव जात होता कारे भडवीच्या...

दत्तू त्यावर हासे अन वखारीकडे चालू लगे...

लहानपणी कित्येक वेळा लाकडे आणली असतील पण हा संवाद मात्र काही बदलत नसे. आता बऱ्याच जणांना आजीच्या तोंडाचे शब्द म्हणजे शिव्या वाटतील. हो… म्हणजे हल्लीच्या जमान्यात एखाद्याला मूर्ख, गाढव म्हटले तरी ते शिवी दिली असे समजले जाते. पण त्यावेळी चालत्या बोलत्या जिवंत माणसाला मुडद्या म्हणणे म्हणजे त्याला तसे संबोधणाऱ्या व्यक्तीला आणि त्या मुडद्याला सॉरी सॉरी त्या माणसाला देखील काहीच गैर वाटत नसे. बोलताना वाक्यांमध्ये काही स्वल्पविराम, पूर्णविराम अर्धविराम, उद्गारवाचक चिन्हं ही असल्या शब्दांमधून व्यक्त होतं. अन तसे त्याचे कोणालाच काहीच वाटत नसे.      

पोटापाण्यासाठी, आमच्या शिक्षणासाठी आई-बाबा, काका-काकू गावातून बाहेर पडले. आजी आजोबा गेले. बराच काळ मध्ये लोटला… मग मधेच कधीतरी अशा आठवणींचे उमाळे मनामध्ये दाटून येतात. मन धावत धावत जाऊन म्हासुर्ण्यातील आमच्या आळीतील घराजवळील पिंपळाच्या पारावर जाते, नरसोबाच मंदिर दिसू लागते, घर दिसू लागते अन घरासमोरील दत्तूची वखारही दिसू लागते. मागे एकदा चुलत भावाच्या लग्नासाठी गावी जाणे झाले. घरासमोरील बिन नावाच्या लाकडी वखारीच्या भिंतीवर "श्रीदत्त कारपेंटर्स" अशी पाटी झळकत होती. बदलत्या कालानुरूप वखारीनेही आपले रूप बदलले होते तर. संध्याकाळी सहज म्हणून आत डोकावलो तर दत्तूशेटचा मुलगा कसल्याश्या लाकडावर रंधा मारून ते लाकूड गुळगुळीत करीत होता. मला बघून हसला आणि मला म्हणाला

पांडा - या अभिजीत शेट... आज कसे काय येणं केलं?      

मी - मी कसला बाबा शेट... आलो होतो म्हटलं गाठ घ्यावी म्हणून आलो.

पांडा - बरे झाले आलास बाबा. नाहीतरी आठवणीने हल्ली भेटायला कोण येतंय म्हणा? आणि त्यात तुम्ही पुण्या मुंबईला जाऊन राहिले आपली गाठ पडणार कशी म्हणा...

तिथेच बाजूला एका टेबलवजा बेडवर बसलेला दत्तू  मला दिसला. पांडाने सांगितले मी माईंचा नातू म्हणून... लगेच हरकून गेला… म्हाताऱ्या मिचमिच्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत

दत्तू - लैच मोठा झालास लेकरा वळखलाच न्हाई बघ…

मी - हो आता हल्ली येणं होत नाही

मग माझी जरा विचारपूस करून त्याने बाजूला खेळणाऱ्या त्याच्या नातवंडाला… राम्या घरी जाऊन वखारीत चहा पाठवायला सांग असे सांगितले. घर शेजारी जवळच असल्याने ते पिल्लू पण घरी गेले. मी नको नको म्हणत असताना त्याने मला हातानेच गप्प केले.

मग मीच म्हणालो - बाकी काय म्हणते वखार? आता पूर्वीइतकी लाकडे दिसत नाहीत. प्लायवूड अन संमाईकाच जास्त दिसतोय…

दत्तू - खरंय बाबा... पर आता काय करायच… जे चालतंय ते करायला होवं ना... आता काय कोण चूल पेटवतय? आमच्याच घरात ग्यास आलाय बाकीच्यांसारखाच… मग कोण जळण न्हेणार. शेतीच्या कामालाबी जास्ती करून लोखंडी हत्यार वापराट्यात न्हवं... मग काय फर्निचरची कामं चालू केली. त्या साठीच लागतंय बघ हे.

तेवढ्यात चहा आला... हल्ली ग्यासमुळे चहा देखील लवकरच होतो असे उगाचच वाटून गेले.

बदल हा तर निसर्गाचा सर्वात मोठा अविभाज्य घटक आहे आणि तो कितीही हवाहवासा असो वा नकोसा असो व्हायचा तो बदल होतच राहतो. माझ्या लहानपणी मी पाहिलेली बिन नावाची लाकडाची वखार आणि आत्ताचे श्रीदत्त कारपेंटर्स ही एकाच जागेची दोन रूपे होती. लाकडे घ्यायला आल्यावर लाकडाच्या ढिगाऱ्यांवर चढून झाले उड्या मारणे, त्यांच्या मागे लपून दुसऱ्याला वेगवेगळे आवाज काढून घाबरवणे, किंवा ठिकठिकाणी असलेल्या लाकडांच्या ढिगाऱ्यांमधून पळापळी करणे ह्या आठवणी झर झर डोळ्यापुढून सरकत होत्या. मी शोधात असलेल्या वखारीच्या खाणाखुणा आता बऱ्याचशा पुसट झाल्या होत्या. येत्या काळात त्या पूर्णपणे नाहिश्याही होतील आणि वखारीसारख्या ठिकाणीही आम्ही केलेल्या गमती जमती फक्त आठवणींच्या रूपानेच शिल्लक राहतील. आता तिथे असलेल्या प्लायवूड आणि सनमाईका ह्यांच्या थप्प्यांमधून का कोणास ठाऊक तो आपलेपणाचा फील मात्र येत नव्हता.

गप्पा संपवून मी उठलो आणि "श्रीदत्त कारपेंटर्स" मधून बाहेर पडलो आणि घराकडे चालू लागलो. अवखळ मन मात्र अजूनही दत्तूच्या वखारीतील लाकडांच्या ओंडक्यांमधून उगाचच पळापळी करीत होतं.  

…..©अभिजित अशोक इनामदार
    कामोठे, नवी मुंबई  
 

Wednesday, 10 August 2016

सुटका (कथा)

सुटका

लेखन : अभिजीत अशोक इनामदार
दिनांक : १० ऑगस्ट २०१६

शांतामामींचे प्रत्येक कामात असतानाही नेहमीच स्तोत्र पठण चाले. आज शुक्रवार त्यामुळे भल्या पहाटे पासूनच त्यांची दुर्गा कवचाची आवर्तने सुरु होती. अर्थात गोपाळमामांच्या घराला हे काही नवीन नव्हते. शांता मामी म्हणजे सगळ्या गावच्याच मामी. गोल चेहरा, नाकी डोळी नीटस, नऊवारी साडी आणि कपाळावर जुन्या बंद्या रुपया एवढे कुंकू. एकूणच.. एकदम प्रसन्न व्यक्तिमत्व त्यातून बोलण्यात तर खूपच मिठास.
आज सकाळपासून मामी जरा चिंतेतच होत्या कारण दोन दिवसांपासून लागलेला पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नव्हता. घरात दिवस भरलेली... अवघडलेली सुनबाई सीमा. कालच त्या सरकारी दवाखान्यातल्या नर्स बाई येऊन गेल्या आणि म्हणाल्या इथे उपकेंद्रात डिलेव्हरी होण्यासारखी नाही हो. बाळ फिरल्यासारखे वाटते आहे. डांभेवाडीस न्यावे लागेल. तिला तिकडे आणा असे सांगून त्या डांभेवाडीस गेल्या खऱ्या. पण आता जायचे कसे हा एक मोठा प्रश्न होता... कालपासून गावाबाहेरच्या ओढ्यास पाणी खूप वाढले आहे. कोणीही माणूस, गाडी इकडची तिकडे जाऊ शकत नव्हते. त्यात त्यांचा मुलगा काल सकाळी कामावर गेला तो तिकडेच अडकून पडला होता. तो इकडे येऊ शकत नव्हता.
त्यात आज सकाळपासून सीमाच्या पोटात प्रचंड दुखू लागले होते. मामा पण अस्वस्थ होते काय करायचे असा प्रश्न होता. समजा गाडीची व्यवस्था किंवा अजून काही झाले नाही तर शेवटचा उपाय म्हणून मामींनी रखमा सुईणीला शंकर करवी भल्या पहाटेच निरोप धाडला होता. पण दिवस उगवला तरी अजून रखमा कशी आली नाही ह्या विचाराने मामी व्याकुळ झाल्या. सीमाच्या शेजारी बसून मायेने कपाळावरून हात फिरवताना त्यांनी तिला सगळ्या गोष्टींची कल्पना दिली. निदान रखमा मावशींना तरी बोलवा लवकर असे सीमाने म्हणताच त्या पुन्हा बाहेर ओसरीवर आल्या.
मामा अस्वस्थ फेऱ्या मारत होते.
मामी - अहो शंकर नाही आला का हो अजून? रखमेस घेऊन ये म्हणून सांगितले होते त्यास
मामा - अगं तो मघाच आला अन सांगून गेला. तुम्ही आत होता म्हणून हाक मारली नाही. कशी आहे सुंबाईंची प्रकृती?
मामी - अहो तिला कळा सुरु झाल्यात...
मामा - परमेश्वरा...
मामी - काय हो काय झाले? शंकर काय म्हणाला?
मामा - अगं रखमा घरी नाही म्हणाला… घराला कुलूप आहे म्हणे. शेजारी चौकशी केली तरी रात्रीपासूनच घर बंद आहे म्हणे.
मामी - अरे कर्मा... आता हो
मामा - तसा त्याने निरोप ठेवला आहे ती आल्या आल्या इकडे निरोप द्या म्हणून. आता तुम्हीच करा काय करायचे ते. मागल्या खेपेस सुमीच्या वेळेस तुम्हीच नाही केलंत तिचं बाळंतपण?
मामी - अहो त्या गोष्टीस झाली १० वर्षे. आता माझेच हात पाय लटपटतात. भीती वाटते हो.
मामा - हो पण काहीतरी करावे लागेलच ना
मामी - होय खरे... पण तुम्ही आत खोलीच्या बाहेर थांबा काही लागले तर आवाज देता येईल. अन तशी बाकी तयारी मी करून ठेवली आहेच
मामा - ठीक आहे तर मग
असे म्हणून दोघेही आत जायला वळले तोच एक मंजुळ आवाज कानी पडला
- शांता मामीचे घर हेच न्हवं?
मामा मामींनी वळून पाहिले एक स्त्री डोक्यावर खोप घेऊन उभी होती.
मामी - होय ग बाई... मीच शांतामामी? काय हवे होते?
- अहो मला रखमाने पाठवलंय तुमच्या सुनेसाठी...
मामींच्या चेहऱ्यावर अचानक आनंद झाला.
मामी - बरे झाले बाई आलीस वेळेवर. चल पायावर पाणी घे अन ये आत मी सगळी तयारी करून ठेवलीय खास. सुती कपडे, गरम पाणी, नाळ कापायला नवीन ब्लेडचे पान सगळे तयार आहे.
दोघीही भर भर आत निघून गेल्या. मामांना आता जरा धीर आला.
बऱ्याच वेळाने पण... लहानग्या बाळकृष्णाचा रडण्याचा आवाज वाडाभर गुंजला. मामींना काय करू अन काय नाही असे झाले. बाहेर येऊन त्यांनी गोड बातमी मामांना सांगितली, बाळ बाळंतीण सुखरूप आहेत म्हणाल्या अन पुन्हा आत गेल्या. बाळाचे बाळाच्या आईचे सगळे व्यवस्थित करून मग त्या बाई निघाल्या.
मामी - थांब जरा घोटभर चहा घेऊन जा.
- बरं
चहा झाला...
मामी - आगा तूस ओळखले नाही बाई मी
- अहो मी अंबिका न्हवं... माळ्याची. आव रखमा मावशीच्या घराच्या मागल्या बाजूला रहायला हाय न्हवं. मावशी काल रातच्याला गेली न्हवं तकडं डांभेवाडीस... मल्हा सांगून गेलीती. मामीचा सांगावा आला अन म्या नसन तर तू जा बाय म्हून. शंकर तकडं दुसऱ्या घरी निरोप ठिवून गेला.. त्यामुळं वाईच येळच झाला बघा.
मामी - असू दे असू दे पोरी... पण अगदी वेळेवर धावून आलीस बघ.
अंबिका - बर मल्हा अजून लई काम हायती... पुन्यांदा ईन बोलायला.
ती उठली तशी मामी म्हणाल्या अगं थांब तुझी ओटी भरते.
अंबिका - आता रहावं द्या मामी नंतर रिद्धी फिटली की सावकाश पोचती करा... काय गरबड न्हाय.
अन अजून काही बोलायच्या आधीच ती आली तशी निघूनही गेली.
मामींना बरीच कामं होती. आता वेळ नव्हता त्यांच्याकडे. दिवस मावळेपर्यंत पाऊस जरा उघडला. ओढ्याच पाणीही कमी झाल्याची वार्ता आली. काही वेळातच बाळाचे बाबा सुखरूप घरी आले. सगळं आनंदी आनंद झाला. काही वेळातच रखमा आली...
रखमा - मामी... ओ मामी
मामी - आत्ता आलीस होय रखमे. कधीची वाट बघत होते
रखमा - आव काय सांगू मामी वड्याच्या पल्याड दिसभर बसून व्हते न्हवं... कशी यायची व्हते सांगा? पर कशी हाय पोर?
मामी - अगो सकाळीच झाली सुटका तिची. मुलगा झाला.
रखमा - त्वांड ग्वाड करा मामी
मामी - होय बाई बस... अन बर झाल बाई तू अंबिकेला सांगून गेली होतीस ते.
रखमा आश्चर्याने मामींकडे पाहत म्हणाली
रखमा - अंबिका... कोण व अंबिका मला न्हाय ठाव.
मामी - अगं असा काय करतेस तूच नाही सांगून गेली होतीस कि तुला नाही जमले यायला तर तू जा म्हणून
रखमा - आव पर कोण आंबिका म्या न्हाय वळखत
मामी - अशी ग कशी धांदरट तू... स्वतःच विसरलीस
रखमा - आव पर... खरंच. कुठं र्हाती म्हून सांगितलं तिन्ह?
मामी - अगं तुझ्याच घराच्या मागे राहते म्हणाली.
रखमा - काय मामी... म्हाज्या घरा मागं एक तरी घर हाय का?
मामी - अगं हो खरेच की ते माझ्या लक्षात आलेच नाही. तुझ्या घरामागे काहीच नाही. थेट टेकाडावर अंबाबाईचे मंदिर… अधे मध्ये काहीच नाही. 
रखमा - व्हय तर ... नाव काय सांगितलं व्हतं?
मामी - अंबिका
रखमा - अंग म्हाझी माय... आन काय वटी बीटी भरली काय?
मामी - अगं मी थांब म्हणाले तर मला म्हणाली "आता रहावं द्या मामी नंतर रिद्धी फिटली की सावकाश पोचती करा... काय गरबड न्हाय".
रखमा - लई नशीबवान बघा मामी तुम्ही अन सुनबाय... आलं का ध्यानात कोण व्हती ती ते...
अन चिंब भिजल्या डोळ्यांनी मामींनी दुर्गाकवच म्हणायला सुरुवात केली...
श्रीगणेशाय नमः ||
ओंकाररूप श्रीगणेशातें
गं पहिले अक्षर जयाते
श्रीगजवदान त्या प्रभूतें
नमन माते दुर्गेसीही...||१||
देवी ! दुर्गे ! देई संरक्षण
कवच अंगी तव लेईन
गूढ सर्वसंरक्षक कथीन
अर्थहि नामांचा येथूनि ||२||....
…..
 
©अभिजित अशोक इनामदार
  कामोठे, नवी मुंबई

Monday, 25 July 2016

अजून किती निर्भया...!! (लेख)

अजून किती निर्भया...!!

दिनांक : 22 जुलै 2016
लेखन: अभिजीत अशोक इनामदार
 

कोपर्डी, अमरावती ह्या ताज्या बातम्या पाहून पुन्हा एकदा मन हेलावून गेले. खरेच आपला समाज - आपण नक्की कोणत्या दिशेने जात आहोत? पशूपासून उत्क्रांती होऊन आपला माणूस झाला खरा पण माणसातले माणूसपण संपूवून पुन्हा माणसाला पुन्हा उलट दिशेने... पशु होण्याकडे जाण्याची इच्छा का होते हे मला समजत नाही.

कोणी म्हणाले अमुक तमुक प्रकारचे सिनेमे पाहून लोक असे करतात? म्हणजे तसे सिनेमे आले नाहीत तर महिला मुलींवर अत्याचार होणार नाहीत? किती हास्यास्पद विधान आहे हे... अरे ज्यांना कोवळ्या अल्पवयीन मुलीवर सुद्धा दया येत नाही त्यांना माणूस तरी कसे आणि का म्हणावे? ह्या सगळ्या गोष्टींना कोणी मुलींना दोष दिला, त्यांचे कपडे, राहणीमान इत्यादी गोष्टींना दोष दिला, कोणी सरकारी यंत्रणेला दोष दिला, कोणी सिनेमा चित्रपटांना दोष दिला तर कोणी अजून कशाला दिला. पण मला सांगा कोणीही ह्या सर्वाला आपण जबाबदार आहोत असे म्हणताना का आढळत नाही? ही जबाबदारी मी, तुम्ही आपण साऱ्यांनी समाज म्हणून घ्यायला नको का? काहींना पटणार नाही पण त्यासाठी एक गोष्ट सांगतो.

आम्हाला आमच्या ऑफिसमध्ये ठराविक कालावधी नंतर पुन्हा पुन्हा काही ट्रेनिंग्स दिली जातात. पैकी वर्कप्लेस हऱ्याशमेंट हे एक महत्वाचे ट्रेनिंग. त्यामध्ये तीन व्यक्ती शोधल्या जातात पीडित व्यक्ती, अत्याचार करणारा वा करणारी व्यक्ती आणि ते सारे निमूटपणे पाहणारी व्यक्ती (ऑब्झर्वर).

पीडित व्यक्तीला त्यांच्यावरील अन्यायाची माहिती देण्यासाठी वेगवेगळे मार्ग जसे की प्रत्यक्षात जाऊन सांगणे, मेल करणे, फोन करणे हे दिलेले आहेतच पण त्यातून कोणी सांगू शकत नसेल किंवा अन्याय करणारी व्यक्ती उच्चपदस्थ असेल तर काम कठीण होते. म्हणूनच ऑब्झर्वर (म्हणजेच हे सगळे पाहणारी व्यक्ती) त्याचा रोल सुद्धा महत्वाचा असतो. ती व्यक्ती जर अन्याय करणाऱ्या व्यक्तीची बाजू घेऊन बोलू लागली किंवा वागू लागली तर त्याचे रूपांतर ऑब्झर्वर मधून अन्याय करणाऱ्यांत रूपांतरित होते. म्हणून त्यांनी सुद्धा काळजीपूर्वक राहणे - वागणे गरजेचे असते. आपल्या समोर जर असे काही घडत असेल तर आपण ते शांतपणे न पाहता त्याविरुद्ध आवाज उठावाने गरजेचे असते. ती व्यक्ती अगदी गुप्तपणे पण हे काम करू शकते. पण तसे करणे गरजेचे आहे.

आपला समाज हा ऑब्झर्वरची भूमिका नीट नाही का बजावू शकत? हो पण ही भूमिका थोडी जास्त महत्वपूर्ण आहे. कारण त्यासाठी सुरुवात आपल्यापासून आपल्या घरातून करावी लागेल. आपल्या मुलांना अगदी संस्कारक्षम वयापासूनच मुलींबद्दल आदर राखणे, त्यांचा मान सन्मान जपणे ह्या गोष्टी शिकवणे गरजेचे आहे. अर्थात आमची मुले असे काही करणार नाहीत अशी बऱ्याच जणांची खात्री असते पण ते फक्त स्वतःपुरते मर्यादित ना ठेवता जर एखादे वांड मूल आजूबाजूला दिसत असेल तर त्यालाही हे समजावून सांगणे गरजेचे आहे.

मुळात मेल फिमेल रेशो जो कमी आहे त्याला आपणच जबाबदार नाही आहोत का? तुम्ही आम्ही किंवा आपल्या आधीच्या काही पिढ्यांनी वंशाचे दिवटे हवेत म्हणून कित्येक निरागस कोवळे जीव तंत्रज्ञानाचा गैरवापर करून जन्माला येण्यापूर्वीच ती केवळ मुलगी आहे म्हणून अक्षरशः कुरतडून कुरतडून मारून टाकले नाहीत काय? अन ते कमी म्हणून आता तेच दिवटे जन्माला आलेल्या निरागस कोवळ्या मुलींचे वखवखलेल्या लांडग्यांप्रमाणे लचके तोडत असताना आपण फक्त हतबल होऊन पाहत राहायचे? हे खरेच माझ्या बुद्धीच्या पलीकडचे आहे.   

सगळ्याच गोष्टी सरकार करेल नाहीतर आम्ही सरकारला धारेवर धरू म्हणणारे… सरकारनेच घालून दिलेले किती नियम पाळतात? राज्य लोकांनी निवडून दिलेले सरकार चालवत जरी असले तरी हे राज्य हे लोकांचे राज्य आहे ना? लोकशाही असलेल्या राज्यात सगळ्क्या गोष्टी सरकार ने करून भागेल काय? आपण ह्या देशाचे नागरिक म्हणून सर्व नियमांचे पालन का करू शकत नाही? का अजूनही कुठेतरी जाऊन लिंगभेद चाचणी केली जाते? हा कायद्याने गुन्हा आहे हे माहीत असताना सुद्धा? प्रत्येक वेळी का आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवायला हवे... पोलिसिंग करायला हवे? आपले आपण मनाने हे नियम नाही का पाळू शकत? अन जर तसेच असेल तर मग कशाला लोकशाही अन लोकांचे राज्य वगैरेच्या बाष्कळ गप्पा झोडायच्या? त्यापेक्षा मग तो साहेबाचा हंटर बरा होता ना, त्या भीतीने का होईना लोक कायदा पाळायचे असे म्हणायची वेळ खरेच नको यायला.

उगाच त्या स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा, महिलांची गगनभरारी ह्या चर्चा करण्यात काय अर्थ आहे? कालच एक महिलेचा पहिली ट्रेन ड्रायव्हर म्हणून व्हाट्सअपवर फोटो आला होता, मध्यंतरी हैदराबाद मध्ये काही महिला भारतीय एअर फोर्स मध्ये फायटर पायलट म्हणून रुजू झाल्याची बातमी होती पण ह्या अशा गोष्टी आठवून आठवून उदाहरणे द्यावी लागतात ह्यातच सगळे नाही का आले?

सरकार, कायदा आणि सुव्यवस्था जे काही करायचे असेल ते करेलच आणि त्यांना ते करणे गरजेचे आहेच. पण सगळ्याच गोष्टी कोणीतरी येऊन आपल्यासाठी करेल ही भावना सोडायला हवी. आपण एक चांगला समाज म्हणून काय करू शकतो हे पाहायला हवे. आपण आपल्या मुलांना इतके चांगले संस्कारित करूयात की भविष्यात ती मुले असे काही करणार नाहीत याची खात्री वाटायला हवी. ती खात्री जोपर्यंत आपल्याला पटत नाही तोपर्यंत माझ्यासारखे मुलींचे बाप मात्र सुखाची झोप घेऊ शकणार नाहीत.     

©अभिजित अशोक इनामदार
  कामोठे, नवी मुंबई  

Wednesday, 20 July 2016

झिंगाट प्रेम (लेख)

झिंगाट प्रेम
 
दिनांक : 12 जुलै 2016

लेखन: अभिजीत अशोक इनामदार

मध्यंतरी एक मराठी सिनेमा आला... करोडो रुपये कमावले त्या सिनेमाने. दोन कोवळ्या मनांची प्रेमकहाणी अन त्याचा होणार शेवट अशी ही कथा होती. पेपर मध्ये आमुक अमुक चित्रपटाचा इफेक्ट अन फलाना जिल्ह्यातील 12 - 13 प्रेमीयुगुल फरार अशी बातमीही वाचनात आली. हे म्हणजे असे झाले की जर हा चित्रपट आलाच नसता तर हे पळून गेले नसतेच. अशी खात्री आहे काहो? अहो अशा विषयाचा हा पहिलाच सिनेमा आहे का? अर्थात आपल्याकडील तरुण तरुणी हे फिल्म स्टार्सना त्यांचा रोल मॉडेल समजतात अन त्यांच्या सिनेमांचा त्यांच्या मनावर चांगलाच पगडा असतो पण म्हणून आपण काय करतोय ह्याचे भान अगदीच हरवून जावे? कितीतरी जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा नायक नायिका असेच पळून गेले आहेत, जंगलात राहिले आहेत. लाकडी घरात राहिले आहेत. अशा वेळी नायिका "तुम काम पे जाओगे मै खाना बनाऊंगी और तुम्हारी राह देखुंगी" वगैरे वगैरे म्हणते. पण असे करणे हे कितपत शहाणपणाचे आहे हे कळण्याचे ते वय नसते हेच खरे.

मुळात सिनेमा नाटकात किंवा टीव्ही सिरियल्स मधील प्रेम हेच खरे प्रेम अशी जी काही भावना असते तीच मुळात चुकीची. अर्थात सगळ्याच सिनेमा किंवा टीव्ही सीरिअल्स वर माझा आक्षेप नाहीये. पण बऱ्याचदा यंग जनरेशनचा गोंधळ होताना दिसतो.

अर्थात ज्यांची आपली ठाम मते आहेत, किंवा त्याबद्दलचे त्यांच्या कुटुंबाने त्यांच्यावर केलेले संस्कार आहेत त्यांच्या बद्दल मी बोलत नाही. पण जे उगाच वाहवत जातात त्यांनी वेळीच स्वतःला सावरणे महत्वाचे असते.

दहावी किंवा बाराव्वी नंतर ना धड लहान मूल ना एकदम समजूतदार प्रौढ अशी साधारण जी अवस्था आयुष्यात येते. तेव्हा अपोसिट सेक्स बद्दल वाटणारे औत्सुक्य किंवा ओढ ही अगदी सर्वसामान्य गोष्ट आहे. पण त्या गोष्टींना त्या वयात किती महत्व द्यायचे हे कळणे खूप महत्वाचे असते. जेंव्हा कधी एखादा तरुण किंवा तरुणी ह्या गोष्टींमध्ये गुरफटून जातात तेव्हा त्यांना समजावताना निराळ्याच गोष्टींचा संदर्भ दिला जातो. जसे की त्यांची आपली जात वेगळी आहे, त्यांची आपली बरोबरी नाही होऊ शकत, गरिबी श्रीमंती वगैरे पैलू त्याला जोडले जातात. पण मुळात त्यामागील मानसिकता ह्या वयातील अल्लडपणा ह्या मुलांना त्यांची आयुष्य घडवण्यासाठीची जी मोलाची अन महत्वाची वर्षे असतात तीच हिरावून टाकतात ह्यावर किती भर दिला जातो?

मुळात ह्यांच्या लेखी प्रेम म्हणजे काय हे तपासून पाहणे गरजेचे आहे. शारीरिक आकर्षण हे एक मुख्य कारण असू शकते. पण त्या नंतर काय? समजा त्यातून काही समस्या झालीच तर ती निभावून न्यायाची ताकत अन कुवत दोन्हीही त्या कोवळ्या मनांमध्ये असते काय? बरं चला ती गोष्ट निभावून नेली तर पुढे काय? नकळत्या वयात आलेले पालकत्व पेलण्याची ताकत कुठून येणार? शिवाय पुढील सगळ्याच गोष्टी, स्थैर्य, त्यासाठी लागणारा आर्थिक आधार हा कुठून येणार? डोश्याच्या गाडीवर किंवा साधारण कुठल्याशा कंपनीमध्ये काम करून सगळ्याच गोष्टी सध्या होत नाहीत. 132 कोटीच्या पुढे लोकसंख्या (आजचा गुगल नुसरचा आकडा) असलेल्या देशात मुळातच संधी कमी आहेत. असे असताना न कळत्या वयात नको ते निर्णय घेऊन कसे चालेल बरे? ह्या गोष्टींचे भान तरुण पिढीला किंवा नुकत्याच तारुण्यात येऊ घातलेल्या पिढीला देणे गरजेचे आहे. प्रेम ही खूप चांगली संकल्पना आहे. ती मनामध्ये जरूर असावी, पण प्रेम मिळवण्याच्या नादात कुठल्याही थराला जाण्याचा प्रकार तरुणाई ने करू नये.

मुला मुलींनी काय करावे:

- जशा आपल्या भावना आहेत तशाच इतरांच्याही भावना असणार त्याचा आदर ठेवावा. आपल्याला वाटणारी प्रेमभावना समोरच्याला जाणवलाच असे नाही. तसे नसल्यास त्या गोष्टीचा खिलाडू वृत्तीने स्वीकार करावा. आणि आयुष्यात पुढे जावे. प्रेम भंगाचे दुःख जरी मोठे असले तरी आयष्य खूप सुंदर आहे हे लक्षात ठेवावे.

- आपल्याला नक्की काय हवे आणि आयुष्यात काय करायचे आहे हे पक्के करावे. स्वतःचे स्वतः ठरवता येत नसल्यास पालकांशी संवाद साधून ह्यावर मार्ग काढावा. घरातील व्यक्ती तुम्हाला तुमच्या जन्मापासून ओळखतात अन बहुतांश वेळा ते तुमचे भलेच इच्छितात.   

- जर कोणाबद्दल आकर्षण जाणवत असेल तर त्यात स्वतःला वाहवून जाऊ देऊ नये.

- ह्या वयात आपण हे सगळे पेलण्यास समर्थ आहोत का स्वतःच स्वतःला विचारावे.

- प्रेम, लग्न ह्या गोष्टी बाहुलीच्या  खेळा इतक्या सोप्या नसतात. तिथे आयुष्यभर साथ देण्याची तयारी, मानसिकता असावी लागते.

- आपल्याला विरोध करणाऱ्यांपासून पळून जाऊन आपण आयुष्यात सुखी होऊ असे काही नसते.

- लहान वयात सगळ्या जबाबदाऱ्या उचलण्यास आपण तयार आहोत का? ह्याचा विचार करावा.

- सिनेमा मध्ये वगैरे दाखवतात तसे कोणीतरी आपल्या मदतीला धावून येईल अशी फुकाची अपेक्षा ठेऊ नये.

- शिक्षण, करिअर सोडून फक्त प्रेमासाठी म्हणून पळून जाऊन… आपण कमाई कशी करणार? होणाऱ्या / झालेल्या पती वा पत्नीला आणि स्वतःला कुठे ठेवणार? शरीरसुख काही मिनिटे आनंद वा सुख देईल... त्यानंतर भूक वगैरे लागत नाही असे काही होत नाही. दिवसातून 3 - 4 वेळा खायला कुठून आणणार?

- जाती धर्माच्याही पेक्षा मी म्हणेन ज्या वातावरणात... ज्या घरात आपण वाढलो, ज्या सवयीनी आपण आत्तापर्यंत जगत आलो... दुर्दैवाने त्या सगळ्या शिवाय रहावे लागले किंवा आपल्या सवयीच्या अगदी विरुद्ध जगावे लागले तर आपण राहू शकू का? ह्याचा आधी विचार करावा. नंतर पश्चाताप करून वा वाईट वाटून घेऊन काही उपयोग नसतो. अशा वेळी बऱ्याचदा हातात काहीही उरत नाही.        

- शिक्षण पूर्ण नसताना आपल्याला चांगली नोकरी लागेल वा चांगला धंदा बसेल अशी आशा ठेवणे मूर्खपणाचे लक्षण असते. इथे चांगल्या संधीच्या शोधात सगळेच असतात हे विसरून चालणार नाही.

- आपण सगळ्या पासून लांब दूर निघून जाऊ जिथे दुसरे कोणी असणार नाही फक्त तू आणि मी… असे संवाद सिनेमा नाटकात चांगले वाटतात. प्रत्यक्ष आयुष्यात तसे शक्य नसते. सध्याच्या टेकनॉलॉजिच्या जगात तुमचा कधी ना कधी, कसा ना कसा पत्ता लागू शकतो हे लक्षातच ठेवावे. त्या शिवाय सगळ्या पासून लांब अशी कुठलीही जागा नसते. मनुष्य कितीही म्हणाला तरी आयुष्यभर जंगलात वगैरे राहू शकत नाही.

- त्यातूनही तुम्ही लांब जाऊन पोहोचलात तरी मन हा असा प्रकार आहे जो तुम्हाला, तुम्ही जिथून पळून आलात तिथे क्षणात नेऊन ठेऊ शकते. आपल्यांच्या विरहात जगणे हे फार कठीण काम असते.

एकूण काय... प्रेम करा जरूर करा. प्रेम खूप चांगली गोष्ट आहे. ती तुमच्यातली माणुसकी जिवंत ठेवेल. पण त्याच बरोबर आपले शिक्षण, करिअर, छंद ह्या गोष्टी जपा. प्रेमाची झिंग जरूर असावी पण झिंगाट प्रेमाच्या हट्टापायी आपल्या समोरच्या छान सुंदर आयुष्यात आपल्याच हाताने माती कालवणे काही योग्य नाही. प्रेम हे तुमच्या प्रगतीला पूरक असावे अधोगतीला लावणारे नसावे. आपले आयुष्य आपण घडवण्याची कुवत आपल्यात आणा अन मग काय हव्या त्या भराऱ्या घ्या. गगनभरारी घेण्यासाठी पंखांमध्ये आवश्यक असणारे बळ आधी पंखांमध्ये येऊ द्या. उगाच गगनभरारी घेण्याच्या नादात कुठे भेलकांडलात तर झडप घालू पाहणाऱ्या हिंस्र श्वापदांची इथे कमी नाही हे ही ध्यानी असू द्या.    

©अभिजित अशोक इनामदार
  कामोठे, नवी मुंबई  

(सदर लेख तारुण्यावस्थेत पदार्पण करणाऱ्या सर्व तरुण वर्गाला वाचण्यास द्यावा. माझ्या वॉल वरून तो शेअर करू शकता किंवा http://abhiinamdar.blogspot.com/ ह्या ब्लॉग वरती वाचू शकता.)     

Tuesday, 12 July 2016

मनोकामना (कथा)

मनोकामना  
दिनांक : 12 जुलै 2016
लेखन: अभिजीत अशोक इनामदार

पावसाच्या पाण्याचा घराच्या पत्र्यावर एकसारखा एका लयीत आवाज येत होता... कोणीतरी ताड ताड  ताशा वाजवावा तसा. मधूनच आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे ती लय थोडी बिघडत होती. त्यामुळेच पत्र्यावरील ताशा क्षण दोन क्षणांसाठी थांबल्यासारखा वाटे अन पुन्हा सुरू होई. रात्रभर पाऊस असाच कोसळत होता. आता चांगलं उजाडून गेलेलं 10 - 11 चा सुमार पण तरीही अगदी पहाट किंवा तिन्हीसांजेची वेळ असावी असे वातावरण. गावामध्ये काय दिवे जायला निमित्तच हवे. कालपासून धो धो पाऊस कोसळत होता मग तर  काही विचारूच नका. दिवे गेले नसते तरच नवल होते.
विसू तात्या त्यांची सकाळची सगळी कार्ये आटपून ओसरीवर बसले होते. खरेतर विश्वनाथ कुलकर्णी असे त्यांचे नाव पण गेल्या कित्येक वर्षांमध्ये त्या नावाचा उल्लेख कागदी पत्रव्यवहार सोडला तर कुठेही नव्हता. सगळ्या गावाचे ते विसू तात्याच आहेत. अगदी सज्जन गृहस्थ. कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. आपण भले अन आपले काम भले अशा खाक्याच माणूस तितकाच मावळ स्वभावाचा अन धार्मिक वृत्तीचा. तसे त्यांना रिटायर होऊन 15 वर्षे झालेली. म्हणजे त्यांनी नुकतीच वयाची पंचाहत्तरी गाठलेली. निस्सीम विठ्ठल भक्त. दरवर्षी वारीला जाणारा मनुष्य. घरच्या देवघरात अतिशय सुबक पितळेची विठ्ठल रखुमाईची मूर्ती होती. काय असेल ते असेल पण जे काही असेल ते पांडुरंगाला सांगावे आणि 'ठेविले अनंते तैसेचि राहावे... चित्ती असू द्यावे समाधान' असे त्यांचे वर्तन होते. पण तरीही मनात कसलीतरी रुखरुख होती अन ती स्पष्ट जाणवत देखील होती त्यांच्या चेहऱ्यावर.
दुपारच्या जेवणानंतर द्वारका माई म्हणजे तात्यांच्या सौभाग्यवती आणि गावाच्या माई बाहेर येऊन  बसल्या. तात्यांची घालमेल त्यांना समजत का नव्हती? उगाच का पण्णास वर्षे संसार केला होता त्यांच्या सोबत? पण करणार काय? गेली कित्येक वर्षे पायी वारीला जाणाऱ्या तात्यांना गेल्या 4 वर्षांत चालताना होणाऱ्या त्रासामुळे जाता आले नव्हते. मग आनंदा… तात्यांचा मुलगा दरवर्षी न चुकता त्यांना पंढरपूरला नेऊन आणत असे. पण ह्या वर्षी तेही अवघड वाटत होते.
तात्या - आनंदाचा काही फोन?
माई - अहो मेली रेंज कुठे आहे फोनला. अन त्याचे चार्जिंग देखील संपले. तरी सांगत होते आनंदास तो घरचा फोन ठेव म्हणून. हे मोबाईलच काही खरे नाही.
तात्या - उद्या एकादशी आली. आनंदाचा पत्ता नाही. फोन नाही.
माई - अहो मुद्दाम का करत असेल तो. नेमके त्याला जावे लागले ना कंपनीच्या कामासाठी. अन सुनिलाला सुद्धा सुट्टी मिळत नाहीये. गेल्या खेपेस तीच नव्हती आली मोटार चालवीत तुम्हाला पंढरपूर दर्शनाला न्यायला. मारे ऐटीत सगळ्यांना सांगितले होतेत ना... माझी सून आली मोटार घेऊन म्हणून.
तात्या - होय खरे. गेल्या खेपेस पण आनंदाला असेच काहीतरी काम होते अन यायला जमले नव्हते.
माई - आता आपणच समजून घ्यायला हवे नाही का? शेवटी पांडुरंग काय तुम्ही पहाल तिथे उभा आहे. इथूनच हात जोडू त्यास. त्यास का आपल्या अडचणी दिसत नाहीत? देव ना तो? मग? उगाच तुम्ही मनाला रूखरूख लावून घेऊ नका.
माईंच्या प्रेमळ दटावणीने, तात्या जरा स्वस्थ झाले. मुखाने पांडुरंग हारी... वासुदेव हारी नामजप सुरूच होता. काही वेळातच पाऊस जरा उघडला. दिवेलागणीच्या वेळी तर पूर्णपणे थांबला. पूर्ण दोन दिवसांनी गावात दिवे आले. जरा प्रसन्नता लाभली. देवापुढे दिवा लावून माई तुळशीपुढे दिवा लावण्यास गेल्या तोच दारात मोटारीचा उजेड अन हॉर्न ऐकू आला.
‘अहो आनंदा... आला हो’ अशी गद्गदलेली हाक माईंच्या तोंडून बाहेर पडली. तात्या उठून बाहेर आले अन एकदम प्रसन्न हसले.     
चहा पाणी, गप्पा, जेवणं ह्यात वेळ कसा गेला कळलंच नाही. आनंदाने सकाळी लवकरच पंढरपूरला जायला निघायचे आहे असे सांगून लवकर उठायला हवे असे सांगितले. मला पुन्हा माघारी जायचे आहे फक्त एक दिवस सुट्टी काढून आलो आहे असे सांगितले. पहाटे उठून आवरून आंनदाने आपल्या आई वडिलांना घेऊन पंढरपूरचा रस्ता धरला. दोन तासात पंढरपूर गाठले. एकादशीमुळे प्रचंड गर्दी... अशा गर्दीतही अगदी छान दर्शन झाले तात्या आणि माई सुखावून गेले. एवढा प्रवास करून शिवाय दर्शनाला थांबूनही पाय अजिबात दुखले नाहीत म्हणून तात्या आणखीनच खुश होते. पांडुरंग हारी... वासुदेव हारी…
संध्याकाळच्या आत माघारी घरी सुद्धा पोहचले. निदान जेऊन जा रे आनंदा... असे माई म्हटल्या पण पुढे उशीर होईल अन मला आजच पुण्यास पोहचायला हवे उद्या महत्वाचे काम आहे. असे म्हणून आनंदा चहा घेऊन नुकताच पुण्याच्या वाटेला लागला होता.
तात्या - शेवटी त्यालाच खरी चिंता. त्यानेच धाडला आनंदास अन आम्हाला दर्शन घडवले. पांडुरंग हारी ... वासुदेव हारी.
तात्यांच्या आनंदाची माईंना कल्पना होतीच खरी. आनंद होता तो त्यांची मनोकामना पूर्ण झाल्याचा. चला विठ्ठलापुढे दिवा लावून घेते… असे म्हणून माई उठल्या तोच वरच्या आळीतील दामू लगबगीने येताना दिसला.
दामू - अहो माई तुमचा फोन का बंद आहे? तुळशीपुढे उभा राहून दामू विचारात होता.
अरेच्चा काल रात्री दिवे आल्यापासून फोन चार्ज करायचा राहूनच गेला. आनंदाचा फोन यायचा म्हणून चार्ज केला जातो. आनंदा स्वतःच आला होता त्यामुळे फोनकडे लक्ष कोणाचे असणार म्हणा. 
माई - का रे दामू? झाले काय पण?
दामू - शिवाय मी आज दिवसात चार वेळा येऊन गेलो तर घराला कुलूप. होतात कुठे तुम्ही दोघे? काळजी वाटू लागली हो.
तात्या - अरे पण झाले काय असे?
दामू - अहो काही नाही... आनंदाचे मला चार पाच फोन आले. तुमचा फोन लागत नाही म्हणून आलो होतो. बर आता मला जायला हवे. कामं आहेत अजून. तुमचा फोन चालू करा अन आनंदास फोन करा लगेच. असे म्हणून दामू निघून गेला.
तात्या अन माई एकमेकांकडे पाहत राहिले. माईंनी फोन चालू केला. तोच फोन वाजला. आनंदाचाच होता. त्याला यायला जमले नाही म्हणून तो माफी मागत होता अन पुढच्या आठवड्यातच येऊन तुम्हाला पंढरपुरास घेऊन जाईन म्हणत होता. माईंना काही कळेनासे झाले. त्यांनी बर म्हणून फोन बंद केला अन घडला प्रकार तात्यांना सांगितला.
तात्या म्हणाले - आग कसे शक्य आहे. थट्टा केली असेल तुझी त्याने. मघाशीच नाही का गेला तो आपल्याला सोडून. त्या दामूला पण त्यानेच फोन करून सांगितले असणार. आजकालची मुलं काय थट्टा करतील ती पण इतक्या म्हाताऱ्या आई बापाची… नेम नाही. आता पुन्हा फोन तर येऊ दे चांगला खडसावतो त्यास.
माई - नाही हो... आवाज रडवेला होता त्याचा. मला तर थट्टा अजिबात वाटली नाही.
तात्या - पण हे कसे शक्य आहे? काल रात्री अन आज दिवसभर आनंदा आपल्या सोबतच तर होता ना.
तात्या माई विचारात पडले... काहीसे आठवून तात्या म्हणाले:
तात्या – अगं पण काल रात्री आनंदाचा फोन एकदाही कसा वाजला नाही. नेहमी कोणाचे ना कोणाचे फोन येत असतात त्यास?
माई - हो ना अहो. शिवाय कधीही भाकरी न खाणारा मुलगा... पण काल रात्री त्याने हट्टाने भाकरी अन पिठलं का करायला लावले त्याने?
तात्या - शिवाय गाडी आपली नेहमीची नव्हती. मी विचारले देखील तर जी मिळाली ती घेऊन आलो म्हणाला अन हसला. मला तर काही कळलेच नाही.
माई - आहो सगळ्यात जास्त आश्चर्य वाटले ते सकाळी… सकाळी गंध अन बुक्क्याचा टिळा लावून कमरेवर हात ठेऊन विठ्ठलासारखा उभा होता तेव्हा.
तात्या - काय सांगतेस काय?
माई - अहो त्याही पेक्षा पुढे म्हणजे… तुम्ही विठ्ठलाला अर्पण करायला गुंफलेला तुळशीहार उचलून गळ्यात घालणार होता. मी हलकेच त्याला म्हटले 'आनंदा अरे विठ्ठलासाठी गुंफलाय तो त्यांनी पहाटे' तर माझ्याकडे बघून हसला अन म्हणाला ' अगं मीच ना तो विठ्ठल' तर मी आपली बापडी हसले अन म्हणाले ‘चला पांडुरंगा… उशीर होतोय… आता निघायास हवे पंढरपुरास’. हसून चला चला म्हणाला मला.
तात्या - अगं काय सांगतेस काय?
असे म्हणून तात्यांचे डोळे चमकले... 'म्हणजे... म्हणजे तो साक्षात...'
म्हातारा म्हातारीच्या डोळ्यात खळ्ळकन पाणी आले... अन दोघेही त्यांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या देव्हाऱ्यातील विठ्ठलापुढे बसून साश्रू नयनांनी गद्गदू लागले.
©अभिजित अशोक इनामदार
  कामोठे, नवी मुंबई  
 
  

Wednesday, 22 June 2016

नांदी बदलाची... अशीही अन तशीही (लेख)

नांदी बदलाची... अशीही अन तशीही

दिनांक:  २२ जून २०१६
लिखाण : अभिजीत अशोक इनामदार

परवाच वटपौर्णिमा झाली. सगळ्यात जास्त लक्षात राहिलेली गोष्ट कोणती तर.. एक पिक्चर मेसेज तमाम व्हाट्सअप भर फिरत होता. हाफ प्यांट मध्ये पूजा करणाऱ्या ललनेचा पाठमोरा फोटो होता तो. अजूनही फिरत असणारच तो फोटो कारण कुठलीही बाई किंवा महिला किंवा मुलगी ह्या नेहमीच सॉफ्ट टार्गेट असतात. अमुक तमुक कपडे घालून फिरू नका, असे करू नका, तसे करा हे त्यांना सहजपणे सांगितले जाते. पण ह्याआधी हे सगळे करण्याआधी मी तसे सांगणारी अधिकारी व्यक्ती आहे का? हे कोणी तपासले आहे? अर्थात सणावाराला, समारंभाला आपल्याकडे महिला साडी नेसतात. बऱ्याचजणी अगदी आवडीने नेसतात. सणाला किंवा वडाच्या पूजेला नेहमी नटून थटून, सहावारी किंवा नऊवारी साड्या नेसून जाणाऱ्या स्त्रियाच आम्ही आम्ही आजपर्यंत बघत आलोत. हाफ प्यांट मध्ये वडाच्या पूजेला येणारी स्त्री हे जरा पचायला अवघड खरे... ही आहे नंदी बदलाची... अशीही

पण तिने कसे यावे हे ठरवणारे आम्ही कोण? ते तिचे तिने ठरवू द्या ना. अर्थात मला स्वतःला जर विचारले तर मला नक्कीच तिने साडी नेसून जाणे आवडले असते. पण हे झाले माझे मत. अमुक एक बाई ने मला वाटेल तसे वागावे असा हट्ट मी का करावा? मी तिने तसे जाणे ह्या गोष्टीचे जरी समर्थन करीत नसलो तरी तिचा तो फोटो ज्या प्रकारे व्हायरल झाला होता हे नक्कीच कौतुकास्पद नाही... नाही का?

बर ज्या कोण्या इसमाने हा फोटो काढला असेल त्याने तो अगदी शिताफीने तिच्या पाठीमागून काढला आहे. जर तिच्या तश्या जाण्याने संस्कृतीला ठेच वगैरे पोहचत असेल तर संस्कृती संरक्षण वगैरे करणाऱ्या लोकांनी तिच्या समोरून… तिला सांगून तिचा फोटो काढायला हवा होता. अन तू अशी आलीस आता भोग आपल्या कर्माची फळं. आम्ही हा फोटो सर्वत्र अपलोड करणार आहोत असे सांगून तरी काढायचा होता. आहे तसे करण्याची हिम्मत? अर्थात ती नसणारच म्हणा. चोरून लपून छापून फोटो काढणाऱ्यांच्या अंगी तेवढी धमक कुठली म्हणा. त्यानी काढला फोटो मागून गुपचूप अन दिला फोटो पाठवून व्हाट्सअपवर. एक ग्रुप वरून दुसरीकडे अन दुसरीकडून तिसरीकडे अन तिसरीकडून संपूर्ण जगभर...

ह्याच्याने नेमके काय सध्या झाले? आता पुरुष मंडळी बाहेर अगदी बिनदिक्कत बर्मुडा वर फिरत असतात (त्यामध्ये मी स्वतः सुद्धा आहे). त्यांचे कोणाचे असे फोटो व्हायरल होताना दिसत नाहीत. ही काय मानसिकता आहे हे माझ्या समजण्याच्या पलीकडचे आहे. उद्या जर तुमचा कोणी असाच फोटो तुम्हाला न सांगता काढला आणि दिला पाठवून व्हाट्सअप, फेसबुक वर तर चालेल तुम्हाला? किंवा तुमच्या कोणाच्या घरातील स्त्रीचा असा फोटो काढला तर चालेल?

हे सगळे व्हाट्सअप वर सुरू होते ते ठीक पण तथाकथित फेसबुक ग्रुप्स वर देखील हा फोटो यावा अन त्यावर कोणताही आक्षेप घेतला जाऊ नये हे खरेच दुर्दवी नव्हे काय? माझा मुद्दा मी पुन्हा मांडतोय... नक्कीच वडाच्या पूजेला ती साडी नेसून नाहीतर किमान पंजाबी ड्रेस घालून गेली असती तरी चालले असते असे वाटणे हे स्वाभाविक आहे. पण म्हणून तिचा असा फोटो काढून जगभर पाठवून… ह्या ह्या… हू हू… करणे हे कोणते सांस्कृतिक पणाचे लक्षण आहे? जर एवढेच वाटत होते… तर तिला थांबवून अहो ताई, माई, आक्का (हवे ते संबोधून) तुम्ही आजच्या दिवशी तरी किमान असे कपडे करून यायला नको होते... असे सांगण्याचा कोणी प्रयत्न केला? झाली कोणाची तशी हिम्मत? नाही ना… मग तिचा फोटो काढून व्हायरल करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? जर तसे स्पष्ट बोलण्याची हिम्मत होत नसेल तर तिचे फोटो काढून जगभर पसरवण्याचा देखील कोणालाही हक्क नाही.

हातात मोबाईल आलाय पण तो खऱ्या अर्थानी वापरावा कसा हे कधी कळणार? नकळत काढलेल्या फोटोंमध्ये सर्रास पणे स्त्रियांचेच फोटो जास्त असतात. पण त्याही पेक्षा जास्त गंभीर गोष्ट आता घडते ते फोटो मॉर्फिंग. कोणाचा तरी चेहरा अश्लील शरीराला जोड किंवा आहे त्या फोटो मधील स्त्रीचे कपडे मॉर्फिंग करून काढून टाक. मागे एकदा असाच एक महिलेचा फोटो व्हाट्सअप वर फिरत होता कि हि बाई फोन मध्ये इतकी बिझी आहे कि ट्रेन मध्ये बाथरूम मध्ये तिची सलवार विसरून आली आहे. स्किन कलरची सलवार मॉर्फिंग करून नाहीशी करायला जास्त वेळ लागत नाही पण... पण  कुठल्या सडक्या मनोवृत्तीतून हे जन्माला येतेय? हि अशी कशी इतकी वाईट प्रवृत्ती? हे असे काम करणाऱ्याना त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांची अशी विटंबना झाली तर चालेल का? आपल्या आई, बहिण, मैत्रीण किंवा पत्नीचा फोटो असा व्हाट्सअपवर फिरत राहिला तर आवडेल काय?
कुठल्याही अनोळखी स्त्रीचा फोटो व्हाट्सअपवर टाकण्यापूर्वी किंवा आलेला कुठलाही फोटो फॉरवर्ड करण्यापूर्वी स्वतःला हे विचारा कि हि जर माझी बहिण असती तर? समजा आपण तसे फोटो तयार केले नसतील पण तसे फोटो फॉरवर्ड करून आपण वेगळे काय करत आहोत? जितके दोषी तसा फोटो करणारा आहे तितकेच दोषी आपण पण होऊ जर आपण ते फोटो काहीही विचार करता तसेच पुढे पाठवत राहिलो तर. बघा पटलं तर घ्या... नाहीतर सोडून द्या. कारण असेही मी सांगितले म्हणून हे समाजकंटक असे फोटो पसरवण्याचे थोडीच थांबणार आहेत. पण मी, तुम्ही-आम्ही आपण सगळे किमान असले फोटो मेसेजेस पुढे फॉरवर्ड करून त्याचा होणार जास्तीचा प्रसार तरी थांबवू शकतो ना?  
बघा आज ह्या एका विषयावर नक्की विचार करा. चिंतन करा अन ठरवा येणाऱ्या काळात आपल्याला कसला समाज घडवायचा आहे ते. ह्या लेखातील बऱ्याचशा प्रश्नांना स्वतःच स्वतःला उत्तरे द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करा. ह्या प्रश्नांना प्रामाणिक उत्तरे देण्याची जेव्हा बहुतेकांच्या मनांची तयारी होईल तोच क्षण येऊ घातलेल्या बदलाची नांदी देणारा ठरेल.  अन तेव्हाच आपण म्हणू शकू नांदी बदलाची... अशीही अन तशीही.

©अभिजित इनामदार
  कामोठे, नवी मुंबई