Monday, 25 July 2016

अजून किती निर्भया...!! (लेख)

अजून किती निर्भया...!!

दिनांक : 22 जुलै 2016
लेखन: अभिजीत अशोक इनामदार
 

कोपर्डी, अमरावती ह्या ताज्या बातम्या पाहून पुन्हा एकदा मन हेलावून गेले. खरेच आपला समाज - आपण नक्की कोणत्या दिशेने जात आहोत? पशूपासून उत्क्रांती होऊन आपला माणूस झाला खरा पण माणसातले माणूसपण संपूवून पुन्हा माणसाला पुन्हा उलट दिशेने... पशु होण्याकडे जाण्याची इच्छा का होते हे मला समजत नाही.

कोणी म्हणाले अमुक तमुक प्रकारचे सिनेमे पाहून लोक असे करतात? म्हणजे तसे सिनेमे आले नाहीत तर महिला मुलींवर अत्याचार होणार नाहीत? किती हास्यास्पद विधान आहे हे... अरे ज्यांना कोवळ्या अल्पवयीन मुलीवर सुद्धा दया येत नाही त्यांना माणूस तरी कसे आणि का म्हणावे? ह्या सगळ्या गोष्टींना कोणी मुलींना दोष दिला, त्यांचे कपडे, राहणीमान इत्यादी गोष्टींना दोष दिला, कोणी सरकारी यंत्रणेला दोष दिला, कोणी सिनेमा चित्रपटांना दोष दिला तर कोणी अजून कशाला दिला. पण मला सांगा कोणीही ह्या सर्वाला आपण जबाबदार आहोत असे म्हणताना का आढळत नाही? ही जबाबदारी मी, तुम्ही आपण साऱ्यांनी समाज म्हणून घ्यायला नको का? काहींना पटणार नाही पण त्यासाठी एक गोष्ट सांगतो.

आम्हाला आमच्या ऑफिसमध्ये ठराविक कालावधी नंतर पुन्हा पुन्हा काही ट्रेनिंग्स दिली जातात. पैकी वर्कप्लेस हऱ्याशमेंट हे एक महत्वाचे ट्रेनिंग. त्यामध्ये तीन व्यक्ती शोधल्या जातात पीडित व्यक्ती, अत्याचार करणारा वा करणारी व्यक्ती आणि ते सारे निमूटपणे पाहणारी व्यक्ती (ऑब्झर्वर).

पीडित व्यक्तीला त्यांच्यावरील अन्यायाची माहिती देण्यासाठी वेगवेगळे मार्ग जसे की प्रत्यक्षात जाऊन सांगणे, मेल करणे, फोन करणे हे दिलेले आहेतच पण त्यातून कोणी सांगू शकत नसेल किंवा अन्याय करणारी व्यक्ती उच्चपदस्थ असेल तर काम कठीण होते. म्हणूनच ऑब्झर्वर (म्हणजेच हे सगळे पाहणारी व्यक्ती) त्याचा रोल सुद्धा महत्वाचा असतो. ती व्यक्ती जर अन्याय करणाऱ्या व्यक्तीची बाजू घेऊन बोलू लागली किंवा वागू लागली तर त्याचे रूपांतर ऑब्झर्वर मधून अन्याय करणाऱ्यांत रूपांतरित होते. म्हणून त्यांनी सुद्धा काळजीपूर्वक राहणे - वागणे गरजेचे असते. आपल्या समोर जर असे काही घडत असेल तर आपण ते शांतपणे न पाहता त्याविरुद्ध आवाज उठावाने गरजेचे असते. ती व्यक्ती अगदी गुप्तपणे पण हे काम करू शकते. पण तसे करणे गरजेचे आहे.

आपला समाज हा ऑब्झर्वरची भूमिका नीट नाही का बजावू शकत? हो पण ही भूमिका थोडी जास्त महत्वपूर्ण आहे. कारण त्यासाठी सुरुवात आपल्यापासून आपल्या घरातून करावी लागेल. आपल्या मुलांना अगदी संस्कारक्षम वयापासूनच मुलींबद्दल आदर राखणे, त्यांचा मान सन्मान जपणे ह्या गोष्टी शिकवणे गरजेचे आहे. अर्थात आमची मुले असे काही करणार नाहीत अशी बऱ्याच जणांची खात्री असते पण ते फक्त स्वतःपुरते मर्यादित ना ठेवता जर एखादे वांड मूल आजूबाजूला दिसत असेल तर त्यालाही हे समजावून सांगणे गरजेचे आहे.

मुळात मेल फिमेल रेशो जो कमी आहे त्याला आपणच जबाबदार नाही आहोत का? तुम्ही आम्ही किंवा आपल्या आधीच्या काही पिढ्यांनी वंशाचे दिवटे हवेत म्हणून कित्येक निरागस कोवळे जीव तंत्रज्ञानाचा गैरवापर करून जन्माला येण्यापूर्वीच ती केवळ मुलगी आहे म्हणून अक्षरशः कुरतडून कुरतडून मारून टाकले नाहीत काय? अन ते कमी म्हणून आता तेच दिवटे जन्माला आलेल्या निरागस कोवळ्या मुलींचे वखवखलेल्या लांडग्यांप्रमाणे लचके तोडत असताना आपण फक्त हतबल होऊन पाहत राहायचे? हे खरेच माझ्या बुद्धीच्या पलीकडचे आहे.   

सगळ्याच गोष्टी सरकार करेल नाहीतर आम्ही सरकारला धारेवर धरू म्हणणारे… सरकारनेच घालून दिलेले किती नियम पाळतात? राज्य लोकांनी निवडून दिलेले सरकार चालवत जरी असले तरी हे राज्य हे लोकांचे राज्य आहे ना? लोकशाही असलेल्या राज्यात सगळ्क्या गोष्टी सरकार ने करून भागेल काय? आपण ह्या देशाचे नागरिक म्हणून सर्व नियमांचे पालन का करू शकत नाही? का अजूनही कुठेतरी जाऊन लिंगभेद चाचणी केली जाते? हा कायद्याने गुन्हा आहे हे माहीत असताना सुद्धा? प्रत्येक वेळी का आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवायला हवे... पोलिसिंग करायला हवे? आपले आपण मनाने हे नियम नाही का पाळू शकत? अन जर तसेच असेल तर मग कशाला लोकशाही अन लोकांचे राज्य वगैरेच्या बाष्कळ गप्पा झोडायच्या? त्यापेक्षा मग तो साहेबाचा हंटर बरा होता ना, त्या भीतीने का होईना लोक कायदा पाळायचे असे म्हणायची वेळ खरेच नको यायला.

उगाच त्या स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा, महिलांची गगनभरारी ह्या चर्चा करण्यात काय अर्थ आहे? कालच एक महिलेचा पहिली ट्रेन ड्रायव्हर म्हणून व्हाट्सअपवर फोटो आला होता, मध्यंतरी हैदराबाद मध्ये काही महिला भारतीय एअर फोर्स मध्ये फायटर पायलट म्हणून रुजू झाल्याची बातमी होती पण ह्या अशा गोष्टी आठवून आठवून उदाहरणे द्यावी लागतात ह्यातच सगळे नाही का आले?

सरकार, कायदा आणि सुव्यवस्था जे काही करायचे असेल ते करेलच आणि त्यांना ते करणे गरजेचे आहेच. पण सगळ्याच गोष्टी कोणीतरी येऊन आपल्यासाठी करेल ही भावना सोडायला हवी. आपण एक चांगला समाज म्हणून काय करू शकतो हे पाहायला हवे. आपण आपल्या मुलांना इतके चांगले संस्कारित करूयात की भविष्यात ती मुले असे काही करणार नाहीत याची खात्री वाटायला हवी. ती खात्री जोपर्यंत आपल्याला पटत नाही तोपर्यंत माझ्यासारखे मुलींचे बाप मात्र सुखाची झोप घेऊ शकणार नाहीत.     

©अभिजित अशोक इनामदार
  कामोठे, नवी मुंबई  

No comments:

Post a Comment