झिंगाट प्रेम
मुला मुलींनी काय करावे:
दिनांक : 12 जुलै 2016
लेखन: अभिजीत अशोक इनामदार
मध्यंतरी एक मराठी सिनेमा आला...
करोडो रुपये कमावले त्या सिनेमाने. दोन कोवळ्या मनांची प्रेमकहाणी अन त्याचा होणार
शेवट अशी ही कथा होती. पेपर मध्ये आमुक अमुक चित्रपटाचा इफेक्ट अन फलाना जिल्ह्यातील
12 - 13 प्रेमीयुगुल फरार अशी बातमीही वाचनात आली. हे म्हणजे असे झाले की जर हा चित्रपट
आलाच नसता तर हे पळून गेले नसतेच. अशी खात्री आहे काहो? अहो अशा विषयाचा हा पहिलाच
सिनेमा आहे का? अर्थात आपल्याकडील तरुण तरुणी हे फिल्म स्टार्सना त्यांचा रोल मॉडेल
समजतात अन त्यांच्या सिनेमांचा त्यांच्या मनावर चांगलाच पगडा असतो पण म्हणून आपण काय
करतोय ह्याचे भान अगदीच हरवून जावे? कितीतरी जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा नायक
नायिका असेच पळून गेले आहेत, जंगलात राहिले आहेत. लाकडी घरात राहिले आहेत. अशा वेळी
नायिका "तुम काम पे जाओगे मै खाना बनाऊंगी और तुम्हारी राह देखुंगी" वगैरे
वगैरे म्हणते. पण असे करणे हे कितपत शहाणपणाचे आहे हे कळण्याचे ते वय नसते हेच खरे.
मुळात सिनेमा नाटकात किंवा टीव्ही
सिरियल्स मधील प्रेम हेच खरे प्रेम अशी जी काही भावना असते तीच मुळात चुकीची. अर्थात
सगळ्याच सिनेमा किंवा टीव्ही सीरिअल्स वर माझा आक्षेप नाहीये. पण बऱ्याचदा यंग जनरेशनचा
गोंधळ होताना दिसतो.
अर्थात ज्यांची आपली ठाम मते
आहेत, किंवा त्याबद्दलचे त्यांच्या कुटुंबाने त्यांच्यावर केलेले संस्कार आहेत त्यांच्या
बद्दल मी बोलत नाही. पण जे उगाच वाहवत जातात त्यांनी वेळीच स्वतःला सावरणे महत्वाचे
असते.
दहावी किंवा बाराव्वी नंतर ना
धड लहान मूल ना एकदम समजूतदार प्रौढ अशी साधारण जी अवस्था आयुष्यात येते. तेव्हा अपोसिट
सेक्स बद्दल वाटणारे औत्सुक्य किंवा ओढ ही अगदी सर्वसामान्य गोष्ट आहे. पण त्या गोष्टींना
त्या वयात किती महत्व द्यायचे हे कळणे खूप महत्वाचे असते. जेंव्हा कधी एखादा तरुण किंवा
तरुणी ह्या गोष्टींमध्ये गुरफटून जातात तेव्हा त्यांना समजावताना निराळ्याच गोष्टींचा
संदर्भ दिला जातो. जसे की त्यांची आपली जात वेगळी आहे, त्यांची आपली बरोबरी नाही होऊ
शकत, गरिबी श्रीमंती वगैरे पैलू त्याला जोडले जातात. पण मुळात त्यामागील मानसिकता ह्या
वयातील अल्लडपणा ह्या मुलांना त्यांची आयुष्य घडवण्यासाठीची जी मोलाची अन महत्वाची
वर्षे असतात तीच हिरावून टाकतात ह्यावर किती भर दिला जातो?
मुळात ह्यांच्या लेखी प्रेम म्हणजे
काय हे तपासून पाहणे गरजेचे आहे. शारीरिक आकर्षण हे एक मुख्य कारण असू शकते. पण त्या
नंतर काय? समजा त्यातून काही समस्या झालीच तर ती निभावून न्यायाची ताकत अन कुवत दोन्हीही
त्या कोवळ्या मनांमध्ये असते काय? बरं चला ती गोष्ट निभावून नेली तर पुढे काय? नकळत्या
वयात आलेले पालकत्व पेलण्याची ताकत कुठून येणार? शिवाय पुढील सगळ्याच गोष्टी, स्थैर्य,
त्यासाठी लागणारा आर्थिक आधार हा कुठून येणार? डोश्याच्या गाडीवर किंवा साधारण कुठल्याशा
कंपनीमध्ये काम करून सगळ्याच गोष्टी सध्या होत नाहीत. 132 कोटीच्या पुढे लोकसंख्या
(आजचा गुगल नुसरचा आकडा) असलेल्या देशात मुळातच संधी कमी आहेत. असे असताना न कळत्या
वयात नको ते निर्णय घेऊन कसे चालेल बरे? ह्या गोष्टींचे भान तरुण पिढीला किंवा नुकत्याच
तारुण्यात येऊ घातलेल्या पिढीला देणे गरजेचे आहे. प्रेम ही खूप चांगली संकल्पना आहे.
ती मनामध्ये जरूर असावी, पण प्रेम मिळवण्याच्या नादात कुठल्याही थराला जाण्याचा प्रकार
तरुणाई ने करू नये.
मुला मुलींनी काय करावे:
- जशा आपल्या भावना आहेत तशाच
इतरांच्याही भावना असणार त्याचा आदर ठेवावा. आपल्याला वाटणारी प्रेमभावना समोरच्याला
जाणवलाच असे नाही. तसे नसल्यास त्या गोष्टीचा खिलाडू वृत्तीने स्वीकार करावा. आणि आयुष्यात
पुढे जावे. प्रेम भंगाचे दुःख जरी मोठे असले तरी आयष्य खूप सुंदर आहे हे लक्षात ठेवावे.
- आपल्याला नक्की काय हवे आणि
आयुष्यात काय करायचे आहे हे पक्के करावे. स्वतःचे स्वतः ठरवता येत नसल्यास पालकांशी
संवाद साधून ह्यावर मार्ग काढावा. घरातील व्यक्ती तुम्हाला तुमच्या जन्मापासून ओळखतात
अन बहुतांश वेळा ते तुमचे भलेच इच्छितात.
- जर कोणाबद्दल आकर्षण जाणवत
असेल तर त्यात स्वतःला वाहवून जाऊ देऊ नये.
- ह्या वयात आपण हे सगळे पेलण्यास
समर्थ आहोत का स्वतःच स्वतःला विचारावे.
- प्रेम, लग्न ह्या गोष्टी बाहुलीच्या
खेळा इतक्या सोप्या नसतात. तिथे आयुष्यभर साथ
देण्याची तयारी, मानसिकता असावी लागते.
- आपल्याला विरोध करणाऱ्यांपासून
पळून जाऊन आपण आयुष्यात सुखी होऊ असे काही नसते.
- लहान वयात सगळ्या जबाबदाऱ्या
उचलण्यास आपण तयार आहोत का? ह्याचा विचार करावा.
- सिनेमा मध्ये वगैरे दाखवतात
तसे कोणीतरी आपल्या मदतीला धावून येईल अशी फुकाची अपेक्षा ठेऊ नये.
- शिक्षण, करिअर सोडून फक्त प्रेमासाठी
म्हणून पळून जाऊन… आपण कमाई कशी करणार? होणाऱ्या / झालेल्या पती वा पत्नीला आणि स्वतःला
कुठे ठेवणार? शरीरसुख काही मिनिटे आनंद वा सुख देईल... त्यानंतर भूक वगैरे लागत नाही
असे काही होत नाही. दिवसातून 3 - 4 वेळा खायला कुठून आणणार?
- जाती धर्माच्याही पेक्षा मी
म्हणेन ज्या वातावरणात... ज्या घरात आपण वाढलो, ज्या सवयीनी आपण आत्तापर्यंत जगत आलो...
दुर्दैवाने त्या सगळ्या शिवाय रहावे लागले किंवा आपल्या सवयीच्या अगदी विरुद्ध जगावे
लागले तर आपण राहू शकू का? ह्याचा आधी विचार करावा. नंतर पश्चाताप करून वा वाईट वाटून
घेऊन काही उपयोग नसतो. अशा वेळी बऱ्याचदा हातात काहीही उरत नाही.
- शिक्षण पूर्ण नसताना आपल्याला
चांगली नोकरी लागेल वा चांगला धंदा बसेल अशी आशा ठेवणे मूर्खपणाचे लक्षण असते. इथे
चांगल्या संधीच्या शोधात सगळेच असतात हे विसरून चालणार नाही.
- आपण सगळ्या पासून लांब दूर
निघून जाऊ जिथे दुसरे कोणी असणार नाही फक्त तू आणि मी… असे संवाद सिनेमा नाटकात चांगले
वाटतात. प्रत्यक्ष आयुष्यात तसे शक्य नसते. सध्याच्या टेकनॉलॉजिच्या जगात तुमचा कधी
ना कधी, कसा ना कसा पत्ता लागू शकतो हे लक्षातच ठेवावे. त्या शिवाय सगळ्या पासून लांब
अशी कुठलीही जागा नसते. मनुष्य कितीही म्हणाला तरी आयुष्यभर जंगलात वगैरे राहू शकत
नाही.
- त्यातूनही तुम्ही लांब जाऊन
पोहोचलात तरी मन हा असा प्रकार आहे जो तुम्हाला, तुम्ही जिथून पळून आलात तिथे क्षणात
नेऊन ठेऊ शकते. आपल्यांच्या विरहात जगणे हे फार कठीण काम असते.
एकूण काय... प्रेम करा जरूर करा.
प्रेम खूप चांगली गोष्ट आहे. ती तुमच्यातली माणुसकी जिवंत ठेवेल. पण त्याच बरोबर आपले
शिक्षण, करिअर, छंद ह्या गोष्टी जपा. प्रेमाची झिंग जरूर असावी पण झिंगाट प्रेमाच्या
हट्टापायी आपल्या समोरच्या छान सुंदर आयुष्यात आपल्याच हाताने माती कालवणे काही योग्य
नाही. प्रेम हे तुमच्या प्रगतीला पूरक असावे अधोगतीला लावणारे नसावे. आपले आयुष्य आपण
घडवण्याची कुवत आपल्यात आणा अन मग काय हव्या त्या भराऱ्या घ्या. गगनभरारी घेण्यासाठी
पंखांमध्ये आवश्यक असणारे बळ आधी पंखांमध्ये येऊ द्या. उगाच गगनभरारी घेण्याच्या नादात
कुठे भेलकांडलात तर झडप घालू पाहणाऱ्या हिंस्र श्वापदांची इथे कमी नाही हे ही ध्यानी
असू द्या.
©अभिजित अशोक
इनामदार
कामोठे, नवी मुंबई
(सदर लेख तारुण्यावस्थेत पदार्पण
करणाऱ्या सर्व तरुण वर्गाला वाचण्यास द्यावा. माझ्या वॉल वरून तो शेअर करू शकता किंवा
http://abhiinamdar.blogspot.com/ ह्या ब्लॉग वरती वाचू शकता.)
No comments:
Post a Comment