Thursday, 11 August 2016

वखार (लेख)

वखार

लेखन : अभिजीत अशोक इनामदार
दिनांक : 11 ऑगस्ट 2016

आत्ता जरी नवी मुंबईमध्ये राहत असलो तरी आमचे बालपण हे खेड्यात गेले असल्यामुळे बऱ्याचशा गावाकडच्या लहानपणीच्या आठवणी मनात तशाच घर करून आहेत. काळानुरूप आम्ही वाढलो, बदलत गेलो पण तिथल्या गोष्टींशी असलेली नाळ काही तुटत नाही. माझ्या लहानपणी मी माझ्या आईला आणि काकूला माझ्या वयाच्या 12 वर्षांपर्यंत तरी चुलीवर स्वयंपाक करताना पाहिले आहे. त्या काळी ग्यास, टीव्ही अशा गोष्टी दैनंदिन गरजेच्या प्रकारात न मोडता चैन सदरात मोडत असल्यानं साहजिकच त्या घरी उपलब्ध नव्हत्या.

नाही म्हणायला रॉकेल (हल्ली त्याला सॉफिस्टिकेटेड भाषेत केरोसीन की कायसे म्हणतात) वरती चालणारा एक स्टोव्ह होता. पण संपूर्ण घरातील माणसांचा नाष्टा, स्वयंपाक त्यावर होऊ शकत नसे त्यामुळे चूल पेटवणे हे गरजेचे असे. शिवाय मागच्या अंगणात आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी एक वेगळी चूल होती. त्यामुळे चुलीशी तसे लहानपणापासून परिचित आहोत. तर ह्या चुलींना लागणारे इंधन म्हणजेच लाकडे, ग्रामीण बोलीमध्ये त्याला जळण किंवा सरपण असेही म्हणतात ते मिळण्याची जागा म्हणजेच वखार.

आमच्या घराशेजारीच शंकर भाऊंचे घर अन आणि रस्त्याच्या पलीकडे म्हणजे घरासमोर त्यांची लाकडाची वखार होती. तिथे काहीही बोर्ड वगैरे नव्हता. त्यांचा मुलगा दत्तू सुतार ती वखार चालवीत असे. माझ्या बालपणी तो जवळपास पंचविशी पार केलेला असावा. कायम निळा फुल्ल बाह्यांचा बनियन आणि खाली पांढरा लेंगा अशा अवस्थेत तो वखारीत वावरत असे. वखारीतच काय तर घरून वखारीत किंवा वखारीतून घरी जाता येता सुद्धा त्याचा हाच पेहराव असे. आयताकृती वखारीत आत मध्ये समोर उजव्या बाजूला सगळा लाकडांचा साठा असे. डाव्या बाजूला कव्हर्ड एरियामध्ये तो इतर सुतार काम करे. त्यामध्ये शेती साहित्याची म्हणजे नांगर, कुळव, फावडे, कुदळी, टिकाव वगैरेची दुरुस्ती किंवा नवीन साहित्य बनविणे, घराची दारे, खिडक्या, कपाटे वगैरे ही चाले. आमचे तिथे जाणे व्हायचे ते जळण आणण्यासाठी आणि रिकाम्या वेळेत तिथे खेळून धुडगूस घालण्यासाठी.

घरातले जळण संपले असेल आणि घरी काका किंवा बाबा कोणी नसेल तर मग काकू किंवा आई आम्हाला तिकडे पाठवीत असे. मग आम्ही जळण आणायला आलोय म्हणून सांगितले की आम्हाला दत्तू काका जळणाची लाकडे कोणती ते दाखवीत असे अन त्यातील लाकडे उचलून तराजूमध्ये ठेवायला सांगे. त्याकाळी बहुतांश वेळा मिळणारी लाकडे म्हणजे बाभळ किंवा लिंबाची असत. एक मण किंवा दोन मण जी काही सांगितली असतील तेवढी लाकडे तोलून झाली की मग आम्ही ती एक एक करून काढून खाली ठेवत असू. मग दोन्ही हात पुढे करायचे अन दुसऱ्याकोणीतरी त्या दोन्ही हातांवर आडवी लाकडे रचायची. ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार त्याला पेलेल एवढी लाकडे त्या हातावर झाली कि तो मग घराकडे जाई तो पर्यंत दुसऱ्या भावाच्या हातावर लाकडे दिली जात. अशा प्रकारे जळण आणणे ही घराची सामूहिक ऍक्टिव्हिटी पार पडे.

आता ती लाकडे वाहून आणताना हातांना ती टोचत, काहीवेळा ओरखडे उठत वा क्वचित प्रसंगी खरचटे पण त्याचे काही विशेष नसे. मागल्या खेपेस असे काही झाले म्हणून आम्ही पुढच्या खेपेस पुन्हा जळण आणायला गेलोच नाही असे कधी झाले नाही. उलट प्रत्येकवेळी उत्साहाने उड्या मारत आम्ही त्या वखारीत जात असू. बर आदल्या दिवशी संध्याकाळी लाकडे आणली की दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा फार फार तर संध्याकाळी आमची आज्जी आणि दत्तू ह्यांचा एक लडिवाळ संवाद घडे.

आज्जी - दत्या मेल्या जळण दिलंस का काल रात्री?

वास्तविक आम्ही जळण आणलेल तिने पाहिलेला असत, पण विषय फोडायची तिची अशी एक विशिष्ठ पद्धत होती.

दत्तू - व्हय कि व माई काल रातांच्यालाच दिलहाय न्हवं तुमच्या नातवंडासंगंट

आज्जी - मग सुक्काळीच्या जरा चांगल काढून नाही का देता येत?

दत्तू - आव चांगलच तर दिलहाय न्हवं...

आज्जी - हुम्म्म तर तर मोठा सांगतोयस चांगलं दिलंय म्हणून... सगळीच तर बाभळ आहे

दत्तू - मग माई आता आता काय सागवानी लाकूड द्यायचा काय जळणाला?

असे म्हणून दत्तू खी खी खी करून हसे

आज्जी - मुडद्या तुला सागाचं लाकूड दे म्हणून म्हणाले का मी? पण जरा चांगली द्यायची ना?

दत्तू - म्हंजी कशी?

आज्जी - मेल्या लहान पोरं आलेली बघून सगळी ओली बाभळ दिलीस तू? वाळकी लाकडं द्यायला काय जीव जात होता कारे भडवीच्या...

दत्तू त्यावर हासे अन वखारीकडे चालू लगे...

लहानपणी कित्येक वेळा लाकडे आणली असतील पण हा संवाद मात्र काही बदलत नसे. आता बऱ्याच जणांना आजीच्या तोंडाचे शब्द म्हणजे शिव्या वाटतील. हो… म्हणजे हल्लीच्या जमान्यात एखाद्याला मूर्ख, गाढव म्हटले तरी ते शिवी दिली असे समजले जाते. पण त्यावेळी चालत्या बोलत्या जिवंत माणसाला मुडद्या म्हणणे म्हणजे त्याला तसे संबोधणाऱ्या व्यक्तीला आणि त्या मुडद्याला सॉरी सॉरी त्या माणसाला देखील काहीच गैर वाटत नसे. बोलताना वाक्यांमध्ये काही स्वल्पविराम, पूर्णविराम अर्धविराम, उद्गारवाचक चिन्हं ही असल्या शब्दांमधून व्यक्त होतं. अन तसे त्याचे कोणालाच काहीच वाटत नसे.      

पोटापाण्यासाठी, आमच्या शिक्षणासाठी आई-बाबा, काका-काकू गावातून बाहेर पडले. आजी आजोबा गेले. बराच काळ मध्ये लोटला… मग मधेच कधीतरी अशा आठवणींचे उमाळे मनामध्ये दाटून येतात. मन धावत धावत जाऊन म्हासुर्ण्यातील आमच्या आळीतील घराजवळील पिंपळाच्या पारावर जाते, नरसोबाच मंदिर दिसू लागते, घर दिसू लागते अन घरासमोरील दत्तूची वखारही दिसू लागते. मागे एकदा चुलत भावाच्या लग्नासाठी गावी जाणे झाले. घरासमोरील बिन नावाच्या लाकडी वखारीच्या भिंतीवर "श्रीदत्त कारपेंटर्स" अशी पाटी झळकत होती. बदलत्या कालानुरूप वखारीनेही आपले रूप बदलले होते तर. संध्याकाळी सहज म्हणून आत डोकावलो तर दत्तूशेटचा मुलगा कसल्याश्या लाकडावर रंधा मारून ते लाकूड गुळगुळीत करीत होता. मला बघून हसला आणि मला म्हणाला

पांडा - या अभिजीत शेट... आज कसे काय येणं केलं?      

मी - मी कसला बाबा शेट... आलो होतो म्हटलं गाठ घ्यावी म्हणून आलो.

पांडा - बरे झाले आलास बाबा. नाहीतरी आठवणीने हल्ली भेटायला कोण येतंय म्हणा? आणि त्यात तुम्ही पुण्या मुंबईला जाऊन राहिले आपली गाठ पडणार कशी म्हणा...

तिथेच बाजूला एका टेबलवजा बेडवर बसलेला दत्तू  मला दिसला. पांडाने सांगितले मी माईंचा नातू म्हणून... लगेच हरकून गेला… म्हाताऱ्या मिचमिच्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत

दत्तू - लैच मोठा झालास लेकरा वळखलाच न्हाई बघ…

मी - हो आता हल्ली येणं होत नाही

मग माझी जरा विचारपूस करून त्याने बाजूला खेळणाऱ्या त्याच्या नातवंडाला… राम्या घरी जाऊन वखारीत चहा पाठवायला सांग असे सांगितले. घर शेजारी जवळच असल्याने ते पिल्लू पण घरी गेले. मी नको नको म्हणत असताना त्याने मला हातानेच गप्प केले.

मग मीच म्हणालो - बाकी काय म्हणते वखार? आता पूर्वीइतकी लाकडे दिसत नाहीत. प्लायवूड अन संमाईकाच जास्त दिसतोय…

दत्तू - खरंय बाबा... पर आता काय करायच… जे चालतंय ते करायला होवं ना... आता काय कोण चूल पेटवतय? आमच्याच घरात ग्यास आलाय बाकीच्यांसारखाच… मग कोण जळण न्हेणार. शेतीच्या कामालाबी जास्ती करून लोखंडी हत्यार वापराट्यात न्हवं... मग काय फर्निचरची कामं चालू केली. त्या साठीच लागतंय बघ हे.

तेवढ्यात चहा आला... हल्ली ग्यासमुळे चहा देखील लवकरच होतो असे उगाचच वाटून गेले.

बदल हा तर निसर्गाचा सर्वात मोठा अविभाज्य घटक आहे आणि तो कितीही हवाहवासा असो वा नकोसा असो व्हायचा तो बदल होतच राहतो. माझ्या लहानपणी मी पाहिलेली बिन नावाची लाकडाची वखार आणि आत्ताचे श्रीदत्त कारपेंटर्स ही एकाच जागेची दोन रूपे होती. लाकडे घ्यायला आल्यावर लाकडाच्या ढिगाऱ्यांवर चढून झाले उड्या मारणे, त्यांच्या मागे लपून दुसऱ्याला वेगवेगळे आवाज काढून घाबरवणे, किंवा ठिकठिकाणी असलेल्या लाकडांच्या ढिगाऱ्यांमधून पळापळी करणे ह्या आठवणी झर झर डोळ्यापुढून सरकत होत्या. मी शोधात असलेल्या वखारीच्या खाणाखुणा आता बऱ्याचशा पुसट झाल्या होत्या. येत्या काळात त्या पूर्णपणे नाहिश्याही होतील आणि वखारीसारख्या ठिकाणीही आम्ही केलेल्या गमती जमती फक्त आठवणींच्या रूपानेच शिल्लक राहतील. आता तिथे असलेल्या प्लायवूड आणि सनमाईका ह्यांच्या थप्प्यांमधून का कोणास ठाऊक तो आपलेपणाचा फील मात्र येत नव्हता.

गप्पा संपवून मी उठलो आणि "श्रीदत्त कारपेंटर्स" मधून बाहेर पडलो आणि घराकडे चालू लागलो. अवखळ मन मात्र अजूनही दत्तूच्या वखारीतील लाकडांच्या ओंडक्यांमधून उगाचच पळापळी करीत होतं.  

…..©अभिजित अशोक इनामदार
    कामोठे, नवी मुंबई  
 

No comments:

Post a Comment